घेतला एक वसा मूल्यवर्धनचा
मूल्यवर्धन उपक्रम शाळेत सुरू केले आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल पाहून असे वाटते आहे की, जणूकाही आपण एक चांगला वसा घेतलेला आहे.
मी मूल्यवर्धन प्रशिक्षण सन २०१७ मध्ये घेतले. त्यावेळी असे वाटले की, या प्रशिक्षणाची गरज खरोखरच आहे काय? पण जेव्हा प्रशिक्षणातून तीन दिवस अध्ययन करून जेव्हा शाळेत हे उपक्रम राबविण्यात आले तेव्हा असे लक्षात आले की, खरोखरच आजच्या काळाची गरज आहे, मूल्यवर्धन. आजचे शालेय विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत. मग या जबाबदार व्यक्तिंना तयार करताना, त्यासंबंधीत कौशल्य व संविधानातील मूल्ये नको का रुजवायला? मूल्यवर्धनची आठवड्यात एक तासिका आम्ही घेत असतो. आम्हांला प्रत्येक वर्गासाठी विद्यार्थी उपक्रम पुस्तिका मिळाल्या आहेत. त्यातील गोष्टी, चित्रकला मुलांना खूपच आवडतात. यातील उपक्रमही मुलांना खूप आवडतात. हे उपक्रम मुलांच्या वयोगटानुसार योग्यच आहेत. या उपक्रमातून त्यांच्यात मूल्यांची रुजवण योग्य पद्धतीने होते आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये दिवसेंदिवस योग्य ते बदल होत असताना बघत आहे.
इयत्ता पहिलीमध्ये असलेले ‘योग्य अयोग्य वर्तन’ आपले वर्तन योग्य कसे, हे मुले छान पद्धतीने सांगतात. या उपक्रमात आनंदाने सहभागी होतात. ‘अपेक्षांचे झाड’ तयार करत असताना विद्यार्थ्यांचा सहभाग अवर्णनीय होता. काही उपक्रमांचे तक्तेही आम्ही आमच्या वर्गात तयार करून लावलेले आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना समाजात कसे वावरायला पाहिजे हे समजते. चांगल्या सवयी, वाईट सवयी यातील फरक हा विद्यार्थ्यांना लक्षात येतो. ते चांगलेच वागण्याचा प्रयत्न करतात. त्यांना स्वयंमूल्यमापन सुद्धा करता येते. स्वतःचे नियम ते स्वतः तयार करतात. रस्ता ओलांडत असताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे. हे सुद्धा या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले. इयत्ता दुसरीमध्ये एका उपक्रमाचे शिर्षक आहे, ‘शाळेचे नियम, घरचे नियम’ विद्यार्थी आपल्या भाषेत खूप छान असे नियम सांगून जातात, जे ऐकून आश्चर्यच वाटते. एवढी त्यांची विचारशक्ती या उपक्रमातून परिपक्व झाली आहे.
मूल्यवर्धन आजच्या काळाची गरजच आहे. उपक्रमाच्या सहाय्याने आम्हा शिक्षकांना आमच्या छोट्याछोट्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजविण्यासाठी मदतच होत आहे. मुले तर हेच उपक्रम घ्या, असे आवडीने म्हणतात. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे मी खूप खूप आभार मानते. त्यांनी पुढाकार घेऊन आमच्या प्राथमिक शाळेत मूल्यवर्धन विषयाचा समावेश केला आहे. त्यामुळेच आजच्या विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक घडविताना आम्हांला खूप खूप मदतच झाली.
-सौ. मृणालिनी विजय भाकरे
घेतला एक वसा मूल्यवर्धनचा
-सौ. मृणालिनी विजय भाकरे
मूल्यवर्धन आणि मी
मूल्यवर्धन कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू झाला, त्याचा मी अगदी सुरुवातीपासूनचा साक्षीदार आहे. महाराष्ट्र शासनाने हा कार्यक्रम संपूर्ण राज्यात लागू करण्याआधी पायलट प्रोजेक्ट म्हणून आमच्या काटोल विधानसभा क्षेत्रात चालू करण्यात आला होता.
सन 2015-16 साली काटोल विधानसभेच्या तत्कालीन आमदारांच्या पुढाकाराने मूल्यवर्धन कार्यक्रम नरखेड तालुक्यात सुरू करण्यात आला. पहिल्याच वर्षी माझी प्रेरक म्हणून निवड करण्यात आली. त्या पुढीलवर्षी तालुकास्तरावर तज्ञ प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. सुमारे 40-50 शिक्षक त्या प्रशिक्षणाला उपस्थित असावेत. या प्रशिक्षणाआधी अनेकदा तज्ञ मार्गदर्शक म्हणून मी काम केले होते. मात्र मूल्यवर्धन प्रशिक्षणात व आधीच्या इतर प्रशिक्षणांत मला कमालीचे वेगळेपण मला दिसून आले. हे प्रशिक्षण सर्व प्रशिक्षणार्थी स्वयंप्रेरणेने घेत असल्याचे मला जाणवले. या प्रशिक्षणात शिकवित असलेले सहयोगी खेळ, कृतीयुक्त गीते व मैदानावर करावयाच्या विविध कृती हे सर्व प्रशिक्षणार्थी आपले वय किंवा शिक्षकीपेशा विसरून तल्लीनतेने करीत असत. प्रशिक्षण स्थळावरून वेळ संपण्यापूर्वी जाण्याची घाई कोणीही करीत नसत. या पूर्वीच्या प्रशिक्षणाच्या अगदी उलट हे चित्र होते.
मूल्यवर्धन कार्यक्रम हा विद्यार्थी हिताचाच आहे, ही भावना त्या मागे असावी. आधी झालेल्या कंटाळवाण्या शैक्षणिक प्रशिक्षणापेक्षा या प्रशिक्षणात शिक्षक रममाण झाल्याचे मी पाहिले आहे. हे सर्व प्रशिक्षण स्वयंकृतीवर आधारित व ppt द्वारे असल्याने हा बदल असावा, असे मला वाटते. मूल्यवर्धन प्रशिक्षणात शिकलेल्या अनेक बाबींचा शाळेत उपयोग करू लागल्याने मुलांना हाताळण्याचे, त्यांना शाळेची गोडी लावण्याचे अनेक उपक्रम मला मिळाले. ‘शांतता संकेत’ ही तर एक अफलातून कृती आहे. फक्त हात वर करताच वर्ग एकदम शांत. वर्गात मुलांना बसविण्याच्या वर्तुळाकार किंवा अर्धवर्तुळाकार पद्धतीचा वापर केल्याने सर्व वर्गाशी एकरूप होता आले. मुलांनासुद्धा गुरुजी आपल्यातीलच एक असल्याचे वाटले असावे. त्यांना वाटणारी गुरुजींची भीती नाहीशी झाली. मुले बोलायला लागली, कृती करायला लागली, न चुकता शाळेत यायला लागली. हा बदल मूल्यवर्धन कार्यक्रमामुळेच झाला, असे माझे ठाम मत बनले आहे.
या वर्षी जून महिन्यात मूल्यवर्धन आढावा सभेकरिता पुणे येथे जाण्याचा योग आला. संपूर्ण महाराष्ट्रातून 10-12 जण आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. ज्यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व DIECPD मधील साधनव्यक्ती यांचा समावेश होता. तिथे नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली. टाटा ट्रस्ट, महाराष्ट्र विद्याप्राधिकरण व शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित होते. सर्व उच्च स्तरीय अधिकारी असूनही आमच्या सारख्या रूट लेव्हलवर काम करणाऱ्या लोकांना त्यांनी दिलेली सौजन्याची व आपुलकीची वागणूक पाहून मी भारावून गेलो.
शाळा स्तरावर काम करताना आलेले अनुभव, समस्या किंवा सल्लासुद्धा मोकळेपणाने कथन करता आला. मूल्यवर्धन कार्यक्रमाची मिमांसा करण्याच्या वरीष्ठ पातळीवरील एक सभेचा मी घटक होतो, हे आठवले की मी रोमांचित होतो. हा मूल्यवर्धन कार्यक्रम असाच अखंड सुरू रहावा व विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासूनच संविधानिक मूल्ये रुजावित हीच सदिच्छा.
-श्री. रुपसेन गायकवाड
मूल्यवर्धन आणि मी
-श्री. रुपसेन गायकवाड
मी आणि मूल्यवर्धन
सामाजिक विघटनाचे विघातक परिणाम जाणवू लागल्यावर आता आपण समाजातील चुकांची कारणे शोधू लागलो. सर्वत्र संकट, गोंधळ, भीती, हिंसा हे शब्द दैनंदिन व्यवहारात ऐकायला मिळतात, तेव्हा नैतिकता, मूल्य, यांचे महत्त्व, गरज जाणवते.
आजचे बालक उद्याचे सुजाण नागरिक आहेत. ’भविष्यात चांगला व्यक्ती म्हणजे जबाबदार, समंजस, सुजाण नागरिक होण्यासाठी मूल्यवर्धन उपक्रम मोलाची मदत करतात. या उपक्रमांमुळे जि. प. उ. प्रा. शा. सुरादेवी येथील माझ्या विद्यार्थ्यांनी विविध मूल्ये व कौशल्ये आत्मसात केली. जोडीचर्चा, अनुभवलेखन व सहभागिता यांमुळे त्यांच्यात खालील बदल झालेले दिसतात.
मुले स्वतंत्रपणे विचार करतात. आपली मते निर्भिडपणे मांडतात. सत्य बोलतात. आपसांत चर्चा करतात. इतरांची काळजी घेतात. दुसऱ्यांच्या मतांचा आदर करतात. भांडणे, मारामारी बंद झाली. शांतता संदेशामुळे ओरडावे लागत नाही. अनुभवांची नोंद घेतात. पायाभूत नियम तयार करतात. सहाध्यायाची निवड करतात. चित्र काढणे, गाणे, अभिनय , व खेळ, नक्षीकाम या बाबींच्या शिकण्यातून ते इतरांशी बोलणे, वागणे, सदाचार, ज्ञान अंगीकारणे, शिकले. मूल्यवर्धन शालेय विषयांशी जोडल्याने लादलेले शिक्षण नाही. सर्वांना मनापासून आवडते. उपक्रमांचा कंटाळा नाही. म्हणून मोकळया वातावरणात चांगल्या नागरिकाचे आपल्या मनात असणारे गुण सहज व कायमरूपी रूजण्यास मदत होते.
हाताची पाचही बोटे सारखी नसतात. तसेच प्रत्येक मूल सारखे नसते. त्यांच्यात तुलना करू नये. मुलांना हसत बागडत नवनवीन शिकायला आवडते. ती जिज्ञासेपोटी अनेक प्रश्न विचारतात. उत्साहाने, शंकानिरसनाने योग्य संधीने सकारात्मक विचार वाढीस लागते. मुले विनाशिक्षा शिस्तीत राहतात. ते भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील नागरिक बनण्यास, संवैधानिक मूल्ये व त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी नियोजित संधी मूल्यवर्धन उपक्रमांनी दिली.
इयत्ता पहिलीपासूनच राज्यघटनेतील मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न मी करीत आहे. मूल्ये शिकवली जात नाही तर ती रुजवली जातात. कारण ‘मी ऐकून शिकत नाही, पाहूनही शिकत नाही, पण कृतीतून शिकतो.’ मुलांचा सर्वांगीण विकास घडवणारा हा उपक्रम आहे. समग्र शाळा दृष्टीकोन अंगीकारून शाळांच्या गरजा, उपलब्ध साधनसामग्री, बदल लक्षात घेऊन लवचिकता असणारा उपक्रम म्हणजे मूल्यवर्धन. मला वाटते…
मनी स्वप्न नवे आनंदाचे,
जीवनगाणे हे जगण्याचे,
गुढ जाणावे परिवर्तनाचे,
रूप वेगळे हे मूल्यवर्धनचे.
-उर्मिला राऊत
मी आणि मूल्यवर्धन
-उर्मिला राऊत
मूल्यर्धन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे स्वयंअध्ययन
मूल्यर्धन पुस्तिकेमुळे शिक्षक-विद्यार्थी अंतरक्रियेमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होण्यास मदत होत आहे.
मूल्यवर्धन पुस्तिका विद्यार्थ्यांच्या हाती दिल्यानंतर त्यांनी वर्गशिक्षकांच्या साह्याने निरीक्षण केले. त्यात दिलेल्या सोप्या शब्दरचनेमुळे विद्यार्थ्यांना सर्वसामान्य पातळीतून निश्चित उद्दिष्टपूर्तीकडे अध्ययन करण्यास मदत झाली. कठीण वाटणाऱ्या भागावर विद्यार्थ्यांनी गटचर्चा केली. शिक्षकांनी त्यांचे सतत निरीक्षण करून मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांना जोडाक्षर, गणिती संकल्पना, वैज्ञानिक, भौगोलिक, ऐतिहासिक माहिती व भाषा विषयक वाचन लेखन इ. बाबी स्वतःहून शिकण्याची आवड निर्माण झाली.
पुस्तकात दिलेले भाग मुलांच्या वर्गातील अभ्यासाच्या अनुषंगाने आहे. त्यात कमीत कमी आवश्यक क्षमता विद्यार्थ्यांच्या अंगी विकसित व्हाव्यात अशा रीतीने स्वाध्याय दिलेत. मुलांना पुस्तके दिल्याने पालकांनाही घरी आपल्या पाल्यांना अभ्यास करून देण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांना विषयाची आवड निर्माण झाली. समजपूर्वक उत्तर लिहिणं त्यांना जमू लागले. गणिताचा सराव करण्यास मदत झाली, गणित विषयाची ज्या मुलांना भीती वाटायची, त्यांना त्यात आवड निर्माण झाली.
पुस्तकांचा आकार व अक्षर अध्ययनास अनुरूप वाटले. एकंदरीत मूल्यवर्धन पुस्तिकेचा उपयोग बहुआयामी वाटला. विद्यार्थ्यांना स्वतःहून अभ्यास करण्याची आवड निर्माण झाली. स्वयंअध्ययनास अनुकूल ही पुस्तिका आहे. शाळेतील हुशार मुले या पुस्तिकेमुळे त्यांच्यापेक्षा अभ्यासात मागे असणा-या मुलांना सहकार्य करून स्वयंअध्ययन करताना दिसतात. अशाप्रकारे मूल्यर्धन पुस्तिकेचा छान उपयोग आमच्या शाळेत होत आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गानुसार क्षमता विकसित करण्यास फारच उपयोगी वाटत आहे. वर्गशिक्षकांना याचा फारच उपयोग झाला. नियमित अध्यापन व अप्रगत मुलांना प्रगत विद्यार्थ्यांच्या बरोबर आणण्यास मदत झाली. शिक्षक-विद्यार्थी आदानप्रदान करणे सोपे झाले.
-अरुण आदमाने
मी आणि मूल्यवर्धन
-अरुण आदमाने
ढासळलेली नितीमत्ता आणि मूल्यवर्धन
भारतासारख्या विशाल देशात मूल्यवर्धनची नितांत आवश्यकता आहे . आपण आपल्या अवतीभोवती नजर टाकली तर आपणांस असे दिसून येते की, समाजातील नितीमत्ता ढासळत आहे. मानव सामाजिक जाणीवा विसरत चालला आहे. आपण ज्या भूमीत जन्म घेतला त्या मातृभूमीचे काहीतरी देणे लागतो, ही भावनाच रसातळाला गेलेली आहे. प्रत्येकजण मला कोठून काय घेता येईल, एवढाच विचार करताना दिसतो आणि मग विशाल जगच स्वार्था पोटी अंध झालेले आहे याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. आपण सर्वांनी महाभारत पहिले आहे. जसे द्रौपदीच्या वस्त्रहरणाने सर्वनाश ओढवला, त्याप्रमाणे नैतिकता लयास गेली तर, मानवाचा विनाश अटळ आहे. ज्ञान हा जीवनाचा पाया आहे. शिक्षणाने माणूस शिक्षित होतो, पण सुसंस्कृत नाही.
बालपण हे संस्कार रुजवण्याचे व नवचैतन्य फुलवण्याचे प्रमुख केंद्र आहे. बालमनावर झालेले संस्कार चिरकाल टिकतात. आजचा बालक उद्याचा देशाचा कर्णधार आहे. हा नागरिक सुजाण व सुसंस्कृत असायला पाहिजे, कारण त्याच्या खांद्यावर देशाचा भार आहे. देशाचा भार पेलण्याइतकी शक्ती त्याच्यात निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याला मी कोण आहे? माझ्याकडे कोणत्या क्षमता आहेत? माझी जबाबदारी काय? याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. यासाठी मूल्यवर्धन उपक्रमाची आवश्यकता आहे एवढेच नव्हे तर ती काळाची गरज आहे.
मूल्ये शाळेत शिकवली जात नाहीत, तर अनेक प्रसंगातून विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जातात. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबविलेल्या उपक्रमांमुळे मुलांना लहान वयातच वेळेचे महत्त्व कळले. त्यामुळे त्यांच्या भावी जीवनात प्रत्येक काम वेळेवर करण्याची सवय लागेल. मुलांनी स्वतः तयार केलेल्या नियमांचे पालन तंतोतंत करतात. त्यामुळे शाळेच्या वातावरणात बदल झालेला आहे. विद्यार्थी दररोज वेळेवर स्वच्छ गणवेषात शाळेत येतात. प्रत्येकाला वाटून दिलेल्या कामानुसार प्रत्येकजण आपली जबाबदारीचे कटाक्षाने पालन करतो. भविष्यात चांगला नागरिक होण्यासाठी आवश्यक मूल्यांची माहिती विद्यार्थ्यांना या उपक्रमातून होत आहे. उदा. ‘माझे मत’ हा उपक्रम घेतला. त्यातून मुलांना मतदान कसे करायचे, याबाबत माहिती मिळाली.
इतरांच्या संवादामध्ये बोलणारी मुले आता त्यांचे बोलणे शांतपणे, लक्षपूर्वक ऐकतात आणि नंतर स्वतः चे मत विचारपूर्वक व्यक्त करतात. म्हणजेच त्यांच्या विचारशक्तीला मूल्यवर्धन उपक्रमामुळे चालना मिळाली. मानवी मताचा आदर केला पाहिजे, हे त्यांना पटले. प्रत्येक प्रसंगावर प्रत्येक मुलाला बोलण्याची संधी दिल्यावर अभिव्यक्ती कौशल्य वृद्धींगत होण्यास मदत झाली. मुले प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून सहभागी होऊ लागली. आपले मत स्वतंत्रपणे मांडू लागली. त्यामुळे त्यांच्यात सभाधीटपणा आला. विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये जवळीकता निर्माण झाली. प्रत्येक बाबीचा आपल्या अनुभव विश्वाद्वारे स्वतंत्र विचार करू लागली.
मूल्यवर्धन उपक्रमातील सहयोगी खेळ म्हणजे आनंदाची पर्वणीच! या खेळांमुळे सहकार्य वृत्ती वाढीस लागली. मुलांमध्ये कमालीचा जिव्हाळा निर्माण होण्यासाठी मदत झाली. बंधुत्वाची भावना वाढीस लागून ज्ञानाला व्यावहारिकतेची जोड मिळाली.
गटचर्चा व जोडीचर्चा करून योग्य निर्णयाकडे वाटचाल करू लागली. एकंदरीत मानव सभ्य व सुसंस्कृत, नितीमान व्हावा, यादृष्टीने मूल्यवर्धन उपक्रमाची उपयुक्तता अन्यन्य साधारण आहे. हा उपक्रम वेचक असून रोचकही आहे.
‘करण्यास संकटाशी झुंजार सामना संकल्प तो मनाचा बलवान पाहिजे. नसले जरी तयाला पांडित्य पुस्तकी माणूस मनाने शीलवान पाहिजे.’
वरील ओळींतून मुलांमध्ये संकटाशी दोन हात करण्यासाठी मनोबल असणे आवश्यक आहे. एकवेळ पुस्तकी ज्ञान कमी असले तरी चालेल. पण माणूस हा सदवर्तनी असावा. अशी शीलवान भावी पिढी या उपक्रमातून निश्चितच घडू शकेल असा आशावाद व्यक्त करते. ‘स्वतःला फुलवा, स्वतःला घडवा’ असे सांगणारा हा मूल्यवर्धन उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आहे.
-रंजना कडू
ढासळलेली नितीमत्ता आणि मूल्यवर्धन
-रंजना कडू
भाषा, गणित सह सर्व विषय सोपे झाले
मूल्यवर्धन कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या वर्तणुकीत असामान्य सकारात्मक बदल होत असून भावी सुजाण व जबाबदार नागरिक घडविण्यासाठी हा उपक्रम सतत सुरु असावा, असे वाटते.
मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविताना छान बदल अनुभवायला मिळाले. आमची शाळा दुर्गम, आदिवासी भागातील असून आदिवासी विद्यार्थी आहेत. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात व एकंदर परिस्थितीत सकारात्मक बदल घडवून आणणे जरा जिकीरीचेच काम होते. कारण पालकांना शिक्षणाचा फारसा गंध नाही, गरिबीमुळे व कामामुळे मुलांकडे वैयक्तिक देणे शक्य नाही, परिणामी मुलांना योग्य वळण नाही आणि मुख्य म्हणजे याबद्दल जाणीवही नाही. या सर्व समस्या असून यात बदल करणे आम्हा शिक्षकांना आद्यकर्तव्य वाटले. यासाठी स्वयंशिस्त व योग्य परिवर्तन यादृष्टीने आम्ही मूल्यवर्धन उपक्रमांचे आयोजन करुन ते शक्य तेवढ्या प्रभावीपणाने राबविण्याचा प्रयत्न केला. हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होत असून आम्ही योग्य दिशेने प्रवास करीत असल्याचे समाधान आहे.
भारत देशाचे सुजाण व जबाबदार नागरिक घडविताना मूल्यवर्धन उपक्रमांची मोलाची साथ मिळते.
-योगेश जानरावजी भुरसे
भाषा, गणित सह सर्व विषय सोपे झाले
-योगेश जानरावजी भुरसे
मूल्याचे वर्धन म्हणजे मूल्यवर्धन कार्यक्रम
मूल्यवर्धन कार्यक्रमाधारे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, मानसिक, बौद्धिक योग्य वर्तन बदल घडून आले.
आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोटगाव, केंद्र- आपतूर, ता. उमरेड, जि. नागपूर येथे मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या वर्ग उपक्रमांचे आयोजन सुरू झाले आणि अध्ययन अध्यापनास एक नवी दिशा मिळाली. यात असणारे वर्ग व शालेय पातळीवरील उपक्रम विद्यार्थ्यांत एक नवीन चैतन्य निर्माण करुन प्रभावी अध्ययनास उपयुक्त ठरले. उपक्रम पुस्तिकेच्या पाच विभागाच्या आधारे उपक्रमाचे नियोजन करण्यात आले.
विभाग १ : मी आणि माझ्या क्षमता या उपक्रमातून विद्यार्थी स्वत:विषयीची माहिती सांगू लागले. तसेच विद्यार्थ्यांनी इतरांची ओळख करून घेतली. आपल्या स्वतःच्या भावनांवर विद्यार्थी उपक्रमातून नियंत्रण ठेवायला शिकले. परिसर व परिसरातील घटकाविषयी मतेसुदधा मांडायला लागले. स्वजाणीव व स्वव्यवस्थापन यातून प्रकट झाले.
विभाग २ : माझ्या जबाबदाऱ्या या विभागातील उपक्रमाच्या आधारे विद्यार्थी सुरक्षा, इतरांचे कल्याण, योग्य-अयोग्य वर्तन, खरे बोलण्याचे महत्त्व आणि नैतिक निर्णय कसे घ्यायचे हे शिकले. त्यांनी स्वतःबद्दलच्या, घराच्या आणि शाळेच्या जबाबदाऱ्या ओळखल्या.
विभाग ३ : माझे नातेसंबंध या विभागातील उपक्रमाच्या आधारे इतरांना सहकार्य करणे, गरज पडेल तेव्हा मदत देणे किंवा घेणे, सहसंवेदना, सुसंवाद, सुसंवादी नातेसंबंध, इतरांबद्दल आस्था, मानवी प्रतिष्ठेचा आदर इत्यादी बाबी विद्यार्थ्यांच्या आचरणात दिसून आल्या. मैत्रीचे परिणाम ओळखायला शिकले.
विभाग ४ : मी आणि आपले जग या विभागाच्या आधारे पर्यावरण रक्षणाची जाणीव, सामाजिक हिताचा विचार करणे, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेणे इत्यादी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेतल्या. आपण सगळे कसे परस्परांवर अवलंबून आहोत याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.
विभाग ५ : सहयोगी खेळ यातून आपुलकी, जिव्हाळा निर्माण होऊन मनोरंजनातून अध्ययन अगदी सुलभपणे घडून आले. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या आधारे स्वातंत्र, न्याय, समता, बंधुता ही संविधानातील मूल्ये दैनंदिन व्यवहारात उपयोगी ठरली व त्याप्रमाणे मानवी प्रतिष्ठेचा आदर, स्वायत्तता, जबाबदारी, चिकित्सक आणि सर्जनशील विचार, विविधतेचा आदर, सुसंवादी नातेसंबंध, इतरांबद्दल आस्था, सक्रिय योगदान असा बदल विद्यार्थ्यांच्या वर्तनात दिसून आला. मूल्यवर्धनातून खरच मूल्यांचे वर्धन झाले असे मला वाटते.
-यशवंत वैद्य
मूल्याचे वर्धन म्हणजे मूल्यवर्धन कार्यक्रम
-यशवंत वैद्य
मूल्यवर्धन उपक्रमांनी शाळेत झालेला बदल
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे आमच्या शाळेत कोणते बदल झाले याविषयी माहिती खालीलप्रमाणे देत आहे.
मी या शाळेत 2009 साली मुख्याध्यापक म्हणून रुजू झालो. त्यावेळची परिस्थिती आणि सध्याची परिस्थिती यात खूप बदल झालेला मला जाणवतो. मागील दोन वर्षांपासून माझ्या शाळेत या उपक्रमाला सुरूवात झाली. शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमाचे प्रशिक्षण घेऊन, माझ्यासह सर्वांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. आम्ही मुलांमध्ये असलेल्या विविध सवयीचा प्रथम आढावा घेतला. त्यात चांगल्या आणि वाईट सवयींचा समावेश होता. मुलांमधील चांगल्या सवयी कशा विकसित करता येतील, यासाठी मी सहकाऱ्यांसह मूल्यवर्धन कार्यक्रमातील विविध उपक्रम राबविले. उदा. चित्रकला, गायन, नृत्य, विविध क्रिडा यातून विविध चांगले गुण विकसित झाले. त्यांच्यात मैत्रीभावना वाढीस लागली. शाळा आणि शिक्षकांविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याचा फायदा घेत आम्ही सर्व शिक्षकांनी गावात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. सर्व मुलांना वृक्ष वाटून देऊन संगोपन करायला शिकविले. उन्हाळी सुट्टीच्या दिवसांत मुलांनी पाणी देऊन झाडे जगविली. शाळा आणि परिसर हिरवागार राहिला. शालेय पोषण आहारासाठी, मुलांनी भाजीपाल्याची रोपे लावून परसबाग तयार केली. तेथील भाजीपाला आम्ही शाळेत पोषण आहारात वापरतो. दरवर्षी 26 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. त्यात सर्व मुले सहभागी होतात. गावकरी सहभागी होतात. विद्यार्थ्यांना बक्षीस देतात. दरवर्षी होणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेत शाळेतील मुलामुलींचे संघ सहभागी होतात. कबड्डी आणि आट्यापाटया खेळात माझ्या शाळेतील संघांनी जिल्हास्तरावर बक्षिसे जिंकलेली आहेत. त्यासाठी सर्व शिक्षकांनी जिवापाड मेहनत घेतली. हा सर्व बदल माझ्या शाळेत राबविण्यात आलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे झाला, असे मला वाटते. मुलांमध्ये सहकार्य, सचोटी, परोपकारी वृत्ती, शिक्षकाविषयी आदर, शाळेविषयी प्रेम, आस्था, चांगल्या सवयी या मूल्यवर्धन कार्यक्रमाची देण आहे असे मला वाटते.
-रमेश गौरखेडे
मूल्यवर्धन उपक्रमांनी शाळेत झालेला बदल
-रमेश गौरखेडे
मूल्यवर्धनची आवश्यकता
सध्या सर्वांचे जीवन अतिशय धवपळीचे झाले आहे, तसेच टीव्ही, सोशिअल मीडिया या साधनांमुळे आणि कामाच्या व्यापामुळे पालक आपल्या पाल्यांना पूर्वी सारखे शिस्त, चांगल्या सवयी लावताना दिसत नाहीत. यातच मोबाईलमुळे लहान मुले, पालक मग्न असतात. याचा परिणाम असा झाला की, विद्यार्थी लहान वयातच बंडखोर, रागीट, चिडचिडा, असहिष्णु बनत आहेत.
आज समाजात बऱ्याच अशा घटना घडत आहेत की, जिथे गुन्हेगार हा बालगुन्हेगार असतो. त्यामुळे भारतीय रूढ़ी परंपरा, नितिमुल्यांचा ऱ्हास होताना दिसत आहे. वरील सर्व गोष्टींवर एकच उपाय आहे, तो म्हणजे मूल्यवर्धन. कारण मूल्ये ही विकत घेता येत नाहीत, तर ती मनामध्ये रुजवावी लागतात. माझ्या शाळेत मी मूल्यवर्धन तासिकांमध्ये विद्यार्थ्यांना निदान चांगल्या सवयी, संयम, स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठेचा आदर, श्रमप्रतिष्ठा, नातेसंबंध जोपासणे, जबाबदारीची जाणीव, आदर, प्रामाणिकपणा ही मूल्ये शाळेत शिकवित आहे. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये हळूहळू बदल दिसून येत आहेत. वर्गात मुलांना कोणतीही वस्तू सापडली तरी, मुले ती शिक्षकांकडे आणून देतात. विद्यार्थी जेवनाअगोदर हात स्वच्छ धुतात. स्वतःचे काम स्वत: करतात, नेहमी रांगेत उभे राहतात, वर्गात गोंधळ घालत नाही, एकमेकांना मदत करतात. वर्गनियमामुळे शिस्त निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड़ निर्माण झाली. तसेच विद्यार्थी आता नियमित शाळेत येतात.
-मधुकर विश्वनाथ मडावी
मूल्यवर्धनची आवश्यकता
-मधुकर विश्वनाथ मडावी
माझी मूल्यवर्धित शाळा
मूल्य शिकविली जात नाही तर ती रुजवावी लागतात. यातूनच मला एक मार्ग सापडला तो म्हणजे मूल्यवर्धन उपक्रमाचा. त्यामुळे माझी शाळा मूल्यवर्धित झाली.
शालेय शिक्षण ज्ञानरचनावादावर आधारित बालस्नेही, आनंददायी, विद्यार्थीकेंद्रित होण्यासाठी मूल्यवर्धन अधिक उपयोगी पडते. मूल्यवर्धन अंतर्गत मी एक उपक्रम घेतला तो म्हणजे ‘शांतता संकेत’ या उपक्रमाचा फायदा मुलांना मोठे झाल्यावर समाजात नक्कीच होईल यात शंका नाही. वर्ग नियम या उपक्रमामधून विद्यार्थी स्वतः जबाबदारीची जाणीव ठेवून वागत आहेत. स्वत: नियम बनविल्यामुळे मुलांची स्वतः विषयीची जाणीव अधिक समृद्ध झाली. मुले स्वतंत्र विचार करु लागली. स्वत: जबाबदारीने वागू लागली. स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी मूल्यवर्धन निश्चितच उपयोगी आहे.
मूल्यवर्धन उपक्रम राबविताना सर्व मुलांना विद्यार्थी उपक्रम पुस्तिका व शिक्षकांना शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका वर्गवार पुरविण्यात आल्या. विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेत स्वाध्यायावर आधारित उपक्रम दिलेले आहेत. ते सोडविताना मुलांना आनंद वाटतो. राज्यघटनेतील मूल्ये रुजावित यासाठी गोष्टी रूपातून मूल्ये रुजविण्याचा छान प्रयत्न केलेला आहे. मूल्यवर्धित उपक्रमामधून प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे साध्य होताना दिसतात.
मूल्यवर्धन उपक्रम आणि पाठ्यक्रम यांचा सहसंबंध दिसून येतो. सहयोगी अध्ययन हा घटक बी. एड. च्या अभ्यासक्रमात आहे. परंतु कोणीही यानुसार अध्यापन केलेले मला आठवत नाही. आता मूल्यवर्धन उपक्रमातून सहयोगी अध्ययन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे. मुलांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी नियोजित अशा संधी मूल्यवर्धन उपक्रमातून उपलब्ध होताना दिसून येतात. मूल्यवर्धन उपक्रम राबवत असतानाच ‘सहयोगी खेळ’, ‘सहयोगी अध्ययन’, ‘जोडीचर्चा’, ‘गटचर्चा’ इत्यादी उपक्रमाची सांगड घालून अभ्यासक्रमाला जोड देता आली. अभ्यास करून घेताना नकळत याचा फायदा झाला. मूल्ये ही शिकविली जात नाही तर ती रुजवावी लागतात. आणि अशा प्रकारे माझी शाळा मूल्यवर्धित झाली.
-विजय चिलबिले
माझी मूल्यवर्धित शाळा
-विजय चिलबिले
मी आणि मूल्यवर्धन : अनुभव कथन
सन २०१७-१८ पासून जि. प. नागपूरच्या जि. प. शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. हा कार्यक्रम राबविताना माझ्या शाळेतील मुलांमध्ये ‘जबाबदारी’ या मूल्याची रूजवणूक होण्यास मदत झाली. इयत्ता तिसरीतील ‘सुरक्षिततेचे नियम पाळणे’ या उपक्रमातून नियम तोडले तर काय होईल, याची जाणीव मुलांना समजून आली. कारण आमच्या शाळेला लागून तुमसर -रामटेक रस्ता आहे.
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्या संबंधित कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे, हा उद्देश समोर ठेवून शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी मूल्यवर्धन कार्यक्रम सन २०१७-१८ या सत्रापासून नागपूर जिल्ह्यात सुरू केला आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५, शिक्षण हक्क कायदा २००९, आणि प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ यावर आधारित मूल्यवर्धन कार्यक्रम इयत्ता पहिली ते चौथीच्या उपक्रम पुस्तकातील उपक्रम विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. शिक्षिका म्हणून वर्गात उपक्रम राबविताना मला नक्कीच सकारात्मक बदल दिसून आले. मूल्ये शिकवली जात नाहीत, तर ती नियोजित उपक्रमातून आनंददायी पध्दतीने रुजवली जातात हे मूल्यवर्धन कार्यक्रमाचे वैशिष्ट्य विद्यार्थी वर्तणुकीतून स्पष्ट होत आहे. सुप्तगुण सर्वांमध्ये असतात. ते सादरीकरणाचे माध्यम मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले आहे. स्व अभिव्यक्ती, गोष्टी, प्रसंग, गाणी, कविता, नाटिका/नाट्यछटा, कला आणि हस्तकला, भूमिका अभिनय या प्रकारांमुळे मूल्यवर्धन उपक्रम राबविताना प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित असतो. त्यामुळे लाजरेबुजरे, स्वमग्न विद्यार्थी ही आवडीने उपक्रमात सहभागी होतात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.
सहयोगी अध्यापन पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांचे विचार समजून घेण्याची व एकमेकांच्या विचारांचा स्वीकार करण्याची वृत्ती वाढीस लागते. उपक्रम जोडीचर्चा, सामुदायिक वर्तुळ, गटचर्चा, याद्वारे घ्यायचे असल्याने विद्यार्थ्यांना एकटे पडण्याची भीती वाटत नाही. ते आपल्या मित्रांशी संवाद साधू शकतात. इयत्ता दुसरीतील उपक्रम ‘पोळी आणि भाजी संवाद’ मी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांद्वारे सादर केला. तो पालकांना अतिशय आवडला. इयत्ता पहिलीतील ‘माझा आनंद’ उपक्रमात आकाशाकडे बघून दोन्ही हात वर करून मोठमोठ्याने, मोकळेपणाने हसताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद शिक्षिका म्हणून मलाही आनंद देऊन गेला. रागावर नियंत्रण ठेवल्याने आपले किती फायदे होतात, याची जाणीव मुलांना मूल्यवर्धन उपक्रमातून होते. सहयोगी खेळातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाशी निगडित गोष्टींचा सराव झाल्याने अभ्यासाचा ताण विद्यार्थ्यांना जाणवत नाही. संख्या मिळवून पुढील संख्या सांगण्याचा खेळ यामुळे गणित विषयाची गोडी व संख्या दृढ होण्यास मदत झाली. रिकाम्या वेळेत करावयाचे उपक्रम या विभागातील प्रश्न बुध्दीला चालना देणारे असल्याने विद्यार्थ्यांना विचार करण्याची सवय लागली. या कार्यक्रमाने इयत्ता पहिलीपासूनच भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, नाय, समता, बंधुता ही चार मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी विशेष मदत होत आहे आणि ते ही आनंददायी पध्दतीने.
-मीना शामकुवर
मी आणि मूल्यवर्धन : अनुभव कथन
-मीना शामकुवर
कार्य करताना विचाराअंती प्रत्यक्ष कृती
आपल्या देशाच्या संविधानामध्ये जी पाच मूल्ये (न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधूता, धर्मनिरपेक्षता) समाविष्ट आहेत, त्याला अनुसरून आज मूल्यवर्धन शिक्षणाची नितांत गरज आहे. कारण नितीमूल्य नष्ट होत असल्याचे विदारक चित्र आपण समाजामध्ये पाहत आहोत. म्हणून ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थांना देशातील सर्व शाळेत मूल्यवर्धन शिक्षणाची काळाची गरज आहे.
आपल्या देशाचे संविधान लोकशाही प्रधान असून न्याय, स्वातंत्र्य, बंधूता, समता, धर्मनिरपेक्षता या पाच तत्त्वांवर देशाची लोकशाही प्रणाली टिकून आहे, आज देशाच्या लोकशाहीचे मार्गक्रमण धोकादायक परिस्थितीमध्ये जात असल्याचे विद्रारक चित्र प्रत्यक्ष पाहत आहोत. हे चित्र नष्ट करायचे असेल तर, आज देशातील प्रत्येक शाळेत मूल्यवर्धन शिक्षणाची नितांत आवश्कता आहे. त्या अंतर्गत मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे बालकांमध्ये सुसंस्कार घडवून त्यांच्या जीवनाला शिस्त लावून त्यांचे जीवन उज्ज्वल करून जीवन जगण्याचे सामर्थ्य निर्माण करू शकतो.
मी माझ्या शाळेत मूल्यवर्धन शिक्षण सुरू करण्याआधी समाजाला पर्याने पालकांना पटवून देण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत यांच्या संयुक्त सभेचे आयोजन व नियोजन करण्यात आले. मूल्यवर्धन शिक्षणाची गरज का आहे? या विषयावर कार्यशाळा व मार्गदर्शन घेण्यासाठी मूल्यवर्धन प्रेरक मा. श्री. अशोक कडू सर, केंद्रप्रमुख श्री. गजभिये सर ह्यांची मदत घेण्यात आली.
शाळेमध्ये प्रत्यक्ष राबविताना पाच वर्षांपासून मूल्यवर्धन अनुसरून दोन उपक्रम
(१) आई, वडिलांना नमस्कार करणे,
(२) शाळेत येताना व जाताना शिस्तीने डाव्या बाजूने चालणे.
या दोन उपक्रमांचे फलित मुख्यध्यापक श्री. योगेश पराते यांनी सांगितले की, मी हे उपक्रम १० वर्षांपासून राबवत आहे. त्या उपक्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना, पालकांना पटवून देताना आई , वडिलांचा दैनंदिन नमस्कार घेऊन आशीर्वाद घेणे, त्यामुळे आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करता येऊ शकते. आपल्या प्रत्येकासाठी आई, वडिलांचा आशीर्वाद हा सर्वात मोठा आहे हे पटवून दिले. त्याचा प्रत्यय असा की सर्व विद्यार्थी आई, वडिलांचा आशीर्वाद घेऊन येत आहेत. त्यामूळे त्यांचे सुसंस्कारीत, शिस्तमय जीवन जगण्याचा मार्ग प्रबल होताना दिसत आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष विचार विनिमय करून कृती करताना दिसत आहेत. मूल्यवर्धन शिक्षणाअंतर्गत विद्यार्थांमध्ये त्यांच्या वर्तानामध्ये बदल दिसून येत आहे. या उपक्रमामुळे प्रत्यक्ष कृती करत असल्याने कुटुंबामध्ये पर्यायाने समाजामध्ये वावरताना घेतलेल्या ज्ञानानुसार वर्तनीय बदलाची कृती करताना दिसत आहेत. त्यामुळे शालेय, कौटुंबिक पर्याने समाजामधील सुसंस्कारित वातावरण होण्यास मदत होत आहे. या मूल्यवर्धन शिक्षणामुळे माझ्या शाळेतील शिस्त आणि त्यावर भिस्त राखण्यास मदत होत आहे. पूर्णपणे शालेय वातावरण व शैक्षणिक वातावरण विद्यार्थी प्रत्यक्ष कृती विचार करण्याची क्षमता विकसित झाल्याने शालेय वातावरणात सुसंस्कारित आनंदाची भर पडली आहे. आज मला निश्चित सांगता येईल की, आपल्या देशातील नितीमूल्य टिकवयाची असतील तर देशातील प्रत्येक शाळेत मूल्यवर्धन शिक्षण आवश्यक करणे हि काळाची गरज आहे. –
-योगेश्वर पराते
कार्य करताना विचाराअंती प्रत्यक्ष कृती
-योगेश्वर पराते
मी आणि मूल्यवर्धन !
मूल्यवर्धन उपक्रम राबवताना मला स्वतःमध्ये जाणवलेले बदल सांगण्याचा प्रयत्न करतो.
पहिल्यांदा ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रमाचे नाव ऐकले, तेव्हा मूल्यशिक्षणाप्रमाणेच हे काहीतरी प्रकरण असावे, असा कयास होता. परंतु प्रत्यक्ष या कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाला जेव्हा काटोलमध्ये सुरुवात झाली, तेव्हा लगेच काहीतरी वेगळेपणा असल्याचे जाणवले व ‘नेहमीप्रमाणेच आणखी एक प्रशिक्षण’ एवढेच हे मर्यादित नसल्याचे लक्षात आले. जोडीचर्चा, गटचर्चा या प्रात्यक्षिकातून संपूर्ण मूल्यवर्धन प्रशिक्षण पार पडले, तेव्हा चारच दिवसांत स्वतःमध्ये झालेला बदल जाणवला. ‘एकावेळी एकानेच बोलावे, इतरांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकावे व मग विचार करून आपले मत मांडावे’ ही साधी, कित्येकदा ऐकलेली पण लोकशाहीत अत्यंत महत्त्वाची बाब आपण कधी ऐकली नव्हती असं नाही, पण अंगीकारली नव्हती. यासारख्या अनेक गोष्टी या प्रशिक्षणातून शिकायला मिळाल्या.
सहयोगी अध्ययन पद्धतीतून लहान मुलांनाही शिकवता येऊ शकते, यावर विश्वास बसत नव्हता. परंतु उपक्रम अंमलात आणल्यावर माझे पाहिलीचे विद्यार्थी चक्क गटचर्चा करायला लागले. भेटीला आलेल्या केंद्रप्रमुख, मूल्यवर्धनचे जिल्हा समन्वयक यांच्या समोरही त्यांनी न लाजता सादरीकरण केले व माझ्यातील शिक्षकाला मोठा आत्मविश्वास मिळाला.
आता पुढील टप्पा होता केंद्रातील इतर शाळांना मूल्यवर्धनचे प्रशिक्षण देणे. पण येथेही SMF ची प्रशिक्षणाची कार्यपद्धती पाहून कौतुक वाटले. प्रशिक्षणातील प्रशिक्षणवस्तू, पद्धती, सर्व मुद्यांचा क्रम, त्यासाठी लागणारी दृक-श्राव्य माहिती हे सर्व साहित्य अगदी काटेकोर नियोजनासकट तयार होते. त्यामुळे केंद्रस्तरावरील प्रशिक्षण १००% देण्यात आम्ही यशस्वी झालो व प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून त्याची पावतीही मिळाली.
मूल्यवर्धन एक कृतीयुक्त कार्यक्रम आहे. मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांना केवळ माहिती पुरवल्याने होऊ शकत नाही, तर संस्कार ही कृतीतून रुजवायची व सरावाची गोष्ट आहे. मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना अशा कृती करायची संधी वारंवार दिल्या जाऊ शकतात व लोकशाहीला आवश्यक जबाबदार नागरिक तयार केले जाऊ शकतात, याचा मला स्वानुभवावरून विश्वास वाटतो.
-निलेश पोपटकर
मी आणि मूल्यवर्धन !
-निलेश पोपटकर
विद्यार्थ्यांमध्ये दिसणारे स्पष्ट बदल
सहयोगी अध्यापन पध्दतीने मुलांमध्ये एकोप्याची, मदतीची भावना निर्माण झाली.
अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना भरपूर वेळ देता येऊ लागला. गट पाडून विद्यार्थ्यांकडून मूल्यवर्धनच्या विविध पध्दतीचा अवलंब करून विद्यार्थी प्रगत झाले. माझ्या वर्गातील नकुल दयाल पवार व कोमल गणेश चव्हाण हे विद्यार्थी अभ्यासात खूप मागे होते. त्यापैकी नकुल हा विद्यार्थी आज वर्गात सर्वात हुशार आहे. तसेच वर्गात मी नसतानाही वर्ग गृपमध्ये दिसेल. कोणी कोणाशी भांडणार नाही. आपल्या गृपमधील सहयोग्यास दिलेल्या अभ्यास पूर्ण करायला मदत करतात. माझ्या वर्गातील विद्यार्थी मी काही कामानिमित्त ऑफिसमध्ये गेलो तरीही माझे विद्यार्थी गोंधळ करणारच नाहीत. माझ्या वर्गात वर्गनियमानुसार सर्व विद्यार्थी वागतात. हे पाहून माझे सहकारी मला म्हणतात की, तुमचा वर्ग म्हणजे सेंट्रल जेल आहे की काय? एकही मुल वर्गाबाहेर जात नाही. माझा वर्ग मूल्यवर्धनचा वर्ग कशा पध्दतीने चालतो व त्यात काय असते हे त्यांना म्हणजे वर्ग 6-7 च्या शिक्षकांना समजावून सांगितले. बाकी 1-4 पर्यंतच्या वर्गात मूल्यवर्धन अध्यापन व्यवस्थित सुरू आहे.
आता वरील वर्गातील मुलांनासुध्दा मूल्यवर्धन उपक्रम सुरू करावेत. अजून एक बाब अशी की, माझ्या वर्गात चोरी झाली नाही. जर मैदानावर काही सापडले तर, ते न चुकता माझ्याकडे आणून देतात. मैदानावरील कचरा न सांगता उचलतात. शाळेत जेवणापूर्वी संतूर हँडवॉशचा वापर नियमितपणे करतात. मूल्यवर्धन उपक्रमाचा लाभ शिक्षकांना व विद्यार्थ्यांना कितपत झाला हे फक्त शिक्षकांवर अवलंबून आहे.
शासनाने हा उपक्रम राबविला तो म्हणजे विद्यार्थीहित लक्षात घेऊन. पण मूल्यवर्धन उपक्रमात मी मूल्यवर्धन प्रेरक म्हणून ट्रेनिंग द्यायला जायचो, म्हणून मला हा विषय दृढ झाला माझ्या व्यावसायिक करियर मध्ये मूल्यवर्धन ही एक संजीवनी ठरली.
मी बंजारा भाषेतील विद्यार्थ्यांना त्यांची भाषा शिकून घेऊन त्यांना मराठी भाषेची आवड निर्माण करू शकलो. मूल्यवर्धन उपक्रम सहयोगी खेळ घेऊन मुलांमध्ये नैतिक बदल घडविण्याचा प्रयत्न करू शकलो. यातून जे समाधान मिळते ते माझ्यासाठी खूप अनमोल आहे. आपल्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यांना कितपत समजतात याची चाचणी घेण्यासाठी मी त्यांना आपल्या गावात नळाला चार दिवसांनी पाणी येते, याची कारणे व उपाय सुचवा या विषयावर चर्चा घडवून आणली. पाऊस कमी पडतो या विषयाला धरुन मी आपण त्यासाठी काय करू शकतो हे विचारले. बऱ्याच वेळेनंतर अपेक्षित उत्तर न आल्याने मी त्यांना विचारले, आपण गावाबाहेरील माथ्यावर बिया लावल्यातर कसं राहील? मुले खूप खुश झाली. मी म्हणालो, आपण उद्या दुपारच्या सुट्टीत जेवणानंतर जाऊ. सर्वांनी नकार दिला. आजच सुरू करू आणि उद्या पन जाऊ. माझ्या वर्गात करंजीच्या, सीताफळाच्या बिया टोपलीभर असायच्याच. त्या बिया घेऊन टेकडीवर मुलांनी उत्स्फूर्तपणे लावल्या. ही खूप आनंदाची बाब आहे. हा एक नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी मुलांनी दोन दिवस केलेली धडपड गावभर पसरली. जो तो मला म्हणू लागला, खूप छान उपक्रम राबविला. माझी नियुक्ती दुसऱ्या शाळेत तात्पुरती झाली आहे. त्यामुळे आम्ही लावलेल्या बियांचे काय झालं हे कळू शकले नाही. याच वर्षी बिया लावल्या आहेत. त्या किती उगवल्या हे माहीत नाहीत, पण मला हे माहीत आहे की वृक्षारोपण या विषयाच्या बिया माझ्या विद्यार्थ्यांच्या मनात नक्कीच वाढत जात असतील.
-बिभीषण ल. येणेगुरे
विद्यार्थ्यांमध्ये दिसणारे स्पष्ट बदल
-बिभीषण ल. येणेगुरे
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती
मूल्यवर्धन उपक्रम शाळाशाळांमधून शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे मुलांमध्ये चांगल्या सवयी लावणे हा आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना अनेक मूल्यांबद्दल माहिती देण्यात आली.
मूल्यवर्धन उपक्रम हा प्रत्येक शाळांमध्ये राबवण्यात आला. आम्ही पण हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न केला. आमच्या शिक्षकांचे प्रशिक्षण झाले आणि शाळेत आम्ही कामाला लागलो. मुलांना मनोरंजनातून मूल्य कशाप्रकारे सध्या करता येईल यांचे प्रयत्न करण्यात आले. मुले ही मित्रांत, कुटुंबात, त्याच प्रमाणे समजात वावरत असतात. या सगळ्यांचा मुलांवर चांगला किंवा वाईट परिणाम होत असतो. त्याचा परिणाम शाळेवर सुद्धा होतो.
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मुलांच्या अंगी चांगले संस्कार आणि चांगल्या सवयी येतात. या उपक्रमातून प्रथम शिक्षकांना त्यांची भूमिका समजावून सांगितली. शिक्षकांनी योग्य प्रकारे त्यांची भूमिका समजून घेतली. मुलांमध्ये मूल्य रुजवण्यासाठी मनोरंजन, खेळ, गाणी, गोष्टी, निरिक्षण या साधनांचा वापर करून मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला.
मुले परिसर स्वच्छ ठेवण्यात मदत करतात. परिसर अस्वच्छ करीत नाहीत आणि दुसऱ्याला पण अस्वच्छ करू देत नाहीत. पाण्याचा तसेच नैसर्गिक संपत्तीचा योग्य प्रमाणात वापर करण्याचा प्रयत्न करून स्वतःचे काम स्वतः करतात.
याचप्रकारे स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखणे, दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणे, दुसऱ्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेणे, देशाचा एक सुरक्षित नागरिक व्हावा हीच या कार्यक्रम राबविण्यामागची संकल्पना आहे.
-विजयकुमार भुसारी
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती
-विजयकुमार भुसारी
घे उंच भरारी
“मूल्यवर्धन कळले, अनर्थ सारे टळले”
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेने ‘मूल्यवर्धन’ हे आयुष्याला हसतखेळत वळण देणारा, मूल्य रुजविणारे एक धारदार, पण इजा न करता ध्येयाकडे नेणारे शस्त्र आणले आणि इवली पाखरं निर्भीडपणे आम्हा शिक्षकांसोबत त्यांच्या चपळतेनं उडू लागली. बोटांना वळण लावणारं ठिपक्याच घर माझ्या लेकरांनी उपक्रम पुस्तिका उघडण्याच पूर्ण केलं. नी बोबडे बोल बोलायला लागले. “बघाना टिचर आम्ही आलो शाळेत. आमच्याच घरासारखे घर पूर्ण बांधलं वेळेत. किती गोड कल्पना आली त्यांच्या मनात. आपल्याही घरासारखं घर पुस्तकात असतं म्हणजेच इथे आपुलकी निर्माण होऊन सहजच या नावीन रस्त्याची ओढ त्यांना लागली. शाळेत जाऊन गट्टी कुणाशी करायची, प्राण्यांसारखी उंच भरारी कशी मारायची, पावसात ओलंचिंब का होवू नये? मनाच्या सुदृढतेसाठी पडलेच पाहिजे, शरीराच्या सुदृढतेसाठी खेळ खेळलेच पाहिजे. या साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी मूल्यवर्धन पुस्तकेतील बोलकी चित्र खूप काही शिकवून जातात. त्या चित्रांना बघता बघता माझी इवली पाखरं म्हणतात,
“टिचर, पावसामध्ये भिजू द्याना
होऊ द्या ओलंचिंब
हसत खेळत शिकवा आम्हा,
भराया आयुष्यात सप्तरंग”
मुलांनी नीटनेटके कसे रहायचे, आरोग्याची काळजी कशी घ्यायची, योग्य काय असतं, काय अयोग्य असतं याविषयी अगदी सोप्या काव्यमय भाषेत शब्दांची मांडणी केल्यानं मुलांना चित्र काय बोलतात, हे चटकन लक्षात येते. मुले आनंदाने शिकतात.
एखाद्या अबोल मुलाला किंवा मुलीला बोलते करण्यासाठी असणारा उपक्रम अतिशय प्रेरक ठरतो आणि मग ती अबोली आपसूकच बोलायला लागते. “तुम्ही सगळे सांगता काय करता शाळेत, घरी मीच अशी गुमसूम का उभी बरी?” मग ती पण आपली मतं मांडते, चांगले मित्र कसे ओळखावेत, मैत्रीचे जाळे कसे विणावे, आपल्यामध्ये कोणते गुण असावेत, सर्वांशी कसे वागावे, प्रत्येकाच्या कामाचा आदर कसा बाळगावा, आलेल्या परिस्थितीशी कसं समरस व्हावं, आपल्यामुळे इतरांची मनं का दुखावतात, एकमेकांना सहकार्याची गरज असते का या सर्व गोष्टी विद्यार्थी जीवनात म्हणजे आयुष्यात रोपटी इवलीशी असताना या मूल्यवर्धनरुपी खताची खूपच गरज आहे.
यात दिलेली सर्वपोषक माहितीरुपी, चित्ररूपी तत्त्व आम्हा शिक्षकांनी योग्य मशागतीप्रमाणे त्या ईवल्याच्या भुसभुशीत जमिनीत हसतखेळत पेरली तर त्या ईवल्यांच्या आयुष्याचे रोपटे एका जबाबदार, कर्तव्यशील, संवेदनशील विचारांच्या फांद्यांनी व मनुष्यरूपी सुगंधित फुलांनी बहरून एक समृद्ध नागरिक घडेल याची मला खात्री आहे.
“बाळा, अंधाराला भिऊ नकोस, उजेडाची वाट बघ
मूल्यवर्धनाचे धडे गिरवत आकाश कवेत भर”
-सौ. वैशाली सुरेश बोरकर
घे उंच भरारी
-सौ. वैशाली सुरेश बोरकर
विद्यार्थ्यांमधील बदल
सन २०१६ मध्ये मूल्यवर्धन उपक्रम नागपूर जिल्ह्यात, तालुका काटोल, जि. प. प्राथमिक शाळा पारडसिंगा येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील वागणूक बदल, पालकांशी संपर्क आणि सुसंवाद निर्माण झाला. अनेक चांगले परिणाम दिसून आले आहे. त्यातील काही अनुभव मी आपणासमोर मांडत आहे.
आजच्या काळात मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच रूजायला हवीत तसेच भविष्यात त्यांच्या मधून चांगले लोकशाहीभिमुख नागरिक घडायला हवेत, मूल्यवर्धनमुळे संपूर्ण देशात शैक्षणिक क्रांती होईल असा मूळ उद्देश आणि विश्वास ठेवून आदरनिय मुथ्था सरांनी हा उपक्रम हाती घेतला. घटनेतील मूल्यांशी निगडीत या उपक्रमातून अत्यंत उत्तम परिणाम मिळत असून विद्यार्थी, पालक, शिक्षकांचा सुसंवाद वाढला आहे. पालकांचा शालेय उपक्रमात सहभाग वाढला. पालकांनासुध्दा त्यांच्या मुलांमध्ये चांगले परिणाम दिसून येत आहेत. काही विद्यार्थी असेही असतात की, ज्यांच्या घरातील वातावरणच नकारात्मक असते. अशा विद्यार्थ्यांना समाजातील सकारात्मक प्रवाहात आणणे हे जिकरीचे काम असते. अशावेळी मुथ्था फाउंडेशन मार्फत सुरू झालेला मूल्यवर्धन उपक्रम १००% यश देणारा उपक्रम होय.
या उपक्रमांतर्गत शिकवित असताना अनेक चांगले अनुभव मला आले. मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी चांगला बदल घडून आणू शकले. इयत्ता पहिलीचा एक उनाड, खोडकर विद्यार्थी होता. त्याला कुणाचीही वस्तू घ्यायची आणि स्वत:च्या दप्तरात टाकायची सवय होती, समजावून सांगितल्यावर तो थोडा वेळ ऐकायचा आणि पुन्हा तो पूर्वीप्रमाणेच वागायचा. ”मैत्री” ह्या कृतीशील उपक्रमाचा वारंवार सराव घेत असता तसेच सहयोगी खेळ घेत असता त्याच्यामध्ये हळूहळू बदल होत गेला. वस्तू चोरायची त्याची सवय सुटली. अनेक विद्यार्थ्यांना अशा सवयी होत्या की, शाळेतून घरी गेल्यावर शाळेचा गणवेश आणि थोडे मोजे काढून फेकायचे आणि खेळायला जायचे. अनेक पालक स्वत:च्या पाल्यांच्या तक्रारी माझ्या जवळ करायचे. उपक्रमादरम्यान चांगले आणि वाईट हा उपक्रम नाट्यीकरणासह घेतला. विद्यार्थ्यांना स्वत:च्या वागणूकीतील चूक लक्षात आली. त्यांनी स्वत:मध्ये सुधारणा घडवून आणली. त्यानंतर पालकांनी येऊन सांगितले की विद्यार्थी स्वत:च्या वस्तू स्वत:च नीटनेटक्या ठेवत आहेत. मोठ्यांचा, आई-वडिलांचा अपमान करणे, स्वच्छता, निटनेटकेपणा या वैयक्तिक वागणूकीतही विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडून आल्याचे लक्षात आले. अशाप्रकारे मूल्यवर्धन उपक्रम विद्यार्थ्यांना योग्य वळण लावण्यासाठी आवश्यकच आहे.
-सुनिता केणे
विद्यार्थ्यांमधील बदल
-सुनिता केणे
मूल्यवर्धनमुळे शाळेत झालेला बदल
मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयात रुजायला हवीत, यासाठी मूल्यवर्धनचा कार्यक्रम उपयोगी आहे. ताण विरहीत शिक्षण सहज शक्य झाले.
शालेय वातावरण अगदी खेळीमेळीचे करण्यास मूल्यवर्धनचा अतिशय सुंदर उपयोग झाला. मूल्यवर्धन उपक्रमामुळे मुलांना स्वतःविषयी आलेल्या अनुभवांविषयी, शाळेविषयी, कुटुंबाविषयी, मित्र, शेजारी यांच्याविषयी बोलता येते. काही उपक्रमामुळे दिलेल्या विषयावर स्वतःची मते व्यक्त करतात. विविध उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची भाषिक कौशल्ये विकसित होण्यास मदत झाली. विद्यार्थी मोकळेपणाने स्वतःच्या शब्दात व्यक्त होवू लागले. यामुळे शाळेला जिंवतपणा आला. मूल्यवर्धनमुळे अभ्यासाची आवड निर्माण झाली.
विद्यार्थी वय, लिंग, जात असा फरक न करता सर्वचा आदर करतात. वर्ग मित्रांच्या भावना ओळखून भांडणे न करता त्याच्याशी चांगले वागतात.। परिणामी शाळेतील वातावरण अभ्यासास पोषक होते. विद्यार्थी गटकार्य करतात. कार्य करताना सहकार्याची भावना ठेवतात.
विद्यार्थी शाळेतील पाण्याचा वापर कमीत कमी करतात. झाडांची काळजी घेतात. वृक्षसंगोपनाला मदत करतात. स्वतः गोष्टी तयार करतात व सांगतात. स्वतःच्या आवडी, नावडी, आवडता रंग, खेळ, खाद्यपदार्थ आवडणारे व न आवडणारे सांगतात. मुलांमध्ये शाळेची आवड वाढीस लागली.
-कल्पना सेलोकर
मूल्यवर्धनमुळे शाळेत झालेला बदल
-कल्पना सेलोकर
मूल्यवर्धन सकारात्मक शिस्तीचा पाया
महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने सन 2017-18 या शैक्षणिक वर्षांत नागपूर जिल्ह्यात मूल्यवर्धन उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमात प्रेरक शिक्षक म्हणून केंद्रातून माझी निवड झाली. तेव्हा असे वाटले की, आपण नेहमी प्रशिक्षण घेतो, तसेच हेसुद्धा असेल. परंतु प्रत्यक्षात सुरुवात झाली तेव्हा मात्र एक सुखद धक्का देणारे प्रशिक्षण ठरले. आपल्यात व विद्यार्थांत कमालीचा बदल घडवून आणणारे असेच वाटले. मूल्यवर्धन उपक्रम आनंददायी व बालस्नेही असा उपक्रम आहे. मी स्वतः प्रामाणिकपणे हे प्रशिक्षण पूर्ण केले. आपल्या नांद केंद्रातील सर्व शिक्षकांनासुद्धा दिले मूल्यवर्धन अॅप्स कसे वापरायचे याचे कसबसुद्धा मला मिळाले. त्यामुळे आपल्याकडे काहीतरी इतरांपेक्षा वेगळे आहे, याची जाणीव मला मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून झाली.
मूल्यवर्धन प्रेरक म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर मी त्याचा उपयोग आमच्या शाळेत करायला सुरुवात केली. आता इतर शिक्षकांना वेळोवेळी मदत करीत आहे. माझ्या शाळेत मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यात आल्याने अनेक अमुलाग्र बदल घडून येत आहेत. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे माझ्या वर्गातील एक अति खोडकर मुलगा, आई- वडील यांनासुद्धा जुमानत नव्हता. त्याच्या या स्वभावाने घरचे व शाळेतील सर्व त्रासले होते. आई, वडिलांचा हिरमुसलेला चेहरा पाहून मी या मुलात बदल घडवून आणावा असा अंतर्मनातून आवाज आला.
मी माझ्या मूल्यवर्धन उपक्रमाचा डोस द्यायला सुरुवात केली. प्रशिक्षणाच्या माध्यमातून जीवनात आलेले अनुभव यांची सांगड घालून त्याच्यावर प्रयोग सुरू केले. त्यामध्ये त्याला वर्गात मान-सन्मान देणे, त्याच्यावर काही जबाबदाऱ्या सोपविणे, महत्त्वाच्या गोष्टी, कथा, सहयोगी खेळ, स्वयंशिस्त, सहयोगी अध्ययन पध्दतीचा वापर इत्यादींच्या मदतीने तो मुलगा आज शिस्तप्रिय व हुशार विद्यार्थी बनला आहे.
एकदा काय झाले की, आमच्या शाळेतील एका शिक्षिकेचे कानातील सोन्याचे कुंडल कुठेतरी पडले. त्यांच्या लक्षात येईना. मॅडम खूप घाबरून गेल्या. त्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या, मैदान सगळे शोधून काढले, पण कुणाला काही सापडले नाही. दुपारची जेवणाची सुट्टी झाली. आमचे जेवण नुकतेच झाले होते. मुले मैदानावर खेळत होती. तेव्हा एक मुलगा धावतपळत माझ्याजवळ आला व हरविले होते ते कुंडल खेळत असताना मला सापडले सांगून त्याने प्रामाणिकपणे परत केले आणि परत खेळण्यास निघून गेला. त्याला मॅडमने बक्षीस दिले. मागील वर्षी 26 जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त त्या विद्यार्थ्याचा मोठा सत्कार करुन प्रामाणिक विद्यार्थी म्हणून त्याचा गौरव करण्यात आला. हा होता मूल्यवर्धन उपक्रमाचा सकारात्मक बदल, जो मी एक मूल्यवर्धन प्रेरक शिक्षक म्हणून अनुभवला. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांचे मी आभारी आहे की, त्यांच्या मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नितीमूल्याची एक गंगा वाहू पाहत आहे.
-शिवशंकर चरडे
मूल्यवर्धन सकारात्मक शिस्तीचा पाया
-शिवशंकर चरडे
आणि तो हसला !
माझी शाळा जि. प. प्राथमिक शाळा वङविहीरा, पं. स. नरखेड, जि. नागपूर. माझा अनुभव मात्र यापूर्वीच्या शाळेचा आहे. जो मला सांगताना आनंद होत आहे. कधीकाळी जो मुलगा शाळेत आल्यानंतर फक्त आणि फक्त बघ्याची भूमिका घेतो, तो जेव्हा एकाएकी आपल्याशी समाधानाने बोलतो आणि हसून निरोप देतो त्यावेळेला आकाश ठेंगणे झाल्यागत वाटते. हे सगळे अनुभव अनुभवायला मिळाले ते केवळ मूल्यवर्धनामुळेच.
मी खानगाव या शाळेत कार्यरत होते. अंकुश हा पहिलीला आलेला नवीन विद्यार्थी होता. तो कुणाशी फारसा बोलायचा नाही. शाळेत आला तेव्हा तो पुरता घाबरलेला होता. शाळेत बसायलाही तयार नसायचा. कसाबसा बसला की, रडणे सुरुच. दिवस दिवसभर रडायचा. नंतर माझ्याबरोबर फिरणे, बसून राहणे हा नित्यक्रम झाला. त्यात आम्ही ज्यावेळेला मूल्यवर्धन तासिका घ्यायचो, तेव्हा तो थोडाथोडा प्रतिसाद द्यायला लागला होता. मूल्यवर्धन तासिकेअंतर्गत वर्गमित्राची ओळख करून देत असताना मिनाक्षीने त्याच्या घरची सर्व माहिती आम्हांला दिली, तेव्हा त्याच्या न बोलण्यामागचे कारण मला कळू शकले.
मी सतत त्याला बोलते करण्याच्या प्रयत्नात असायची. त्याची आई मानसिक रुग्ण आहे हे कळल्यावर त्याच्याप्रती सहानुभूती आपोआपच वाढली होती. त्याला सहयोगी खेळ खेळायला आवडतात म्हणून दोन-तीन दिवसां आड खेळ घेणे सुरू झाले. त्यानिमित्ताने तो मुलांत मिसळायला लागला. पण अजूनही तो माझ्याशी बोलणे टाळायचा. मग शाळेतील इतर शिक्षक तर दूरच. कुणाच्या सावलीलासुद्धा उभा रहायचा नाही. काही दिवस करताकरता पूर्ण वर्ष गेलं, पण तो काही माझ्याशी बोलला नाही. बोलायचा तो केवळ आपल्या वर्गातल्या मुलांबरोबर. दुसरे सत्र उजाडले आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी कळलं की, त्याच्या वडिलांनी त्याचे नाव निवासी आश्रम शाळेत घातलं आहे. ऐकूनचं मन सुन्न झालं, पण इलाज नव्हता. तोच बाहेर आवाज आला. त्याचाच होता तो. तो मोठमोठ्यान रडत होता. ज्या शाळेत त्याला घातलं होतं तिथं तो जायला तयार नव्हता. तिथे न जाता तो थेट आमच्या शाळेत आला होता आणि मला पकडून जोरजोरात रडत होता.
तो दिवस आजही आठविला की, मन अस्वस्थ होऊन जातं. शिक्षण परिषदेअंतर्गत त्या आश्रम शाळेत जाण्याचा योग आला. शाळेत गेल्यानंतर शाळा बघत असताना कुणीतरी माझा पदर पकडून उभा असल्याचे जाणवले. ते दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द अंकुश होता. पाहताच आश्चर्य वाटलं आणि समाधान ही. तो माझा हात पकडून तिथल्या शिक्षिकेकडे घेऊन गेला आणि त्यांच्याकडे बोट दाखखवून म्हणाला, “मला मारल हाताला”. हे तो पहिल्यांदा बोलला होता. तो बोलला यातचं मला समाधान होतं. त्याच्या शिक्षिकेसोबत बोलून परत निघाल्यावर तो एकटक पाहात उभा होता.
शिक्षण परिषद संपवून परत जात असताना तो माझी वाट पाहात उभा असल्याचे दिसले. त्याच्या हातात काहीतरी होते माझ्यासाठी. त्याने ते मी जवळ जाताचं माझ्या दिशेने सरकवले. मी त्यानी आणलेली भेट घेऊन थँक्स म्हणताच तो एक गोड हसला. त्याचे हे हसणे मात्र माझ्याकामाची पावतीचं होती जणू. जी मला मूल्यवर्धन या कार्यक्रमाअंतर्गत नकळत अनुभवायला मिळाली.
-सौ. सोनाली विक्रम चव्हाण
आणि तो हसला !
-सौ. सोनाली विक्रम चव्हाण
मूल्यवर्धन व विद्यार्थी
मी शिल्पा घनश्यामजी भोयर जिल्हा परिषद शाळा उबाळी केंद्र उबाळी तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर
मूल्यवर्धन या पुस्तिकेमुळे मुलांमध्ये चांगल्या मूल्यांची जोपासना झाली. मुलांमध्ये चांगली मूल्ये रुजली गेली. मोठ्यांचा आदर करणे, जातपात, पंथ, धर्म हे सगळं विसरून एकत्र काम करणे, वृद्धांची सेवा करणे या सगळ्या गोष्टींची मुलांना अधिक जवळून जाणीव झाली.
आजच्या युगामध्ये मुलांना शिक्षणापेक्षा मूल्ये रुजविण्याची जास्त गरज आहे, असे मला वाटते. छोट्याछोट्या खेळांमधून, छोट्याछोट्या कहाण्यांमधून, छोट्याछोट्या कवितांमधून मुलांना ती कळली आणि त्यांनी ती हसत खेळत स्वीकारली. जी मूल्ये आपण त्यांच्यावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करतो, ती तशी न लादता हसतखेळत, अगदी सहजपणे मुलांमध्ये रुजली गेली, याचा मला आज आनंद होतोय. मूल्यवर्धन हा विषय केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये राबविला गेला पाहिजे, असे मला वाटते.
मी जेव्हा जिल्हा परिषद शाळा खुशालपूर येथे कार्यरत होते, तेव्हापासून मूल्यवर्धन या विषयाशी निगडित आहे. आमचे ट्रेनिंग झाल्यानंतर आम्हांला खूप हसतखेळत आणि खूप सुंदर रितीने तिथे शिकवले गेले. आनंददायी पद्धतीने सर्व खेळ खेळले गेले. आम्हीपण तेच शाळेमध्ये रुजवले. मुलांमध्ये मूल्ये रुजली गेली. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे कार्यरत आहे. तेथेसुद्धा मी मुलांमध्ये हसतखेळत पद्धतीनेच मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करत आहे. मुलेसुद्धा ती खूप आत्मियतेने आत्मसात करत आहेत, याचा मला आनंद होतो.
-शिल्पा भोयर
मूल्यवर्धन व विद्यार्थी
-शिल्पा भोयर
मी आणि मूल्यवर्धन
मी आणि मूल्यवर्धन अनुभवकथन.
मूल्यवर्धनने मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजण्यास मदत होत आहे. मुलांमध्ये चिकित्सक आणि सर्जनशील विचार करण्याची वृत्ती वाढत आहे. मुले स्वत:चे मतप्रदर्शन करतात. मूल्यवर्धन पुस्तिकेत दिलेल्या उपक्रमामुळे मुलांमध्ये स्वतःविषयीची जाणीव, जबाबदारीची जाणीव होत आहे. सहयोगी खेळामुळे सहकार्याची भावना निर्माण झाली आहे. मुले स्वतः वर्गनियम तयार करतात व ते आवडीने पाळतात. मूल्यवर्धन कार्यक्रमातील उपक्रमामुळे मुलांना चांगले व वाईट ठरविण्याची संधी मिळते. या कार्यक्रमामुळे शालेय शिक्षणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होत आहे.
-आरती चव्हाण
मी आणि मूल्यवर्धन
-आरती चव्हाण
मूल्यवर्धन अंतर्गत माझे अनुभव
विद्यार्थी हे चांगले नागरिक व्हावेत, यासाठी हा उपक्रम उत्कृष्ट आहे.
मी सौ. कविता नामदेव चरडे, जि. प. प्राथमिक शाळा बाराद्वारी, केंद्र- विहीरगाव, पं. स. नागपूर. मूल्यवर्धन कार्यक्रम अंतर्गत माझे वैयक्तिक मत मांडते. मूल्यवर्धन या उपक्रमाअंतर्गत मी आणि माझ्या शाळेच्या मुख्यध्यापिका सौ. ज्योती काशीनाथ ठाकूर विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये व कौशल्ये कशी विकसित होतील याकडे विशेष लक्ष देत असतो. मूल्यवर्धन हा विषय मुले उपक्रमातून शिकत असल्यामुळे विद्यार्थी मनमोकळी चर्चा करतात. त्यामुळे त्यांचे संभाषण कौशल्य वाढले. विचार करून स्वतःचे मत मांडण्याचे कौशल्य मुलांमध्ये विकसित झाले. या उपक्रमामुळे समाजात इतरांसोबत कसे बोलावे, दुसऱ्यांना मदत करावी असे चांगले गुण मुलांमध्ये विकसित झाले. मुले घरी मोठयांचा आदर करायला लागली. विद्यार्थ्यांना खेळ आवडत असतात. हे उपक्रम खेळाच्या माध्यमातून घेतल्यामुळे मुलांना त्यात आनंद वाटतो. खेळामुळे मुलांना शाळेत येण्याची ओढ निर्माण झाली. एकंदरीत मूल्यवर्धन हा उपक्रम खूपच छान व फायदेशीर आहे.
-कविता चरडे
मूल्यवर्धन अंतर्गत माझे अनुभव
-कविता चरडे
मी व मूल्यवर्धन
मूल्यवर्धमुळे मुलांच्या विकासास वाव मिळतो.
मला मूल्यवर्धन कार्यक्रम राबवताना अत्यंत आनंद होत आहे. यातून विद्यार्थ्यांना स्वतः विषयी बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. स्वतःच्या आवडीनिवडी, छदं ते सर्वांसमोर मुक्तपणाने सांगतो. आपल्याप्रमाणे वर्गमित्रालाही विचार, मते, आवडीनिवडी असतात हे त्याच्या लक्षात येते. अशाप्रकारे तो वर्गमित्राला समजून घेतो. त्याला स्वतःच्या जबाबदाऱ्या समजतात. त्याच्या मताचा आदर होत असल्याने तो इतरांचा मान राखतो. शिक्षकांचा मान राखतो. शाळेच्या नियमांचे पालन सहजतेने करतो. त्याला शाळा आपली वाटते. अब्राहम लिंकन यांच्या छंद कथेतून मैदानी खेळ खेळल्याने शरीर कणखर बनते, हे विद्यार्थ्यांना कळते. तसेच लिंकन यांचा हा सर्वात आवडता छदं भरपूर पुस्तके वाचणे हा होता, त्यामुळे ते खूप शिकले व अमेरिकेचे अध्यक्ष झाले हे त्यांना समजले. वाचन किती आवश्यक असते हे या कथेवरून कळले.
‘आळशाचे स्वप्नरंजन’ या कथेतून तरुण मेंढपाळ केवळ स्वप्नातच रमल्यामुळे काहीच करू शकला नाही, हे मुलांना कळले. आपल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी आपण जागरूक असावे, तसेच त्यादृष्टीने प्रयत्न करावयास हवे. केवळ स्वप्नरंजनातून काहीही घडू शकत नाही तर आपण निष्क्रिय ठरतो, याचा विद्यार्थ्यांना बोध झाला. ‘राजुचा दिवस’ यातून मुलांना स्वतःचे दैनिक वेळापत्रक तयार करून त्याप्रमाणे नियोजन करावे हे कळले. ‘बिनधास्त बंटी’ या कथेतून बंटीच्या वाईट सवयी विद्यार्थी चटकन सांगतात. त्याचवेळी स्वतःचे आत्मपरीक्षण करून स्वतःतल्या वाईट सवयी ओळखतात व त्या टाळण्याचा स्वतःहून प्रयत्न करतात. तसेच चांगल्या सवयींमध्ये दूरदर्शनवरील कार्टून पाहण्यापेक्षा त्याला मैदानी खेळ आवडतात. मैदानी खेळ, व्यायाम पोषक आहेत याची विद्यार्थ्यांना जाणीव होते.
आपण दिव्यांग मुलांना सहकार्य केले तर ती भारत देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात. ‘हे असे का होते?’ या पाठातून कचऱ्याची विल्हेवाट बरोबर लावली नाही तर प्लास्टिक खाऊन गाई -गुरे मृत्युमुखी पडतात याची मुलांना जाणीव झाली. कचरा विघटनाची माहिती मिळाली. एकंदरीत मूल्यवर्धन उपक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यास सहाय्यक ठरतात. देशाचा सुजाण नागरिक बनविण्यास सहाय्यक ठरतो.
-कल्पना कांबळे
मी व मूल्यवर्धन
-कल्पना कांबळे
मूल्यवर्धनने जाणीव जबाबदारीची -प्रगती शाळेची
माझ्या शाळेतील मुले स्वच्छता, नीटनेटकेपणा, आपली जबाबदारी याविषयी जागरूक नव्हती त्यामुळे अपेक्षित गुणवत्ता व प्रगती होत नव्हती. त्याकरिता मूल्यवर्धन उपक्रमाची साथ घेऊन माझी मुले समृद्ध तथा प्रगत झाली आहेत.
सन 2016- 17 या सत्रापासून माझी शाळा जि. प. प्राथमिक शाळा नंदापूरी के. चाचेर येथे मूल्यवर्धन उपक्रम घेत आहे. त्याआधी सुद्धा मी विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल करण्यासाठी प्रयत्न करीत होते, परंतु मूल्यवर्धन उपक्रमामुळे मला काही वेगळेच अनुभव मिळाले. तसेच सहयोगी खेळांमुळे विद्यार्थी एकमेकांना अनुभवत आहे . प्रत्येकामध्ये असलेला कलागुण बाहेर येत आहे. त्यामुळे सहयोगातून प्रत्येकाची प्रगती साध्य होत आहे.
माझ्या शाळेत एकूण 52 विद्यार्थी असून ते स्वच्छतेविषयी पाहिजे तेवढे जागरूक नव्हते. त्यासाठी मी सर्वात चांगला पर्याय कुठला? यावर उपक्रम घेतला. त्यात स्वतःच विद्यार्थ्यांना काय करावे? कोणता पर्याय सर्वात चांगला? यावर उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये हळूहळू जाणीव होऊन बदल होत गेले आणि आज प्रत्येक मूल आपली जबाबदारी समजून कार्य करीत आहे. कचरा हा कचरा कुंडीतच टाकतात. त्याचप्रमाणे ओला, सुका कचरा ओळखतात. बूट नेमक्या जागेवर ठेवतात. जेवणापूर्वी हात धुताना रांगेत उभे राहतात. खेळाचे साहित्य त्याच जागेवर ठेवतात. पिण्याच्या पाण्याचा योग्य प्रकारे वापर करतात. शैक्षणिक साहित्य हाताळतांना जागचे जागेवर ठेवतात. रांगेत बसताना योग्य अंतर ठेवून बसतात. दिलेला अभ्यास प्रात्याक्षिक कार्य जबाबदारी समजून पूर्ण करतात. हाच बदल विद्यार्थ्यांचे पालक घरी अनुभवत आहे.
एकदा शाळेसमोर एका आजोबांचा अपघात झाला. त्यांना पायाला लागलं. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेण्यासाठी मुलांना सांगितले. त्यांनी प्रत्येक्ष अपघात बघितलेल्या पिसोडे काकांना विचारले, तेव्हा त्यांना कळले की, ते आजोबा उजव्या बाजूने चालत होते. म्हणजेच ते वाहतुकीचा नियम पाळत नसल्याने हा अपघात झाला. तेव्हापासून मुले याउपक्रमाच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम पाळतात व घरी पालकांना सुद्धा सांगतात. याबाबत पालकसभेमध्ये त्यांना पाल्याकडून आलेले अनुभव आनंदाने कथन करतात. यावरून मूल्यवर्धनची खरी फलश्रुती मिळते. अशाप्रकारे जबाबदारीची जाणीव झाल्यामुळे माझ्या शाळेची प्रगती झाली. हाच संकल्प घेऊन आम्ही पुढे वाटचाल करीत आहोत.
-योगिता बावनकर
मूल्यवर्धनने जाणीव जबाबदारीची -प्रगती शाळेची
-योगिता बावनकर
मूल्यवर्धनच्या दिशेने माझी शाळा
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे व महाराष्ट्र शासनाच्या वतीने मूल्यवर्धन हा कार्यक्रम राबविला जात आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये सकारात्मक बदल घडून येत आहेत. तशाच शाळांपैकी माझी एक जि. प. प्राथमिक शाळा सुराबर्डी आहे.
मी अनिल गेडाम, सहाय्यक शिक्षिक जि. प. प्राथमिक शाळा सुराबर्डी, तालुका- नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर. जेव्हा पासून मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतले, तेव्हापासून एक नवीनच उर्जा संचारली आहे. असं वाटतं की, मुलांना काय बनवायचं ते आपल्या हातात नाही. पण शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांच्या मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून आपण जबाबदार नागरिक घडवू शकतो.
मूल्यवर्धन व आमच्या शाळेची वाटचाल सुरू झाली. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा व वर्गनियम बनवून घेतले. तसेच शालेय वेळापत्रकात आठवड्यातून तीन मूल्यवर्धन तासिकाचे नियोजन करुन घेतले. तेव्हापासून मुलांच्या वागणुकीत सकारात्मक बदल होत आहेत. एकमेकांना समजून घेणे, मदत करणे, शाळेतील वस्तूची देखभाल, स्वच्छ वर्ग खोल्या, खोटे बोलणे कमी होत आहे. शालेय अभ्यासक्रम पूर्ण करताना आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. मुलांना काठी घेऊन मारण्याची गरज पडत नाही. एकंदरीत मुलांमध्ये समजूतदारपणा वाढत आहे. मी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे व आम्हांला नेहमी हसतमुखाने मदत करणारे तालुका समन्वयक शिवशंकर घरडे यांचे आभार मानतो. त्यांच्या अथक परिश्रमाचे फलित आज महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळा मूल्यवर्धित होत आहेत.
-शिवशंकर घरडे
मूल्यवर्धनच्या दिशेने माझी शाळा
-शिवशंकर घरडे
विदयार्थी विकासासाठी पूरक असलेले मूल्यवर्धन
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांची अंमलबजावणी करताना आम्हांला सकारात्मक बदल आमच्या संपूर्ण शालेय वातावरणात दिसून आले. त्यासंबंधाने आलेले अनुभवांचे कथन करण्यात येत आहे.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन अंतर्गत मूल्यवर्धन कार्यक्रम आमच्या नरखेड पंचायत समितीमध्ये आम्ही गेल्या दोन वर्षापासून राबवित आहोत. त्याची फलश्रुती म्हणजे मूल्यवर्धन कार्यक्रम हा मुळातच सध्याच्या अध्ययन निष्पत्ती प्रधान अभ्यासक्रमावर आधारित आहे. बालकांचा सर्वांगीण विकास साधत असणाऱ्या अभ्यासक्रमाला मूल्यवर्धनाची जोड म्हणजे दुधात साखरच होय. मूल्यवर्धन उपक्रम वर्गात राबविताना जो अनुभव आला तो वेगळाच. वर्गवार अध्ययन निष्पत्ती पूर्ण करताना मूल्यवर्धन उपक्रम त्याला पोषक ठरले. लाजाळू विद्यार्थी बोलके झाले. अस्थीर, चंचल विद्यार्थी स्थीर झाले, संयमी झाले. विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे आपसूकच जे विद्यार्थी गैरहजर रहायला लागले होते, ते शाळेत नियमितपणे यायला लागले. यावर्षीपासून तीन तासिका आम्ही वेळापत्रकात समाविष्ट केल्या असून त्याची अंमलबजावणी चोखपणे करण्यात येत आहे. तेव्हा मूल्यवर्धन तासिकेची मुले वाट बघत असतात तसेच मोठ्या उत्साहात व आनंदाने सहभागी होत आहेत.
मूल्यवर्धन उपक्रमाचा विशेष फायदा म्हणजे शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ ला आमच्या शाळेत दाखल झालेली इयत्ता पहिलीमधील मुलगी कु. दिव्यानी राजकुमार राऊत ही लाडात वाढलेली, मनमानी वागणारी, कुणाचेही ऐकायला तयार नसणारी, तसेच अतिशय चचंल होती. त्यामुळे तिचा उपहास व्हायला लागला होता. ती अधिकच आक्रमक आणि इतरांपेक्षा वेगळी वागायला लागली होती. ही मुलगी काही तरी वेगळीच आहे म्हणून सगळे तिच्याकडे बघू लागले. परंतु मूल्यवर्धन उपक्रमांमुळे हळूहळू तिच्यामध्ये आवश्यक असे सकारात्मक बदल व्हायला लागले. केस स्टडीला जेव्हा मूल्यवर्धनचे निरीक्षक आले, तेव्हा तिच्या आधीच्या वर्तणुकीबद्दल सांगितलेल्या गोष्टींवर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. शांत, संयमी, अभ्यासात एकाग्रतेने लक्ष देणारी दिव्यानी त्यांना आढळून आली. हा एवढा वर्तनबदल केवळ मूल्यवर्धन उपक्रम राबवण्यात आले म्हणून घडून आले यात शंकाच नाही.
-सौ. निशा भक्ते व श्री. विजय भड
विदयार्थी विकासासाठी पूरक असलेले मूल्यवर्धन
-सौ. निशा भक्ते व श्री. विजय भड
मूल्यवर्धनच्या संगतीने माझे चिमुकले पोहचले आकाशवाणीवर !
आजच्या जागतिकीकरणाच्या वादळात दिवसागणीक नवनव्या समस्या उद्भवत आहेत. यावर मात करण्यासाठी आज प्राथमिक शिक्षणापासून मूल्ये रूजवणे गरजेचे आहे. शिवाय भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात लोकशाही मूल्ये रूजविणे व त्याला विकसित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन मूल्यवर्धन कार्यक्रम हाती घेऊन शिक्षक, विद्यार्थी, शाळा व समाज बदलासाठी एक सकारात्मक वातावरण प्राथमिक शालेय स्तरावरून करीत आहे. हे अतिशय स्तुत्य आहे. माझ्या कार्यरत शाळेमध्ये मूल्यवर्धनात्मक विविध उपक्रम राबविले, त्यामुळे या उपयोजित उपक्रमातून एक सकारात्मक चित्र उभे करता आले.
हसतखेळत, सहजसोप्या शिक्षणातून आणि विद्यार्थी विकासाभिमुख व उपयोजित उपक्रमाद्वारे मूल्ये प्रकर्षाने रूजवायची एक चांगली संधी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या मूल्यवर्धन कार्यक्रमातून मिळाली. एक प्रेरक शिक्षक म्हणून भूमिका साकारत असताना मूल्यवर्धन अंतर्गत ‘मी आणि माझ्या क्षमता’, ’मी असे करतो’, ’स्वयंमूल्यमापन’, ‘माझी कर्तव्ये’ यासारख्या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील क्षमता ओळखून, त्यांना न्याय देण्यात व सुधारणा करण्यात मला फार मदत झाली. भावनांचा व आकलन क्षमतेचा कल मूल्यवर्धनातून जाणून घेता आला. तेव्हा विद्यार्थ्यांचा अभिव्यक्ती विकास करण्याचे ठरविले. कवितालेखन, संवाद, माझे मत असे उपक्रम घेत असताना चिमुकल्यांनी मांडलेली मते, भावना यातून ते मूल्यवर्धित होत असल्याचे जाणवू लागले.
चिमुकल्यांच्या लेखणीतून शेतकऱ्यांचे प्रश्न, आई, वडिलांचा आदर शिवाय आपल्या परिजनांनी तंबाखूचे व्यसन सोडावे, लावलेली झाडे जगवूयात, चांगले काही करूयात असे विचार लेखणीतून उतरले. संवेदनशिलता, सौजन्यशिलता, पर्यावरण संवर्धन ही मूल्ये विद्यार्थ्यांत रूजल्याचे एक फलित म्हणावे लागेल.
विद्यार्थी अभ्यासासह, अवांतर वाचनासह व्यसनमुक्ती दूताचे कार्य करीत आपल्या कुटुंबातील अनेकांना तंबाखूचे व्यसन सोडविण्यात सफल झाले. दुर्गम भागातील शाळांमध्ये मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांत बदल घडून येऊ लागले. वृत्तपत्राने मूल्यवर्धनची दखल घेतली. प्रेरणा मिळत गेली. ज्ञानरचनावादी, तंबाखूमुक्त शाळा या सह मूल्यवर्धित शाळा म्हणून माझ्या शाळेचा उल्लेख होऊ लागला. आनंदाची बाब म्हणजे माझ्यासह माझ्या चिमुकल्यांच्या अभिव्यक्तीला थेट आकाशवाणीवर कविता आणि संवाद सादरीकरणाची संधी मिळाली. ग्रामस्थ, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने आम्हा सर्वांचे कौतुक केले. प्राथमिक शिक्षणापासून घटनात्मक मूल्ये रूजविणे आज काळाची गरज आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ते पेरता आले, याचा आनंद मात्र अधिक द्विगुणीत करणारा आहे, हे विशेष. !
-एकनाथ पवार
मूल्यवर्धनच्या संगतीने माझे चिमुकले पोहचले आकाशवाणीवर !
-एकनाथ पवार
आणि मूल्यवर्धन उपक्रमामुळे मोठा अनर्थ टळला !
मी चित्रलेखा झंजाळ सहाय्यक शिक्षिका जि. प. उच्च प्राथमिक शाळा रूईखैरी, ता. नागपूर ग्रामीण, जिल्हा नागपूर. मूल्यवर्धन उपक्रमामुळे माझ्या शाळेत खूप मोठा अनर्थ कसा टळला हा अनुभव सांगणारा छोटासा मूल्यवर्धन उपक्रमाचा अविस्मरणीय अनुभव.
नेहमीप्रमाणे शाळा सुरू झाली. नुकताच परिपाठ झाला होता. सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात बसण्याच्या तयारीत होते. पण जास्त गडबड दिसत नव्हती. याला कारण मूल्यवर्धन उपक्रम होय. कारण मुलांनी शिक्षकांच्या मदतीने वर्गनियम व शाळेचे तयार केले होते. आता मुलांना शिक्षकांची भीती वाटत नाही. शिक्षकसुद्धा मुलांना मान सन्मान देतात.
आमच्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. सुभाष जाधव यांनी मूल्यवर्धन अंमलबजावणीकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे अनेक शाळांमध्ये मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसताहेत. तालुका समन्वयक शिवशंकर घरडे यांनी सुद्धा तालुक्यातील संपूर्ण शाळा पिंजून काढून उपक्रमांची पाहणी व मार्गदर्शन करण्याचा सपाटा लावला होता. अशातच त्यांनी आज आमच्या शाळेला भेट देण्याचे नियोजन केले होते. आम्ही सर्व शिक्षक वर्गात जाण्याच्या तयारीत होतो. तेवढ्यात मूल्यवर्धन तालुका समन्वयक शिवशंकर घरडे कार्यालयाकडे येताना दिसले. त्यामुळे आम्ही सर्व प्राथमिकचे शिक्षक थांबलो. घरडे सरांनी मूल्यवर्धन अंमलबजावणी बाबतीत मार्गदर्शन केले व मूल्यवर्धन उपक्रम घेण्याची विनंती केली. त्यामुळे सहायक शिक्षक अशोक वंजारी यांनी इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलांना घेऊन मूल्यवर्धन सहयोगी खेळ घेण्यासाठी पटांगणात आणले. पण तिथे कॉन्हवेंटचे चिमुकले चटई टाकून बसले होते. बाजूला खाली जागेत नादुरूस्त टीव्ही ठेवला होता. मुलांचा व मुलींचा समूह करून ‘हवेत तरंगत ठेवू’, व ‘राजा ओळखणे’ हे दोन उपक्रम घेणे सुरू असताना अचानक स्फोट झाल्याचा आवाज आला. कुणाला काही कळण्याच्या आत मुलांच्या रडण्याचा आवाज आला. जिकडे तिकडे काचा पडल्या होत्या. एक दोन मुलांना काचेने हलक्या जखमा झाल्या होत्या. पण सर्वात मोठी जखम झाली ती कोमल गुडलावार या मुलीला. तिचं रडणे थांबत नव्हते व रक्तही. कायकाय उपाय केले पण, रक्त थांबेना. त्यामुळे वंजारी सर, घरडे सर यांनी तिला दवाखान्यात दाखल केले. तिला सहा टाके लागले होते. आई-वडील गरीब असल्याने वंजारी सरांनी औषध व दवाखाना फी दिली.
या घटनेला एक वर्ष लोटून गेले. पण मनात विचार येतो की, त्या दिवशी घरडे सर मूल्यवर्धन उपक्रमाच्या पाहण्यासाठी आले नसते तर, त्या नादुरूस्त टीव्ही जवळच बसलेल्या कान्हवेंटच्या चिमुकल्यांचे काय झाले असते, असा विचार मनात येताच आजही अंगावर काटे येतात. भारतीय राज्यघटनेतील समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुता ही मूल्य रुजविण्याच्या उदात्त हेतूने मूल्यवर्धन उपक्रम तयार करणाऱ्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांच्यासाठी माझे कर आपोआप जोडून येतात.
-चित्रलेखा झंजाळ
आणि मूल्यवर्धन उपक्रमामुळे मोठा अनर्थ टळला !
-चित्रलेखा झंजाळ
.