मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले परिवर्तन
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून, संविधानातील मूल्ये व त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे या उद्देशाने शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आयोजित मूल्यवर्धन कार्यक्रमाची यशस्वी सुरुवात वाशी तालुक्यात गतवर्षी झाली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी, शाळा वातावरणात अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून येते.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मूल्यवर्धनचे धडे देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी पहिल्यापेक्षा जास्त बोलके झाले. यातील छोट्याछोट्या उपक्रमांनी विद्यार्थ्यांना योग्य पध्दतीने विचार करण्याची सवय लागली. याचा फायदा असा झाला की, विद्यार्थी प्रत्येक बाबतीत चिकित्सकपणे विचार करून एखादी गोष्ट योग्य की अयोग्य हे शोधून विधायकरितीने स्विकारू लागले. शांतता संकेतानुसार विद्यार्थी आवश्यक तेव्हा शांत बसू लागले. म्हणजे चांगल्या गोष्टी स्वीकारण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रूजू लागली. या उपक्रमांतून प्रत्येक मूल व्यक्त होऊ लागले. यातून स्वअभिव्यक्ती सहजपणे उलगडू लागल्याचे दिसून येत होते. प्रत्येक मूल्याची जडणघडण व रुजवण विद्यार्थ्यांना होऊ लागली.
सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हरवत चाललेली मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजू लागली. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाण, भावनिक विकास या कार्यक्रमातून झाला. माझ्या वर्गात विशेषतः विद्यार्थ्यांमधील भांडण तंटे त्वरित मिटू लागले. यातून आपसातील परस्परसंबंध निश्चितच सुधारून आपल्या जबाबदाऱ्या मुलांना कळू लागल्या.
रिकाम्या वेळेत करायच्या उपक्रमांत विद्यार्थी आनंदाने गुंतून जाऊ लागले. स्वमूल्यमापनातून स्वतः बद्दलचे स्पष्ट मत जाणून घेऊन स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी संधी निर्माण होऊ लागल्या. मी व माझे कुटुंब यातून विद्यार्थ्यांना कौटुंबिक वातावरणात कशाप्रकारे राहावे हे त्यांच्या विचारातून कळू लागले. काही दिलेल्या अर्धवट प्रसंगातून चिकित्सक विचार करण्याची संधी उपलब्ध होऊन त्याबद्दल विद्यार्थी व्यक्त होऊ लागले. निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांचे संवर्धन होण्यासाठी मूल्यवर्धन हा उपक्रम फलदायी आहे.
-प्रवीण कुंभार
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले परिवर्तन
-प्रवीण कुंभार
मूल्यवर्धन नाविन्यपूर्ण तसेच विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
सध्याच्या काळात मूल्यांचे महत्त्व कमी होत चालले आहे. त्यासाठी शाळेतूनच विद्यार्थ्यांना मूल्य आणि त्यांचे मानवी जीवनातील महत्त्व समजून दिले तर विद्यार्थी आपल्या आयुष्यात खूप यशस्वी होतील. सर्व मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी शाळा हे अतिशय महत्त्वाचे माध्यम आहे. शाळा स्तरावर वेगवेगळे अनुभव आणि खेळांतून हा प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात आला. त्यामुळे त्याचे चांगले परिणाम दिसून येतात
-गाडे संघमित्रा राजाराम
मूल्यवर्धन नाविन्यपूर्ण तसेच विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
-गाडे संघमित्रा राजाराम
मूल्यवर्धन उपक्रम घेत असताना जाणवलेले बदल
मुले आरोग्यासाठी चांगल्या सवयी बाळगतात. लवकर उठणे, भाज्या खाणे, हात धुणे इ. विद्यार्थी शाळेचे नियम पाळतात. वेळेवर शाळेत येणे, गणवेशात येणे, मदत करणे.
मुले लवकर उठू लागली. डब्यात भाज्या आणू लागली. मित्रांना मदत करू लागली. शाळेत वेळेवर येऊ लागली. शाळेचे नियम पाळू लागली.
-तेजेश्री मारवाडकर
मूल्यवर्धन उपक्रम घेत असताना जाणवलेले बदल
-तेजेश्री मारवाडकर
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन हा शांतिलाल मुथ्था फाउंडेशन निर्मित व महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याकडून राबविण्यात येणारा कार्यक्रम आहे. या संदर्भातील एक अविस्मरणीय अनुभव येथे द्यावा वाटतो.
रात्रीचे साधारणत: ११.०० ते ११.३० वाजले असावेत. रिकाम्या रस्त्याने मी आणि माझे मिस्टर प्रवास करत होतो. हमरस्ता नसल्याकारणाने रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हतीच. एखादे वाहन अर्धा पाऊन तासानंतर क्वचित यायचे. आजूबाजूला असणाऱ्या काळोख्या अंधारातून झाडांच्या चित्रविचित्र आकृत्या मनात नाहक भीती निर्माण करत होत्या. तेवढ्यात अचानक कसलासा आवाज झाला. गाड़ी अचानक थांबली. संपूर्ण शरीरातून अचानक वीज चमकून गेली. अंधारी रात्र, सुनसान जागा. क्षणभर मनात असंख्य प्रश्न आले. पण घाबरूनही जमणार नव्हते. मिस्टर म्हणाले, “तू गाडीत बस. मी बघतो काय झाले ते.” मोबाइलच्या टॉर्चने त्यांनी पाहिले तर गाडीचे टायर फुटले होते. स्टेफनी लावून टायर बदलून लावणे गरजेचे होते.
मी गाडीतून खाली उतरले तसा रातकिड्यांचा कर्णकर्कश आवाज मनाला अजूनच नाहक भीती दाखवू लागला. मी हातात टॉर्च धरून मिस्टरांना मदत करत होते. तेवढ्यात एक गाड़ी आली आणि ब्रेक दाबून थांबली. आता मात्र अंगाला घाम सुटू लागला. माझी नजर गाडीकड़े आपोआप वळली. गाडीतून एक व्यक्ती खाली उतरत होती. तिची पावल माझ्याच दिशेने येत होती. तशी मनातील भीती वाढतच होती. पण क्षणात भीतीचा भ्रम दूर झाला आणि त्या आकृतीला कुठेतरी पाहिले असे जाणवले. पण नेमके लक्षात येत नव्हते. त्या व्यक्तिने माझ्या मिस्टरांना मदत ही केली आणि पाच मिनिटांत गाड़ी तयार झाली.
मी जेव्हा गाडीत बसले तेव्हा मात्र त्या व्यक्तीने “ओळखले का मॅडम?” मूल्यवर्धन कार्यक्रमात तुम्ही प्रेरक म्हणून आम्हांला होता” असे म्हटले. त्याचवेळी त्या व्यक्तीने सांगितलेला मैत्रीचा प्रसंग ही क्षणात मला आठवून गेला. जास्त बोलत राहण्याची ती वेळ नव्हती. ती व्यक्ती तिच्या गाडीकडे गेली. आम्ही आमची गाड़ी स्टार्ट केली, पण मनातून तो प्रसंग काही जात नव्हता. खऱ्या मूल्यांची पोहचपावती मिळाली होती. मूल्यवर्धन कार्यक्रमातील उद्दिष्ट सफल झाले होते. माझे मन मी प्रेरक म्हणून काम केले या समाधानाने भरून आले होते.
-सुषमा सांगळे-वनवे (जि. प. प्रा. शा. वागदरी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद)
मी आणि मूल्यवर्धन
-सुषमा सांगळे-वनवे (जि. प. प्रा. शा. वागदरी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद)
स्वयंशिस्त
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त वाढीस लागली.
माझ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण झाली. मुले शाळेत वेळेवर येऊ लागली. मुले मित्र-मैत्रिनींना गरजेकामी मदत करु लागली. घरी आईला कामात मदत करु लागली. प्राण्यांप्रती दया, प्रेम निर्माण झाले. वृक्ष लागवड करु लागली.
-वीरभद्र काटकर
स्वयंशिस्त
-वीरभद्र काटकर
आपली शाळा
मुले शाळेतील चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी सांगतात. शाळेमुळे ज्ञान संपादन होते.
मुले शाळेचे सुंदर चित्र काढून रंग देतात. शाळेतील उपक्रम, सहल, प्रयोगशाळा, ई-लर्निंग इत्यादीविषयी माहिती देतात. शाळेमुळे ज्ञानात किती भर पडते ते सांगतात. स्व- अभिव्यक्तीला किती वाव मिळतो हे सांगतात. शाळेतील सर्व उपक्रमाचा भरभरुन आनंद मुले घेतात. आपल्या जीवनात त्या गोष्टीचे अनुकरण करतात.
-वीरभद्र काटकर
आपली शाळा
-वीरभद्र काटकर
मूल्यवर्धन कविता
मूल्यवर्धन अंमलबजावणी करत असताना आलेला अनुभव
शाळेमधील अजाण बालके हीच खरी संपत्ती
लोकशाहीची भावी ध्वजाही त्यांच्याच खांद्यावरती
समान संधी नित्य ही त्यांच्या दारी
मूल्यवर्धना समजू आपण, पंढरीची वारी
माध्यमामध्ये रोजच दिसती, माणुसकीला तडे
बालमनावर गिरवू आपण, संस्काराचे धडे
समजवून उद्दिष्टांची यादी, बदलू लागली शाळा
कथा, गाणी, गप्पा, गोष्टी, लेवूनी सजला फळा
गोष्टी वेल्हाळ गुरुजी झाले, मुले आनंदी झाली
बालस्नेही, आनंददायी नवीन धारा आली
स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, रुजू लागली अंगी
विसरून गेली भेद मुलेही, ब्राह्मण, दलित, भंगी
उत्तम संविधान जाणुनी, संस्कारी झाली मुले
शाळेमधून होऊ लागले, समतेचे जग खुले
मुथ्था यांचा वसा घेऊन यशस्वी झाली मुले
मानवतेचे आकाश झाले सारे यांना खुले
मानवता ही देवी मानू कुणाचेही न सांडो रक्त
नम्र भावाने आपण तिचे झालो पहा भक्त
-विनोद भागवत गादेकर (प्रेरक)
मूल्यवर्धन कविता
-विनोद भागवत गादेकर (प्रेरक)
विद्यार्थी नियम पाळू लागले
विदयार्थी शाळेचे नियम पाळतात. गणवेश घालून येतात. इतरांसोबत मैत्री टिकवतात. शिक्षकांचा आदर करतात. वर्ग स्वच्छ ठेवतात.
मैत्री टिकवण्यासाठी सतत काळजी घेतात. मित्रांबरोबर भांडण न करता प्रेमाने राहतात. डबा वाटून खातात. एकमेकांच्या वस्तुंची काळजी घेतात.
-सुनिता मोहिते
विद्यार्थी नियम पाळू लागले
-सुनिता मोहिते
मी आणि मूल्यवर्धन
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि विद्या प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांतून मुलांमध्ये दिसून आलेला बदल मी मांडत आहे.
मूल्ये ही शिकवावी लागत नाहीत तर ती मुलांमध्ये रुजवावी लागतात. हे काम पिढ्यानपिढ्या होत आलेले आहे, पण आजच्या गतिमान युगात कोणत्याही पालकाकडे किंवा आपल्या कोणत्याही नातेवाईकांकडे आपल्या पाल्यासाठी वेळ नाही. प्रत्येकाचे जीवन धावपळीचे झालेले असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम, काम आणि कामच! या जीवनशैलीमुळे पालकांना मुलांकडे लक्ष देणे शक्य नाही. यामध्ये काळाप्रमाणे बदल होणे गरजेचे आहे. ही बाब मुथ्था सरांच्या निदर्शनास आली व त्यांनी शासनासमोर अभ्यास, कृतीतून व उपक्रमांतून निदर्शनास आलेले मूल्यवर्धन विचार मांडले. मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याचे धाडस केले. या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने माझे अनुभव व विचार मांडत आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रम व त्यामधील विविध उपक्रम मला उपयोगी वाटले. शैक्षणिक क्षेत्रात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविल्यामुळे मुलांमध्ये होणारे बदल असे.
- श्रमप्रतिष्ठा- वर्गखोली स्वच्छ करणे, आईला कामात मदत करणे, बागकाम, अपंगांना मदत करणे, भेटकार्ड यामधून मुलांमध्ये श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रुजवता येते.
- राष्ट्रभक्ती- राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, संविधान, स्वातंत्र्य दिन भाषणे, महापुरुषांच्या कथा, स्वातंत्र्य चळवळ याविषयी सांगणे.
- सर्वधर्मसमभाव- सर्व धर्म व जाती एक समान असून मानवधर्म हा सर्वश्रेष्ठ आहे हे अशा उपक्रमांतून मुलांना समजणे सोपे झाले.
- वैज्ञानिक दृष्टीकोन- अस्वच्छ पाण्यामुळे होणारे आजार, शास्त्राची माहिती, अंधश्रद्धा निर्मूलन माहिती, प्रथमोपचार इत्यादी.
- संवेदनशीलता- निसर्गाविषयी माहिती, निसर्ग कविता, वनभोजन, शेती व्यवसायाला भेटी व माहिती इत्यादी ६) वक्तशीरपणा- स्वतःचे काम स्वतः करणे, सर्व कामे वेळेत पूर्ण करणे.
- नीटनेटकेपणा- वर्गात रांगेत प्रवेश करणे, सौंदर्य वस्तू मांडणे
- सौजन्यशीलता- अभिवादन करणे, शिष्टाचार पाळणे, नम्रतेने वागणे, पाहुण्यांचे स्वागत करणे
हे सर्वच माझ्या वर्गात सुरू केले. जसेजसे उपक्रम सुरू केले, तसेतसे वरीलप्रमाणे मुलांमध्ये बदल घडून आल्याचे मला दिसून आले. मुले एकमेकांना सहकार्य करू लागली. परस्परांमध्ये आपुलकी दिसून आली. आपापसात न बोलता चर्चेत सहभागी होऊ लागली. बोलण्यात, वागण्यात बदल झाला. स्वतःचे आरोग्य सांभाळू लागली. श्रमदान करू लागली. असे सर्व बदल मूल्यवर्धन उपक्रमामुळे झालेले मला दिसून आले. हे बदल आपल्या पाल्यात पाहून पालकही खूप प्रभावित झाले. खरोखरच अतिशय चांगला उपक्रम आहे व मी नेहमी माझ्या वर्गात त्याची अंमलबजावणी करेन.
-अण्णाराव तरंगे
मी आणि मूल्यवर्धन
अण्णाराव तरंगे
मूल्यवर्धन
उपक्रम पुस्तिका खूप छान आहे. उपक्रमांची मांडणी व रचना, उपक्रम खूप चांगले आहेत.
इयत्ता पाहिली ते चौथीसाठी स्वतंत्र अशा शिक्षक उपक्रम पुस्तिका व विद्यार्थी उपक्रम पुस्तिका आहेत. उपक्रमांची मांडणीदेखील चांगली आहे. तसेच भाषा, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण इत्यादी विषयांच्या अध्ययन निष्पत्तीशी सुसंगत असे उपक्रम सदरील पुस्तिकेमध्ये आहेत.
-दत्तात्रय वायकर
मूल्यवर्धन
-दत्तात्रय वायकर
विद्यार्थ्यांमधील बदल
मूल्यवर्धनमधील उपक्रमांची मदत
मूल्यवर्धनमधील वर्गनियमांमुळे विद्यार्थ्यांना शिस्त लागते. ते आपल्या मित्रांनादेखील शिस्तीत राहण्यासाठी मदत करतात. वृक्षारोपण व संवर्धन याचे फायदे लहानलहान उपक्रमांतून समजतात. पाण्याची बचत व पावसाचे पाणी याबाबत माहिती मिळते. पावसाची गाणी गातात. वैयक्तिक स्वच्छतेची माहिती गीतातून मिळाल्यामुळे ती चिरकाल टिकते. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयात मूल्ये रूजल्याने त्याचा फायदा कुटुंब व देशासाठी होतो. विद्यार्थी कचरापेटीतचा वापर आवर्जून करतात. ‘आनंदाची उडी’ या खेळातून विद्यार्थ्यांच्या मनातील विचार समजतात. अशा साध्या उपक्रमांतून आपल्याला धयेय गाठता येते.
-संगीता भिसे
विद्यार्थ्यांमधील बदल
-संगीता भिसे
मूल्यवर्धन अतिशय उपयुक्त कार्यक्रम
मूल्यवर्धन कार्यक्रम शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी खूपच उपयुक्त आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवधानोरा शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम राबवून शालेय विद्यार्थी व संपूर्ण शाळेमध्ये आमूलाग्र बदल झालेले आहेत. विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील आंतरक्रिया अगदी यथायोग्य घडून आल्याने विद्यार्थी अगदी आनंदाने अध्ययन प्रक्रियेत सहभागी होत आहेत. सहयोगी अध्ययन पध्दतीने अध्ययन केल्यामुळे सर्वच मुले आपले स्वतःचे विचार इतरांसोबत व्यक्त करू लागले आहेत. त्यांच्यात अध्ययनाची गोडी निर्माण झाली आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम अध्ययन क्षमता वाढवण्यासाठी खरोखरच उपयोगी आहे
-नवनाथ तुंदारे
मूल्यवर्धन अतिशय उपयुक्त कार्यक्रम
-नवनाथ तुंदारे
अनुभव कथन
मूल्यवर्धन कार्यक्रम शिक्षक-विद्यार्थी-समाज यांच्यातील नाते वृद्धिंगत करणारा महत्त्वाचा दुवा आहे. यामुळे समाजात एकात्मतेबरोबरच जिव्हाळा निर्माण होण्यास मदत होत आहे. या कार्यक्रमामुळे स्वत:बरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसून येत आहे. या बदलांचा परिणाम समाजावर होत आहे. त्यामुळे समाजाचा शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रथम झेंडेवाडी ता. भूम येथील जिल्हा परिषदेच्या छोट्याशा शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाला सुरूवात झाली. मी माझे भाग्य समजतो की त्यावेळी मी त्या शाळेचा एक घटक होतो. हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी शिक्षक-विद्यार्थी-पालक-समाज यांच्यात योग्य सुसंवाद घडत नव्हता. पण उपक्रम पुस्तिकेतील घटकांनुसार व वेळोवेळी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने केलेले मार्गदर्शन खूप कामी आले. त्यातून विद्यार्थ्यांमार्फत उपक्रमाद्वारे घराघरात व त्यानंतर समाजात हा कार्यक्रम पोहोचला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्णय क्षमता वाढली. त्याचबरोबर ते सर्वांशी आदराने वागू, बोलू लागले. तसेच शाळेत व घरामध्ये आवडीने कामे करू लागले. त्यामुळे पालक व समाज शाळेकडे चांगल्या दृष्टीने पाहू लागला.
आता मी जि. प. प्रा. शा. रामकुंड, ता. भूम या शाळेवर कार्यरत असून पूर्वीच्या शाळेतील मूल्यवर्धन उपक्रमाचा अनुभव कामी आला. या शाळेमधील शिक्षकभगिणी श्रीम. जयश्रीताई गायकवाड व श्रीम. मंगलताई कुटे यांच्या सहकार्यातून हा उपक्रम अतिशय प्रभाविपणे राबविण्यास सरूवात केली. विद्यार्थ्यांमध्ये होत असलेला सकारात्मक बदल पाहून पालकवर्ग व समाज शाळेकडे आकर्षित होऊ लागला. विद्यार्थी घराघरातील आई- वडील किंवा इतरांतील तंटे मिटवू लागले. आजी-आजोबांशी प्रेमाने राहू लागले. त्यामुळे घराघरात जिव्हाळा निर्माण होण्यास मदत झाली. एवढेच नाही तर पालकांमध्ये असलेले तंबाखू, दारू, विडी यांचे व्यसन सोडण्याचा आग्रह धरू लागले. त्यामुळे काही पालकांनी असलेले व्यसनही सोडून दिले. आज रामकुंड गावाची वाटचाल व्यसनमुक्तीकडे सुरु आहे. गावातील विघातक राजकारण बाजूला जाऊन एकोपा निर्माण झाला आहे. याचा परिणाम असा झाला की गावकऱ्यांनी मिळून शाळेसाठी मैदान करून दिले. शाळाइमारतीला आकर्षक बोलकी रंगरंगोटी करून दिली. याकामी दीड लाख रूपये खर्च करण्यात आला. वेळोवेळी शाळेने आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सहकार्य करतात. ज्या शाळेवर पूर्वी गावकऱ्यांच्या त्रासापायी शिक्षक येण्यास घाबरत होते. आता तेथेच गावकऱ्यांचे व शाळेचे बदलले रूप पाहाण्यासाठी अनेकजण येत आहेत. याचे सर्व श्रेय मूल्यवर्धन कार्यक्रमाला जाते. असा हा उपक्रम यापुढेही वृद्धिंगत होत जावो ही मनोमन अपेक्षा.
-साळुंके दादासाहेब अभिमान
अनुभव कथन
-साळुंके दादासाहेब अभिमान