शाळा बोलू लागली
मूल्ये शिकविली जात नाहीत, ती रुजवावी लागतात ही शिकवण मूल्यवर्धनमुळे मिळाली. खूप सकारात्मक बदल शाळेत, विद्यार्थ्यांमध्ये व माझ्या स्वतःमध्ये व्हायला लागले.
2015-16 च्या दाखल पात्र यादीत प्रशिल चाटे हे नाव होते. गृहभेट दिली असता त्याला आमच्या शाळेत यायचे नव्हते. त्याला व्हॅनमध्ये बसून कॉन्व्हेंटमध्ये जायचे होते. खूप समजविल्यानंतर तो आईसोबत शाळेत येऊ लागला. त्याच्यासोबत आईची पण शाळा सुरू झाली. तो आईला घरी जाऊ द्यायचा नाही. आईला घरी पाठविले तर, आक्रमक होऊन तो दुसऱ्या मुलांना दगडसुद्धा मारायचा. घरी खूप लाड व्हायचे प्रशिलचे ! त्यात भर म्हणजे, वाईट संगतीमुळे तो व्यसनाच्या आहारीसुद्धा जाऊ लागला होता.
गुगल या पुडीचे सेवन तो शाळेतसुद्धा करायला घाबरत नव्हता. दादागिरी करणे त्याला आवडायला लागले होते. परिणामस्वरूप तो अप्रगत घोषित झाला.
आधुनिक युगात स्वतःला अद्ययावत ठेवायला प्रशिक्षणे फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असतात. असेच एक महत्त्वपूर्ण मूल्यवर्धन प्रशिक्षण माझे झाले. मी स्वतः बदलायला लागले. सकारात्मकता माझ्यात आली. या माझ्यातील बदलामुळे मी प्रशिलला अभ्यासू लागले. त्याला प्रेमाने जवळ घेऊन नवीन मैत्रीचे नाते निर्माण केले. त्याला जबाबदारीचे काम द्यायला सुरुवात केली. जसे : हिशोब करणे, पैसे जमा करणे, जयंतीनिमित्त त्याच्या हातून प्रतिमेचे पूजन करायला सुरुवात केली. त्याच्या मताला महत्त्व द्यायला सुरुवात केली. परिणामस्वरूप त्याला जाणीव झाली की, आपण खूप महत्त्वपूर्ण घटक आहोत. तो हळूहळू बदलू लागला. अभ्यासातही त्याने प्रगती केली.
आज प्रशिल उत्कृष्टपणे आपले मत मांडतो. शाळेत नेते म्हणून, आईला लाथ मारणारा प्रशिल, आज रोज शाळेत येण्याआधी आईला आधी नमस्कार करतो. हा बदल फक्त प्रशिलमध्येच झाला असे नाही, तर शाळेतील इतर मुलांमध्येसुद्धा सकारात्मक बदल पहायला मिळतो आहे. शाळेत येण्याचा कंटाळा करणारी मुले आता सुट्टी झाली तरी घरी जायला तयार नसतात आणखी कविता , गोष्टी नाही तर सहयोगी खेळ घेण्याचा आग्रह करतात.
मूल्ये ही कधीच शिकविली जाऊ शकत नाहीत. असलेल्या मूल्यांचे फक्त संवर्धन करण्याचे काम शिक्षकच उत्तमरित्या करू शकतो. आदर्श नागरिक व प्रगल्भ पिढी निर्माण करण्याचे काम शिक्षक करू शकतो.
लाख दिप कम है, जशन मनाने के लिये।
एक मूल्यवर्धन ही काफी है, रास्ता दिखाने के लिये।
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थीच बदलतो असे नाही तर ती सकारात्मक ऊर्जा विद्यार्थ्यांसोबत घरी जाऊन घरातील व्यक्तीसुद्धा बद्दलताना आम्ही या उपक्रमामुळे पाहिले आहे. या मूल्यवर्धनमुळे परत आमची शाळा बोलू लागली आहे. मूल्यवर्धनला आमच्या खूप खूप शुभेच्छा.
-कु. नीता माधवराव जाधव
शाळा बोलू लागली
-कु. नीता माधवराव जाधव
सुरक्षितता आली मनी
मनीषमध्ये मूल्यवर्धनमुळे झालेला बदल
ही गोष्ट आहे वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील एका छोट्याशा जि. प. प्राथमिक शाळा, सुलतानपुर शाळेची. मनीष गणेश येरेकार हा इयत्ता तिसरीचा विद्यार्थी. मनीष अडीच महिन्यांचा असतानाच वडिलांचा अपघातात मृत्यू झाला. आईने दुसरे लग्न केले. आता मनीषला मायेने जवळ घेणारे उरले ते फक्त आजी-आजोबा व काका-काकू.
मनीष तसा इयत्ता पाहिलीत असताना त्याच्या काका-काकूजवळ हिंगणघाटच्या शाळेत शिकायला होता. परंतु तो नेहमी गावातच फिरताना दिसायचा. एके दिवशी मॅडमने विचारले, “मनीष, तू आमच्या शाळेत येतोस का? तुला आमची शाळा आवडते का?” तेव्हा त्याने गप्प राहून फक्त होकारार्थी मान हलवली. मुख्याध्यापक वासनिक मॅडम व शिक्षिका देशमुख मॅडम यांनी मनीषला गावात आपल्या शाळेत दाखल करावे यासाठी शिक्षण व गुणवत्तेबाबत पालकांना आश्वस्त केले. त्यामुळे आजी-आजोबा मान्य झाले व काका-काकूनेदेखील आपले बिऱ्हाड गावातच आणले.
इयत्ता दुसरीत आम्हांला एक विद्यार्थी मनीषच्या रुपात मिळाला. सुरुवातीला मनीष फार मस्तीखोर होता. शिक्षणातील गोडी नव्हतीच जणू! राहणीमान गचाळ, घाणेरड्या सवयी, तोंडात नेहमी शिवीच असायची. सरळ तर कधी बोलायचाच नाही. त्याला सतत असुरक्षितेची भावना त्रस्त करायची. काहीही विचारलं तरी गप्पच! खोटे बोलणे, अभ्यासाकडे लक्ष न देणे या कारणाने काकूदेखील त्रस्त होती. एके दिवशी काकू शाळेत आली आणि ती म्हणाली, “मनीष काहीच अभ्यास करत नाही. काहीच म्हणवून दाखवित नाही. खोटे बोलून पैसेही नेतो.”
आता गरज होती ती त्याला प्राथमिक गरजेच्या पूर्ततेची! ती प्राथमिक गरज म्हणजे प्रेम व सुरक्षितता होय. विविध गोष्टींतून, कृतीतून आम्ही ती त्याला देण्याचा प्रयत्न करीत होतो. अशातच गुणवत्तेला हात घालून विविध चांगल्या गोष्टीची घडण त्याच्यात व्हावी, असा आमचा प्रयत्न होता. त्याच्या घाणेरड्या सवयी, शिवीगाळ बंद झाली, परंतु त्याची अबोल कळी खुलता खुलेना! अशातच दुसरा वर्ग पास होऊन विद्यार्थी नवीन सत्रात आले.
मनीष आता तिसरीत गेला. सर्वांसोबत शिकू लागला. परंतु कुठेतरी असुरक्षित, अनाथ असल्याची सल त्याच्यात दिसून येत होती. अशातच मूल्यवर्धन प्रशिक्षण आयोजित झाले आणि मी ते प्रशिक्षण घेतले. मनीषच्या बाबतीत करावयाच्या सर्व उपायांची जणू मला साखळीच सापडली. मी व माझे कुटुंब, माझ्या क्षमता अंतर्गत मित्रांची ओळख, मित्रांची गरज, मित्रांमधील गुणवैशिष्ट्ये या पाठावर अध्यापन करीत असताना जोडीचर्चा आयोजित करण्यात आली. चांगला मित्र, मित्रांचे गुण हा विषय चर्चेसाठी निवडला होता. यात त्याचा मित्र अंशूलने त्याच्यात असणारे चांगले गुण त्याच्या नकळत मांडले. जसे- इतरांना मदत करणे, चांगले बोलणे, वागणे, कवितागायन, खेळताना नियमांचे पालन असे मनीषचे गुण सांगितले तेव्हा माझेही निरीक्षण होते मी ही कुणाचा मित्र आहे, मलाही सर्वांसारखा मान मिळतो असा भाव त्याला हरखवून गेला. सहयोगी खेळात जिंकताना सर्वांचाच सहभाग आवश्यक असतो. सर्वांनाच समान संधी असते. यातून त्यांच्यात आत्मविश्वास वाढत गेला.
‘धन्यवाद यास्मिन!’ या उपक्रमाप्रमाणे तो आपल्या आजी-आजोबांना मदत करतो. ‘यास्मिन म्हणजे मनीषचीच भूमिका दर्शविते’ या भावनेने त्याच्यात स्वआदर निर्माण झाला आणि यतीनाचे मित्र या पाठातून वर्गातील सारे विद्यार्थी मूल्याधिष्ठीत वाटचाल करू लागले. त्यात अनाथ मनीष सामुदायिक कुटुंबाच्या, मित्र-मैत्रिणीच्या शालेय सुरक्षिततेच्या वलयात स्वतःला सुरक्षित समजू लागला. अशातच त्याची अबोल कळी खुलायला लागली. मॅडमशी कानगोष्टी करू लागला. दररोज घडणाऱ्या घडामोडीतून त्याला आनंद वा दु:ख झाले असल्यास सांगू लागला आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ लागला.
कविता गुणगुणारा आमचा मनीष एकेदिवशी भजन गुणगुणु लागला. सर्वांनी त्याच्या सुप्तगुणांचा शोध घेत मनीषला एका कार्यक्रमात भजन सादर करण्याची संधी दिली. त्याने त्या संधीचं सोनं केलंच. मूल्यवर्धनातून आमचा सुसंस्कारित, स्वआदर जाणणारा, भाग्याने अनाथ असला तरी मूल्यांची शिदोरी आयुष्यभर जोपासणारा सुस्वर गळ्याचा मनीष आम्हांला उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून गवसला !!!!
-मयुरी देशमुख
सुरक्षितता आली मनी
-मयुरी देशमुख
“टिचर, आम्ही सुद्धा !”
मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्हा परिषद शाळांमधून होणे हा अत्यंत स्तुत्य विषय आहे. या अनुषंगाने या उपक्रमाच्या अंमलबजावणीतून दिसून येणारे सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेले आहेत. प्रेरक व शिक्षक या दोन्ही भूमिका पार पाडताना एक चैतन्य मला गवसत गेलं, …. टिचर, आम्ही सुद्धा !!!
प्रथमच शाळेला मूल्यवर्धन शिक्षणाचा आयाम मिळाला. अनौपचारिकतेस औपचारिकतेची जोड मिळून मूल्यांची जपणूक म्हणजे राज्यघटनेचे सबलीकरण व मजबूत भारताची निर्मिती हे मला पटले. मूल्यवर्धन प्रशिक्षणातून अवगत झालेले प्रत्येक तंत्र वापरून व विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, मूल्यवर्धन शिक्षक उपक्रम पुस्तिका, विद्यार्थी उपक्रम पुस्तिका या दोन्हींचा वापर नियोजनबद्ध करून सहयोगी खेळांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीस आकार मिळत गेला. राज्यघटनेतील मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजविली जात आहेत, ही जाणीव प्रेरणा देत गेली आणि जेव्हा मी मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेतील एखादी गोष्ट विवरणास किंवा प्रश्नोत्तरास घेत असते, तेव्हा विशिष्ट हेतूने समोर असणारी अध्ययन निष्पत्ती मिळत गेली.
माझ्या वर्गातील ३० विद्यार्थी या तासिकेत आनंदाने सहभागी होतात. विविध मुद्यांबाबत माझ्याशी चर्चा करतात. मूल्ये रूजावित म्हणून मी वापरत असलेली तंत्रे यशस्वी ठरत आहेत, असे मला लक्षात आले. मी मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेतील एखाद्या कथेचे कथाकथन करून मग त्यावर आधारित त्यांना स्वानुभव कथन करण्याचे आवाहन करते, त्यावेळी हात उंचावून ‘टिचर ! आम्ही सुद्धा !!!’ हा त्यांचा उंचावलेला मंजूळ स्वर कानी येताच मला आनंद होतो.
हे केवळ शाब्दिक वर्णन नाही, तर मी प्रत्यक्ष त्यांच्या वर्तणूकीतील बदलाचे निरीक्षणही केले. पालकांचे अनुभवही घेतले. ते देखील सकरात्मक आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचे ध्येय प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र यामध्ये ठरविलेले पंचवीस निकष, अध्ययन निष्पत्ती, बालस्नेही अध्यापन, दिव्यांग बालकांचा शाळेत प्रवेश अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांना समांतर चालणारा असा हा कार्यक्रम आहे.
माझी शाळा, माझा वर्ग, माझा तो या समग्र शाळा दृष्टीकोणातून विचार व कार्य प्रारंभ होत गेले. समष्टीकडून व्यष्टीकडे प्रवास असाच अविरत सुरू राहो या शुभकामना.
-कु. रूपाली गजाननराव उपाध्ये
“टिचर, आम्ही सुद्धा !”
-कु. रूपाली गजाननराव उपाध्ये
मूल्यवर्धन : नवसंजीवनी शिक्षणाची
शिक्षण हे नुसते शिक्षण नसून त्यातून मानवाचा खरा विकास होतो. मानवी जीवन जगताना मानव काही मूल्ये अंगिकारून जगत असतो. सध्याच्या आधुनिक जगात वावरताना कुठेतरी नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेला आढळून येत आहे. बालगुन्हेगारीचे वाढते प्रमाण, व्यसनाधिनता, वाईट सवयी इत्यादी मूल्यांच्या ऱ्हासाची कारणे. त्यालाच एक अपवाद म्हणजे मूल्यवर्धन कार्यक्रम. शिक्षणामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम म्हणजे एक नवसंजीवनीच.
मूल्यवर्धन कार्यक्रमात मला सहभागी होण्यास मिळाले ही तर माझ्यासाठी नवीन पर्वणी. सन 2018-19 मध्ये मी प्रेरक म्हणून मूल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रशिक्षण घेतले. तो अनुभव मला आयुष्यभर लक्षात राहील. एक शिक्षिका असताना विद्यार्थी म्हणून मी सर्व उपक्रमांमध्ये सहभागी झाले, उपक्रम घेतले सुद्धा. प्रशिक्षणानंतर वर्गामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन उपक्रमांचे प्रत्यक्ष फारच छान अनुभव आले. मुलांमध्ये स्वातंत्र्य, न्याय , समता, बंधुता ही चार घटनात्मक मूल्ये रुजवायची. ती या अभ्यासक्रमामधून रुजविण्यास मला फारच मदत झाली.
छोट्याछोट्या गोष्टींच्या माध्यमातून सहयोगी खेळाद्वारे मुलांमध्ये हरवलेला निर्मळ आनंद, मनमोहक हास्य, त्यांची छोटी छोटी दुःख, आनंद या सर्व या सर्व गोष्टी मी मुलांशी सुसंवादाने हितगुज करू लागले. माझ्या अध्यापनातील आनंद मलाच प्राप्त झाला. मूल्यवर्धनच्या निमित्ताने माझे छोटेछोटे विद्यार्थी माझे मित्र कधी झाले, हे मला व त्यांनाही कळलेच नाही.
उपक्रम पुस्तिकेतील उपक्रम ४ विभागांत विभागले गेले आहेत.
(१) मी व माझ्या क्षमता (२) माझ्या जबाबदाऱ्या (३) माझे नाते संबंध (४) मी आणि आपले जग हे सर्व उपक्रम राबविताना लहानसहान कथा, प्रत्यक्ष अनुभव, सहयोगी खेळ घेतल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी निगडित सर्व गोष्टींचे ज्ञान प्राप्त झाले. त्यातच आमचे तालुका समन्वयक श्री. विठ्ठल कुंडलकर व श्री. ललित उदापुरे तथा केंद्रप्रमुख श्री. गजानन पुरी यांचे सदोदित मार्गदर्शनसुद्धा प्राप्त झाले असून उपक्रमांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शांतता संकेत, झक्कास टाळी. मूल्यवर्धन वर्ग उपक्रमाचे नाव काढले की, माझे विद्यार्थी आनंदाने उड्याच मारू लागतात. खेळ, गाणी, गोष्टी यांमधून विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्ये मी रुजवू शकले. विद्यार्थी उपस्थिती वाढवू शकले तसेच शिक्षक-शिक्षक, पालक-शिक्षक हे नातेसुद्धा घट्ट रुजण्यास मदत झाली . माझ्या मते शिक्षणासोबत मूल्यवर्धन उपक्रम म्हणजे मुलांच्या शिक्षणाला एक नवसंजीवनीच!
-हर्षा पंडित
मूल्यवर्धन : नवसंजीवनी शिक्षणाची
-हर्षा पंडित
मी आणि मूल्यवर्धन
माननीय शांतिलाल मुथ्था यांनी सुरू केलेला मूल्यवर्धन कार्यक्रम फारच प्रभावी आहे. प्रत्येक शाळेमध्ये या कार्यक्रमाची नितांत आवश्यकता होती. सर्व शिक्षक आपापल्या परीने मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु या पद्धतीने मूल्य रुजवणूक व मूल्यवर्धन करणे फार सोपे व प्रभावी झालेले आहे. त्यामुळे मॅन मेकिंग आणि नेशन बिल्डींगसाठी फार मोठा हातभार लागलेला आहे.
आपण पूर्वीच्या काळापासूनचा जर विचार केला तर आपल्या सर्वांच्याच सहज लक्षात येतो की, मूल्यांशिवाय कुठलेच शिक्षण असू शकत नाही. प्रत्येक काळात, प्रत्येक अभ्यासक्रमात वेगवेगळ्या पद्धतीने मूल्ये ही अस्तित्वात होतीच. परंतु आजच्या इंटरनेटच्या झगमगाटात आजची पिढी भारतीय संस्कृती सोडून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करून स्वतःसोबत आपल्या कुटुंबासह पर्यायाने राष्ट्राला कुसंस्काराच्या खाईत लोटू पाहत आहे. अशा बिकट परिस्थितीत भावी पिढीला सावरण्यासाठी लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनविण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी मूल्यवर्धन हा कार्यक्रम शाळाशाळांत सुरू करून डुबत्या नावेला किनाऱ्यावर लावण्यासाठी सिंहाचा फार मोठा वाटा उचलला आहे .
मी एक प्रेरक म्हणजेच या कार्यक्रमाचा घटक म्हणून मनापासून सांगू इच्छितो की, मागच्या सत्रात मी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले. मी स्वतः या प्रशिक्षणापासून खूप प्रभावित व प्रेरित झालो. निसर्गात एकदम ढग दाटून यावेत आणि एकाएकी विजेचा लख्ख प्रकाश पडावा अगदी तसाच लख्ख प्रकाश माझ्या डोक्यात पडला. मला असे समजून आले की, शिक्षण म्हणजे केवळ बेरीज, वजाबाकी, वाचन, लेखन नसून जीवन जगण्यासाठी आवश्यक मूल्ये रुजवून एक सुसंस्कृत माणूस घडविणे होय. स्वामी विवेकानंद यांचे एक वाक्य नेहमी वाचनात येते की, मॅन मेकिंग शिवाय नेशन बिल्डींग होऊ शकत नाही. म्हणजेच जोपर्यंत आपण मुलांना मशीन बनविण्याऐवजी माणूस बनविणार नाही, तोपर्यंत देश घडणार नाही. त्यासाठी खरंच मूल्यवर्धन कार्यक्रम फार महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
मी माझ्या शाळेत हा उपक्रम सुरू केला आहे. मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो की, मी भलेही मूल्यवर्धनचे पुस्तक मुलांकडून भरून वा लिहून घेतले नसेल, पण त्या पुस्तकांचा आधार घेऊन माझ्या मुलांमध्ये एक सुजाण व सुसंस्कृत माणूस घडविण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यांचा एवढा अप्रतिम व सुंदर अनुभव मला दिसला की, माझी मुले खूप समजून वागायला लागली. त्यांना शाळा व शिक्षणाचे महत्त्व समजल्यामुळे या उपक्रमामुळे आपोआपच स्वतःहून अभ्यास करण्याकडे वळली. त्याचा फायदा मुलांना भावी आयुष्य सुंदर होण्यास होईल. म्हणूनच हा उपक्रम सुरू करणारे माननीय शांतिलाल मुथ्था यांनी हा कार्यक्रम असाच निरंतर राबवावा, अशी विनंती.
-शंकर शेंडे
मी आणि मूल्यवर्धन
-शंकर शेंडे
वृक्ष संवर्धन
वृक्षाचे आपल्या जीवनातील महत्त्व. संतांनी त्यांच्या लेखनशैलीतून वृक्षांविषयी केलेले वर्णन आपल्याला कशाप्रकारे निस्वार्थीपणे सेवा देतात याविषयी मी पुढील अनुभवकथनमध्ये नमूद केले आहे.
माणसाला वृक्षवेलींचे मोठेपण, त्यांची आवश्यकता फार पूर्वीच कळली आहे. म्हणूनच एका संस्कृत श्लोकात सांगितले आहे की, जे त्यागाच्या भावनेने स्वत: उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात, ज्यांची फळे-फुलेही दुस-यांसाठीच असतात, असे त्यागमय जीवन जगणारे वृक्ष एखाद्या सत्पुरुषासारखेच भासतात. या वृक्षरूपी सत्पुरुषाचे सानिध्य अबालवृद्धांना, सामान्य जनांना लाभावे असे वाटते. म्हणूनच ऋषीमुनी रानावनात वस्ती करून निसर्गाच्या सान्निध्यात अध्ययन आणि तपश्चर्या करीत असत. संत तुकाराम म्हणतात, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ इंदिरा संत म्हणतात, ‘जरी वेधिले चार भिंतींनी, या वृक्षांची मजला संगत’.
सामान्य माणूसही नेहमीच्या दगदगीपासून दूर जाण्यासाठी, हवापालटासाठी थंड हवेच्या ठिकाणी निसर्गाच्या सान्निध्यातच जातो. अशा या उपकारकर्त्या वृक्षांचा आज ऱ्हास होत आहे. मानवाने बेसुमार जंगलतोड करून वैराण वाळवंटे निर्माण केली आहेत. ‘After man the desert’, ‘मानवाचे पाऊल नि वाळवंटाची चाहुल’ अशी म्हण आहे. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली. त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदूषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागत आहे. आपल्या पूर्वजांनी मानवी जीवनात वृक्षांना महत्त्व दिले होते. तुळस, वड, पिंपळ यांची पूजा ते करत असत. त्यांनी तुळस, बेल, दुर्वा, धोतरा या आणि अन्य वनस्पतींना देवतांच्या पूजेत स्थान दिले होते.
वने ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ते खनिज संपत्तीप्रमाणे ओहोटीस लागणारे धन नाही. म्हणूनच सरकारने वनमहोत्सव हा राष्ट्रीय सण मानलेला आहे. सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षसंरक्षणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत. आज पृथ्वीची अवस्था वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. झाडे, जंगले कमी झाली. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. काही शतकांपूर्वी पृथ्वीचा सुमारे ६०% भाग वनांनी व्यापलेला होता. सध्या पृथ्वीच्या केवळ २१% भागातच वने आहेत. निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे मोडली तर दुरूस्त करणेही जमण्यासारखे नाही. म्हणून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वृक्षतोडीमुळे एक दिवस ही पृथ्वी रसातळाला जाईल अशी भीती निर्माण झाली आहे.
आज जंगलतोडीचे दुष्परिणाम निर्माण झाले आहेत. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत. ते मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे आज अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांमध्ये बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. गतवर्षी केदारनाथला झालेली भयावह परिस्थिती जंगलतोडीचे परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि सर्व लोकांना जंगलाचे महत्त्व समजावे म्हणून मी या प्रकल्पाची निवड केली आहे.
मला या अनुभव कथनातून जंगलतोड रोखणे, जंगलतोडीमुळे मानव व पर्यावरणावर होणारा परिणाम हे दर्शवायचे होते व त्याचप्रमाणे मी वृक्षांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
-पांडुरंग कुरवडे
वृक्ष संवर्धन
-पांडुरंग कुरवडे
हिरा चमकतो तेव्हा. . . . . . .
मी आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना घेऊन जि. प. वर्धा येथील जि. प. प्राथ. शाळा, खंबित येथे रूजू झालो. पाहताक्षणीच शाळेचा सुंदर परिसर, सगळीकडे हिरवळ. बघताच मनात भरेल असा शाळेचा निसर्गमय परिसर. त्यात खेळणारी चिमुकली व आम्ही दोघे शिक्षक. मी व कैलास सर. त्या सर्व चिमुकल्यांच्या आनंदात एक शांत बसलेला, स्वमग्न असा तो वर्ग पहिलीतील समीर. निष्पाप, अबोल, एकाकी पडलेला, थोडा क्रूर प्रवृत्तीचा, अस्वच्छ राहणीमान. अशा या मुलांत बदल कसा करावा, हा माझ्यापुढे यक्ष प्रश्न पडला. पण शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणेच्या अनुषंगाने मूल्यवर्धन हा उपक्रम राबविण्यात आला. त्या उपक्रमाचा मला माझ्या वर्गात 100% प्रतिसाद मिळाला.
समीरच्या घरचे वातावरण सामान्य. गरीबीची परिस्थिती त्यात पालकांचे होणारे दुर्लक्ष. त्यामुळे समीरला कसे रहावे, जेवण कोणत्या हाताने करावे यांचे भानच नव्हते. पण मूल्यवर्धन उपक्रमामुळे समीर नियमित शाळेत येऊ लागला. एकटा राहणारा समीर हसू लागला, खेळू लागला, नाचू लागला, बोलू लागला. मला पेन पकडता येत नाही, मला काढता येत नाही म्हणणारा समीर आज स्वहस्ते मुळाक्षरे गिरवतो, लेखन करतो, संख्या मोजतो. त्याचा हा नियमितपणा पाहून त्याचे पालक व ग्रामस्थही आश्चर्यचकितच झाले व म्हणू लागले सर, “समीर शाळेत येतो व दिवसभर शाळेत बसतो याचे आम्हांला नवल वाटते.”
आज समीर स्वच्छ राहतो. रोज शाळेत येतो. दिलेला अभ्यास त्याच्या गतीने का होईना पूर्ण करतो. समीरने चक्क सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये झिंगाट गितावर नृत्य सादर करून इतरांना कौतुक करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला व त्याच्यामधील सुप्त गुणाला वाव मिळाला. एके दिवशी मी मुलांना प्रश्न केला, तुमच्या आवडता खेळ सांगा. तेव्हा कुणी क्रिकेट, कबड्डी, लंगडी, लपाछपी सांगू लागले. समीर बोलला भवरा थोडा अस्पष्टच. मी त्याला दुसऱ्याच दिवशी भोवरा आणून दिला. तो इतका खूष झाला की, लगेच घरी गेला व दोरी घेऊन आला. समीरने भोवरा असा भर्रकन फिरवला की तसा भोवरा मला व शाळेतील कोणत्याही विद्यार्थ्यांना फिरविता आला नाही.
समीरपासून जी मुले दूर पळायची, तीच मुले त्याच्यापासून ‘भोवरा कसा फिरवावा?’ हे शिकून घेत आहेत.
-सचिन मडवी
हिरा चमकतो तेव्हा. . . . . . .
-सचिन मडवी
मी आणि मूल्यवर्धन
मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच रुजायला हवीत. भविष्यात त्यांच्यामधून चांगले लोकशाहीभिमुख नागरिक घडायला हवेत या उद्देशाने शाळांसाठी मूल्यवर्धनचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजावित आणि ते देशाचे जबाबदार नागरिक व्हावेत हा आहे.
ज्यावर संपूर्ण समाजाचा पाया अवलंबून आहे, ती नैतिक मूल्ये जर समाजात रुजली नाहीत तर समाजाचे अधःपतन होण्यास वेळ लागणार नाही. कुटुंबातून मुलांना संस्कार दिले जातात. शाळेत विविध उपक्रमांतून नितीमूल्ये मुलांच्या मनावर बिंबवली जातात. म्हणूनच लहानपणापासून मुलांवर मूल्यांची सहेतुक रुजवणूक करावी लागते, जेणेकरून मोठेपणी तो देशाचा आदर्श नागरिक घडू शकेल. या कार्यक्रमातून मला व विद्यार्थ्यांना विविध उपक्रम आणि सहशालेय खेळाचे महत्त्व पटायला लागले. मुलांना प्रार्थनेच्यावेळी ‘शांत बसा’ असे म्हणत घसा दुखवावा लागत असे. ते शांतता संकेत देऊन सगळं वातावरण शांत झालं. त्यांना स्वची जाणीव, स्वावलंबन, मोठ्यांचा आदर करायला लागले.
मुलांनी स्वत:पासून सुरुवात करून कुटुंब, परिसर, देश, विश्व याविषयी नितीमूल्ये आत्मसात केली. उपक्रमामध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वांची नावे चटकन सांगता आली. शिक्षक-पालक संपर्क वाढायला मूल्यवर्धनची खूप मदत झाली. मुले स्वतःचे नियम स्वतः तयार करू लागले. इतरांच्या मतांचा आदर करू लागले. शाळेच्या वातावरणात बदल झाला. मुले दररोज शाळेत येऊ लागली. स्वतः व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवत आहेत. मुलांमधील विविध गुण व कौशल्ये ओळखण्यासाठी मूल्यवर्धन उपक्रमाची मोठी मदत झाली. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यात विचार विनिमय होऊ लागला आहे. पालक आपली कर्तव्य जाणून घेऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी सुसंवाद साधू लागले आहेत. या सर्वांमध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. हसतखेळत शिक्षणाचा आनंद मुले घेऊ लागली आहेत. मूल्यवर्धन उपक्रम शाळेत राबविल्यापासून मुले स्वतंत्रपणे विचार करायला शिकली. योग्य की अयोग्य हे समजतात. सर्वांशी प्रेमाने वागतात. खरोखरच हा उपक्रम स्तुत्य आहे. या उपक्रमातून सुजाण नागरिक घडू शकतो.
-सविता पाटे
मी आणि मूल्यवर्धन
-सविता पाटे
सकारात्मक बदल
मी आणि मूल्यवर्धन अनुभवकथन
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र राज्यशासन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने ‘मूल्यवर्धन’ हा कार्यक्रम गेल्या चारवर्षांपासून महाराष्ट्र भर राबविण्यात येत आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर २००९ मध्ये बीड जिल्ह्यात राबविलेला हा कार्यक्रम. ज्यावेळी मी सहकाऱ्यांसमोर प्रेरक म्हणून उभा राहिलो तेव्हा सर्वांचा एकमेव प्रश्न माझ्या कानी आला. तो प्रश्न म्हणजे शासनाने निर्माण केलेला अभ्यासक्रम हा नैतिक मूल्ये व गाभा घटक यांना दुर्लक्षित करून केला आहे का? कारण नव्याने आणि वेगळा मूल्यवर्धन उपक्रम राबविला जात आहे.
परंतु तसे नसून घटनेतील मूल्ये रुजविण्याची पद्धत थोडी बदलली आणि बालकांच्या वयाचा विचार करून त्यांना काही प्रत्यक्ष कृतीतून अनुभव देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत येणारे अनुभव देण्याकरिता आठवड्यातून सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवशी प्रत्येकी १ तासिका ठरविण्यात आली. या उपक्रमच्या अनुभूती केवळ ३ तासिकेत बंदिस्त करू शकत नाहीत. मी वर्गव्यवस्थापन मूल्यवर्धन पद्धतीने केल्याने मुलांची आपापसातील भांडणे दूर झाली. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त वाढीस लागली. माझा ताण कमी झाला. बहुवर्ग अध्यापन पद्धतीसाठी मूल्यवर्धन वर्गव्यवस्थापन अतिशय उपयोगी ठरले. वर्गातील अबोल किंवा कमी बोलणारे विद्यार्थी गटचर्चा, जोडीचर्चा, सामुदायिक चर्चा या सहयोगी अध्यापन पद्धतीमुळे आपले मत मांडू लागले. विद्यार्थी समाजातील विविधता ओळखू लागले. सर्व धर्माच्या सणांचा आदर करू लागले. भाषिक कौशल्ये वाढू लागले. कथा तयार करु लागले, प्रमाण भाषेचा वापर करू लागले, विद्यार्थी-पालक, विद्यार्थी-विद्यार्थी संबंध दृढ झाले. उपक्रम शालेय अभ्यासक्रमाशी पूरक असल्याने अतिरक्त ताण पडत नाही. घटनात्मक मूल्यांशी सुसंगत शिक्षण हक्क कायदा २००९ आणि प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे २०१२ यांचा विचार करून अनुभूतीची रचना केल्याने भारताचा जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनण्यास उपयुक्त असा कार्यक्रम आहे.
-निवृत्ती पोटे
सकारात्मक बदल
-निवृत्ती पोटे
मूल्यवर्धन उपक्रमांतून संस्काराकडे
शैक्षणिक क्षेत्रात डिजिटल क्रांती घडून आली. सगळीकडे डिजीटल इंडियाचे वारे वाहू लागले. ग्रामीण भागातील शाळांचा चेहरामोहरा बदलू लागला. शाळांमध्ये अनेक नवनवीन प्रयोग, उपक्रम राबविले जावू लागले. काही शिक्षकांच्या प्रेरणेतून तर काही शासनाच्या धोरणातून अनेक उपक्रम शाळांमध्ये अजुनही राबवले जात आहेत. त्यातीलच एक शासकीय उपक्रम मूल्यवर्धन.
माझ्याही शाळेत अनेक उपक्रम मी राबवत असतो. त्यात मागील शैक्षणिक सत्रापासून मूल्यवर्धन हा उपक्रम मी शासकीय उपक्रम म्हणून सुरू केला. समाजात एक सुजाण, सुसंस्कृत, संवेदनशील व मूल्यनिष्ठ नागरिक तयार व्हावा, संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ही मूल्ये त्यांच्या अंगी रुजावित हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विद्यार्थी शाळेत येताना एकत्र येणे, इतरांना मदत करणे, शाळा स्वतः उघडणे, साफसफाई करणे, परिपाठ फळ्यावर लिहिणे, लहानमोठ्यांचा आदर करणे इत्यादी गोष्टी मूल्यवर्धन उपक्रम राबल्यामुळे सहजतेने करतात. याला मूल्यवर्धन उपक्रमाचे फलितच म्हणावे की, छोट्याछोट्या सहयोगी खेळांच्या माध्यमातून त्यांच्यात सहकार्य भावना वाढीस लागली. प्रत्येकाच्या वैयक्तिक मताला प्राधान्य मिळाल्याने स्वची जाणीव त्यांच्यात होऊ लागली. विद्यार्थी स्वतःच स्वतःसाठी नियम तयार करुन त्याचे कसोशीने पालन करु लागले. त्यामुळे शिस्त पाळा म्हणायची गरजच पडली नाही. स्वतःच्या कौटुंबिक नात्यासोबतच सामाजिक नातेही छोट्याछोट्या कथांच्या माध्यमातून त्यांच्यात नकळत रुजू लागले. समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ही संविधानिक मूल्ये मूल्यवर्धन उपक्रमातून विद्यार्थांमध्ये सहजतेने रुजताना मी पाहत आहे.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे हा उपक्रम प्रत्येक इयत्तेच्या पाठ्यक्रमाशी सुसंगत असा तयार केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगतीस पोषक असे वातावरण तयार होते. एकंदरीत मूल्यसंवर्धन होऊन देशाचे सुसंस्कारित नागरिक घडविण्यात या उपक्रमांचा मोलाचा वाटा राहील असेच म्हणावेसे वाटते.
मी या मूल्यवर्धन कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा उचलला, याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
-प्रवीण कांबळे
मूल्यवर्धन उपक्रमांतून संस्काराकडे
-प्रवीण कांबळे
वाईट सवयींचे उच्चाटन करणे
उद्याचे विद्यार्थी सुसंस्कारित, चारित्रसंपन्न, जबाबदार व कर्तव्यदक्ष असावेत, म्हणून त्यांच्यात चांगल्या सवयी व मूल्ये रुजविणे, लोकशाहीभिमुख नागरिक तयार करणे हाच उद्देश आहे.
विश्वगुरु बनण्याचे सामर्थ्य असलेल्या भारतभूमीत शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणजे मूल्यवर्धन होय, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुसंस्कारित भावी पिढी निर्माण करण्यासाठी तसेच भविष्यात त्यांच्यामधून चांगले लोकशाहीभिमुख, जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक निर्माण होण्यासाठी शाळांमधून हा उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणारा व मूल्यांची रुजवणूक करून जबाबदार, कर्तव्यदक्ष नागरिक बनवणारा हा कार्यक्रम असल्यामुळे तो इतर शैक्षणिक कार्यक्रमांपेक्षा वेगळा आहे. भावी पिढी संस्कारमय व्हावी ही खरी काळाची गरज असून एक चांगला माणूस बनणे ही देशाची गरज आहे. यासाठी हा कार्यक्रम खूप उपयुक्त आहे. म्हणून मी आदरणीय शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांचे आभार मानते व या स्तुत्य उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करते.
मूल्यवर्धन उपक्रमाअंतर्गत शिवाजी प्राथमिक शाळा नगरपरिषद, आर्वी येथे चांगल्या व वाईट सवयी या विषयावर उपक्रम राबविण्यात आला. चांगल्या सवयींमुळेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. चांगल्या सवयींचे रुपांतर कृतीत होत असते. म्हणून चांगल्या सवयी रुजविण्यासाठी मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका खूप उपयोगी ठरली. शाळा व शाळेतील वर्गखोल्या या केवळ चार भिंती नसून याच ठिकाणी राष्ट्राचे भवितव्य आकार घेत असते. म्हणून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावणे शिक्षकांचे कर्तव्य असते. शाळेत विद्यार्थी आल्यावर त्यांच्यासाठी शाळेतील वातावरण नवीन असते. म्हणून सुरुवातीला त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. त्यांचे वैयक्तिक निरीक्षण करून त्यांचे वागणे, बोलणे, त्यांचा पोशाख, केस, नखे यांचे सूक्ष्म निरीक्षण केले. चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून दिली. परिणाम समजावून सांगितले. याचेच एक उदाहरण म्हणून वर्गातील आदेश या विद्यार्थ्याने त्याच्याच मित्राची कंपासपेटी चोरली होती. मी संपूर्ण वर्गाची चौकशी केली, परंतु कंपास मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी मी मूल्यवर्धन पुस्तिकेतील चोरी या विषयावरील गोष्ट वर्गात सांगितली व वस्तू चोरीला गेल्यावर मनाला किती वाईट वाटते ते मुलांच्या लक्षात आणून दिले. वर्गात उपक्रम घेतला की, तुम्हीच तुमच्यातल्या चांगल्या व वाईट सवयी सांगा. मी त्या फळ्यावर लिहिते. सर्व मुलांनी आपल्या चांगल्या-वाईट सवयी सांगितल्या. सर्वात शेवटी आदेश उभा राहिला व तो रडू लागला. म्हणाला की, मीच काल कंपासपेटी चोरली होती. परंतु मला सांगायची भीती वाटत होती. मॅडम ही वाईट सवय आहे. मी आता कधीच चोरी करणार नाही अशी कबुली त्याने स्वतःच दिली.
मी त्याला जवळ बोलावून झालेल्या प्रकाराबद्दल प्रेमाने समजावून सांगितले. त्याच्यातील भीती नाहीशी केली. अशाप्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांच्या वाईट सवयींचे उच्चाटन करणे व चांगल्या सवयी रुजविणे यासाठी मूल्यवर्धन पुस्तिकेतील उपक्रमाचे मार्गदर्शन झाले. अशा अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगला वर्तनबदल घडून आला. मुलांमध्ये शिस्त निर्माण झाली. सहकार्याची भावना वाढीस लागली. शाळेतच मुलांवर योग्य संस्कार केले जातात आणि हेच वय संस्कारक्षम असते. योग्य मूल्यांची रुजवणूक या मूल्यवर्धन उपक्रमामुळे होत आहे.
भारताची भावी पिढी सुसंस्कारित, कर्तव्यदक्ष, जबाबदार, लोकाभिमुख तयार होईल अशी मी आशा व्यक्त करते व आदरणीय शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे अभिनंदन करून या उत्कृष्ट कार्यक्रमासाठी आभार मानून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते.
-कु, पदमा वि. चौधरी
वाईट सवयींचे उच्चाटन करणे
-कु, पदमा वि. चौधरी
विद्यार्थी वर्गात शिकत असताना आपापसात बोलत असायचे. घरी पाहिलेल्या टि.व्ही. वरील सिरीयलवर त्यांना चर्चा करायला आवडायचे. तर मग मुलांच्या घरच्या भाषेत गोष्ट सांगता येणे हा उपक्रम घेतला.
वर्गात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी जाताना चप्पल बाहेर ठेवतात.
दिव्यांग मुलांच्या मदतीला धावून जातात. पाण्याचा वापर काटकसरीने करतात.
-प्रमिला हातेकर
विद्यार्थी वर्गात शिकत असताना आपापसात बोलत असायचे. घरी पाहिलेल्या टि.व्ही. वरील सिरीयलवर त्यांना चर्चा करायला आवडायचे. तर मग मुलांच्या घरच्या भाषेत गोष्ट सांगता येणे हा उपक्रम घेतला.
-प्रमिला हातेकर
अन् मूल्यवर्धनातून सूर गवसला
मूल्यवर्धन संकल्पपूर्तीच्या माध्यमातून मला मनोगत व्यक्त करण्याची अनमोल संधी दिल्याबद्दल मूल्यवर्धन टीमचे मनापासून आभार. खरं तर मूल्यवर्धन टीमचा प्रेरक म्हणून मीही एक सदस्य आहेच. मी वर्धा जिल्यातील हिंगणघाट तालुक्यातील नगर परिषद श्रद्धानंद हिंदी प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. खरं तर मूल्यवर्धनातून मला आलेले अनुभव सांगावे तेवढे कमीच. त्यामुळे मी माझ्या अध्यापनकार्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाचा कसा वापर केला, त्यामुळे माझ्यात, विद्यार्थ्यांमध्ये कोणते सकारात्मक बदल झाले याविषयी मी आपले मनोगत व्यक्त करू इच्छितो.
शिक्षक हे समाजाचा महत्त्वपूर्ण घटक आहेत. ते समाजाला योग्य ती दिशा देण्याचे कार्य करतात. त्यांना मुलांवर योग्य ते संस्कार मूल्ये रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करावे लागते. त्यामुळे ते समाजाचे, देशाचे जबाबदार व्यक्ती असतात, असे मला वाटते. ही जबाबदारी मला शिक्षकी पेशाने प्राप्त झाली. दहा वर्षांपासून मी हे कार्य चांगल्याप्रकारे पार पाडत आलोय. त्याचा मला अभिमानच आहे, पण काहीतरी उणीव मला माझ्या शिक्षकीपेशात नेहमी जाणवत असे. शाळेत शिकवित असताना वेगवेगळ्या घटकांतून आलेली, वेगवेगळ्या बौद्धिक क्षमतेची, मुले समोर असत. त्यांना माझ्यापरीने अध्ययन अनुभव देण्याचा सदैव प्रयत्न करत असे. शिकविताना मी व मुले रमून जात असत. मुले रोज काहीतरी नवीन करण्याचा, शिकण्याचा व आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे मुलांना नेहमीचेच अध्यापन रटाळ वाटत असेल, असे मला जाणवले. त्यामुळे माझ्या अध्यापनात नाविन्यता कशी निर्माण होईल, याचा मी सतत विचार करून तसा प्रयत्न करत होतो. वेगवेगळे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत होतो. अन् मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सूर गवसला, ही संधी मला प्राप्त झाली.
सन 2018-19 च्या सत्रात आमच्या वर्धा जिल्ह्यातील शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यासाठी मूल्यवर्धन प्रेरक प्रशिक्षणपर कार्यक्रमात माझी प्रेरक म्हणून मा. केंद्रप्रमुख श्री. बावणे सर यांनी निवड केली. प्रशिक्षण विषयाची पुसटशी कल्पना माझ्या मनात प्रशिक्षणाअगोदर आली होती. चार दिवसीय प्रशिक्षणात प्रशिक्षक टीमने आम्हांला खूप मार्गदर्शन केले. आमच्या शंकांचे निरसन केले. कृतीयुक्त प्रशिक्षण असल्याने ते खेळीमेळीच्या वातावरणात झाले. प्रशिक्षणात मूल्यवर्धन म्हणजे नेमके काय आहे, त्यात शिक्षकाने कोणती भूमिका बजावावी, विद्यार्थ्यांत कोणती मूल्ये विकसित करण्यात मदत होईल, तसेच अध्यापन कार्यात मूल्यवर्धनची काय भूमिका राहील याचे सविस्तर मार्गदर्शन प्राप्त झाले. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मला माझ्या अध्यापन कार्यात जाणवणारी कमतरता भरून काढण्याची संधीच मिळाली होती.
उपक्रमांमुळे वर्गातील न बोलणारी मुलेही बोलू लागली, स्वतः कृतीयुक्त सहभाग घेऊ लागली. आपले मनोगत व्यक्त करू लागली. विद्यार्थी स्वतःचे वर्गनियम तयार करून त्याचे पालन करू लागले. शांतता संकेतांचे पालन करू लागले. यामुळे वर्गात नवचैतन्य निर्माण झाले. मला स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढीस लावण्यास मदत झाली. सहयोगी खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांत उत्साह निर्माण झाला. विविध नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींमुळे अध्यापनात रंजकता आली. जी मुले अध्ययन कार्यात मागे होती, ती मूल्यवर्धन उपक्रमामुळे स्वतः प्रयत्न करू लागली. विद्यार्थ्यांत योग्य ते संस्कार घडविण्यात मला मोलाची साथ मूल्यवर्धनमुळे मिळाली.
-राजेंद्रकुमार निमजे
अन् मूल्यवर्धनातून सूर गवसला
-राजेंद्रकुमार निमजे
आमची शाळा न्यारी शाळा
आमची शाळा ही 90% पारधी जमातीचे विद्यार्थी असलेली आहे. शाळेची स्थापना 1997 ला झाली. शाळेत एक ते चार वर्ग आहेत. सध्या शाळेचा पट 31 आहे. शाळेत येणारे सर्व विद्यार्थी पारधी जमातीतील हनुमाननगर या पारधी वस्तीतून येत असतात. शाळा वस्तीपासून थोड्या अंतरावर आहे. या जमातीतील अस्वच्छता, मागासलेपणा, शिक्षणाविषयी उदासीनता, धार्मिक रूढी, परंपरा आणि अवैध व्यवसाय, यांनी ग्रासलेला हा वंचित समाज ज्याला शिक्षणाविषयी काहीही देणे घेणे नाही अशा समाजातून येणारे हे विद्यार्थी व त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे म्हणजेच शून्यातून विश्व निर्माण करण्याचे अवघड कार्य आणि या कार्यात त्यांच्या शैक्षणिक प्रवाहामध्ये वरदान ठरला तो मूल्यवर्धन हा कार्यक्रम.
मी श्री. नितिश रामाजी नंदुरकर स. अ. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर या शाळेमध्ये दिनांक 18 ऑक्टोबर 2013 ला आंतरजिल्हा बदलीने यवतमाळवरून रुजू झालो. तेव्हा या शाळेबद्दल ऐकले होते, त्याहीपेक्षा भयानक स्थिती जेव्हा रुजू होण्यासाठी गेलो तेव्हा त्या शाळेमध्ये बघितली. हा समाज, विद्यार्थी, शाळा माझ्या सेवाकाळात पहिल्यांदाच असे दृश्य मी बघितले होते. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणे म्हणजे महाकठीण कार्य. त्यावर काहीतरी पर्याय शोधत मार्ग काढणे यासाठी सतत विचार डोक्यात येत होते. स्वच्छतेपासून आपल्या कार्याला सुरुवात केली. शाळा व शालेय परिसराची रंगरंगोटी, स्वच्छता तसेच विद्यार्थ्यांसाठी ‘स्वच्छ विद्यार्थी उपक्रम’सुरू केला. या उपक्रमांतर्गत ते विद्यार्थी दररोज नियमित अंघोळ करून शाळेत येतील, त्या विद्यार्थ्यांना बॅच लावणे हा उपक्रम सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आवड निर्माण झाली. विद्यार्थी दररोज स्वच्छ अंघोळ करून शाळेत येऊ लागले. त्यांना शाळेची आवड निर्माण होऊ लागली.
सन 2016 – 17 मध्ये मूल्यवर्धन हा कार्यक्रम सुरू झाला व त्याचे प्रशिक्षण आम्हांला मिळाले. तसेच मूल्यवर्धन प्रेरक म्हणून कार्य करण्याची संधीसुद्धा मला मिळाली. या उपक्रमांतर्गत सर्व सहयोगी खेळ व मिळालेल्या विद्यार्थी पुस्तिका व शिक्षक उपक्रम पुस्तिकेचा वापर करून छोटेछोटे उपक्रम मी शाळेमध्ये घेऊ लागलो. त्याचा परिणामसुद्धा मला विद्यार्थ्यांच्या वर्तनात जाणवू लागला. पूर्वी विद्यार्थ्यांना ज्या वाईट सवयी होत्या. त्या अस्वच्छता , दररोज अंघोळ न करणे, कुठेही कचरा टाकणे, कुणालाही मारणे, शिव्या देणे, मोठ्या व्यक्तींना काहीही बोलणे, कुणाचाही आदर न करणे, चोरी करणे, भांडण करणे, मारामारी करणे, केव्हाही शाळेत येणे, कधीही शाळेतून निघून जाणे या सवयींमध्ये आज मात्र बदल झालेला आहे. आता बरीचशी मुले अंघोळ करून, स्वच्छ गणवेश घालून शाळेत येतात. वर्ग स्वच्छ ठेवतात. इतरांना मदत करतात. एकमेकांशी सहकार्याने वागतात. मोठ्या व्यक्तींशी आदराने बोलतात. आनंदाने शाळेत वावरतात. हे बदल मला विद्यार्थ्यांमध्ये जाणवत आहेत. आज विद्यार्थ्यांमध्ये जे बदल जाणवत आहेत हे काही एक-दोन दिवसांत घडलेले बदल नसून तीन ते चार वर्षांपासून तेथे मूल्यवर्धनचे कार्य मी आणि माझे सहकारी करीत आहोत, त्यांचे ते फळ आहे. मला हे कार्य करण्यास सदैव आधारस्तंभासारखे उभे असणारे आमचे केंद्रप्रमुख माननीय श्री. विजय बाराहाते सर यांचे मला प्रत्येकक्षणी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत गेले. तसेच ते स्वतः शाळाभेटीत विद्यार्थ्यांकडून उपक्रमांचा आढावा व विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील असायचे. स्वतः उपक्रम घ्यायचे. तसेच आमचे अधिकारीसुद्धा वेळोवेळी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करायचे. त्यामुळेच अशा या कठीण व अवघड परिस्थितीमध्ये कार्य करण्याची प्रेरणा आणि स्फूर्ती मला व माझे सहकारी श्री. पाली सर मुख्याध्यापक आम्हांला मिळत आहे.
-श्री. नितीश रामाजी नंदुरकर
आमची शाळा न्यारी शाळा
-श्री. नितीश रामाजी नंदुरकर