मी आणि माझ्या जबाबदा-या
मूल्यवर्धन तासिका घेत असताना विद्यार्थ्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव होत आहे. मुलांमध्ये घरी व शाळेत स्वत: निर्णय घेण्याची क्षमता विकसित होत आहे.
चौथीमधील विद्यार्थी स्वतःची जबाबदारी ओळखत आहेत. त्यांच्या वागणुकीत अमुलाग्र बदल मला दिसत आहेत. घरी व शाळेत विद्यार्थी योग्य निर्णय घेताना दिसत आहेत. माझ्या वर्गातील वृषभ नावाचा मुलगा म्हणतो, आई व बाबा भांडतात, तर मी त्यांना सांगितले की, तुम्ही भांडू नका, यामुळे माझ अभ्यासात लक्ष लागत नाही.
नंदिनी नावाची मुलगी माझ्या हातून पाणी सांडले तर मी तिला sorry म्हटले. जो काम करतो तोच चुकतो. एवढे गहन विचारही मांडू लागली.
मूल्यवर्धन उपक्रमात वर्गनियम आहेत. एक मुलगा मला म्हणाला, शिक्षकांसाठीही वर्गनियम असावेत. यातून मला असे बरेच अनुभव आले. माझी मुलं त्यांच्या वयाच्या मुलांपेक्षा जास्त समजदार वाटत आहेत. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे भारताचे नागरिक सुस्वभावी, समजदार, सहनशील होत आहेत असे मला मनापासून वाटते आहे.
उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे मूल्यशिक्षण जैविक खतच आहे असे माझे मत आहे. यामुळे माझ्यातसुद्धा फार मोठा बदल होत आहे. मी एक आई म्हणून, एक पत्नी, शिक्षिका म्हणून माझी भूमिका काय यावर विचार करण्यास भाग पडत आहे. या कार्यक्रमामुळे माझ्यातील प्रत्येक नात्याला कलाटणी मिळत आहे. एक प्रेरक म्हणून काम करताना मी स्वतःच कधी घडत गेले, हे ध्यानात आलेच नाही. शेवटी एकच म्हणेन की, साधी पणतीही अंधारात वाट शोधयला मदत करते आणि मूल्यवर्धनातील प्रत्येक उपक्रम माणूस म्हणून जगायला मदत करतो.
-दीपा गोबडे
मी आणि माझ्या जबाबदा-या
-दीपा गोबडे
मूल्यवर्धनमुळे शाळेतील मुलांमध्ये झाला बदल
माझे नाव कु. मिनल अजाबराव चिचामे असून मी जि. प. प्राथ. शाळा उमरी केंद्र – बेला येथे कार्यरत आहे. सुरुवातीला सन २०१८ ला मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रेरक म्हणून निवड झाली, तेव्हा हा कार्यक्रम फक्त प्रशिक्षणापुरताच असेल असे वाटले, पण चार दिवसांच्या प्रशिक्षणानंतर माझ्या विचारात बदल झाला. हा कार्यक्रम स्वतःच्या शाळेत अंमलात आणण्याचा निर्धार केला.
मूल्यवर्धन कार्यक्रम यायच्या आधी विद्यार्थ्यांमध्ये चांगल्याप्रकारे आत्मविश्वास, त्यांचा इतर विषयातील आवड यासाठी प्रयत्न केले नाही, असे नव्हते. त्याला योग्य दिशा मिळत नव्हती. ही दिशा दाखविली ती मूल्यवर्धनमधील विविध उपक्रमांनी.
मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वजाणीव होऊन त्यांना स्वत:चे मत ठामपणे मांडता येऊ लागले. त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वासाला वाव मिळाला. मुले कोणत्या अयोग्य गोष्टी करीत आहेत, हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर स्वयंप्रेरणेतून बदलायला लागली. तसेच नियमांची गरज व महत्त्वही कळाले. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाला शिस्त लागली. जे विद्यार्थी कधीकाळी बोलायला घाबरायचे, हेच विद्यार्थी आता बऱ्याच गोष्टींवर नाटक देखील सादर करतात. याचे श्रेय मूल्यवर्धनलाच जाते.
मूल्यवर्धनमधील उपक्रम इतर विषय शिकविताना उपयोगी पडतात. त्यामुळे सहज, सोपे, उपक्रमशील शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले. त्यांची अध्ययन गती वाढली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शांततेसाठी मुले ही राष्ट्राची सर्वांत मोठी गुंतवणूक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःकडे तसेच जगाकडे सकारात्मकतेने बघण्याची ट्टष्टी मूल्यवर्धनमूळे विद्यार्थ्यांना मिळाली. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन मार्फत राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे खूप खूप आभार !
-कु. मिनल अजाबराव चिचामे
मूल्यवर्धनमुळे शाळेतील मुलांमध्ये झाला बदल
-कु. मिनल अजाबराव चिचामे
सहयोगी खेळ
मूल्यवर्धनाने आणली एक गंमत
रचनावादी अध्यापनात आली रंगत
मुले-मुली करु लागली सर्वांशी संगत
अध्ययनात आली त्यांच्या भारीच जंमत
संयोग लांजेवार हा विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्ये बसायला तयारच नव्हता. तो सलग दोन वर्षे आपल्या बहिणीसोबत दुसरी व तिसरीच्या वर्गात बसला. पण जेव्हा शाळेत मूल्यवर्धन सुरु झाले व वेगवेगळे उपक्रम होऊ लागले, तेव्हा तो मात्र आपल्या बहिणीशिवाय वर्गात बसू लागला व अभ्यासही करु लागला.
पहिल्या वर्गातील कौशिक चोपकर हा विद्यार्थी गुंड वृत्तीचा होता. पण जेव्हा आपण कसे वागले पाहिजे याविषयी खेळ घेतले, तेव्हा त्याच्यात वर्तन बदल झाला. एवढेच नाही तर त्याच्या खोड्या काहीप्रमाणात बंद झाल्या. आज शाळेचे मंत्रीमंडळ बनविले तेव्हा त्याला स्वच्छतामंत्री हे पद दिले व जाणीव जागृतीचे भान त्यांच्यामध्ये आले.
मूल्यवर्धनच्या उपक्रमातून न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचा विकास केला जातो. मी आणि माझ्या क्षमता, माझ्या जबाबदाऱ्या, माझे नातेसंबंध, मी आणि आपले जग, सहयोगी खेळ या विभागातून मूल्यांची शिकवण दिली जात आहे. मानवी प्रतिष्ठेचा आदर, स्वायत्तता, जबाबदारी, चिकीत्सक व सर्जनशील विचारसरणी, विविधतेचा आदर इ. मूल्यांचा विकास उपक्रमातून होत आहे. देशाचा सुजाण नागरिक घडविण्याची क्षमता मूल्यवर्धनमध्ये आहे आणि ते आम्ही निश्चितच करु.
-सुशीला भुरे
सहयोगी खेळ
-सुशीला भुरे
मी आणि मूल्यवर्धन ( एक अनुभव कथन )
शालेय विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच म्हणजे वयोगट ६ ते १४ या गटातच रुजायला हवीत. भविष्यात या विद्यार्थ्यांमधून चांगले लोकशाहीभिमुख व जबाबदार नागरिक घडायला हवेत, या उदात्त हेतूने शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांनी मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु केला.
मी आणि मूल्यवर्धन यात मूल्यवर्धन उपक्रमाची सुरुवात स्वतःपासून होत असते. मूल्य ही शिकवली जाऊ शकत नाहीत, तर ती प्रथम स्वतःपासून रुजवावी लागतात. म्हणजेच आपल्या वर्तनात इष्ट बदल घडवून आणावे लागतात. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित लोकशाही जीवन पध्दती आपण स्वीकारली आहे. आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नेत्रदिपक प्रगतीमुळे मानवी जीवन भौतिकदृष्टया समृध्द झाले आहे. त्याचबरोबर तितकेच ते असुरक्षितही झाले आहे. समाजात बाल गुन्हेगारी, बेरोजगारी, असुरक्षिततेची भावना तरूण वर्गात दिसून येते. मला आलेला शाळेतील एक अनुभव कथन करतो.
मी इयत्ता पाचवीला शिकवीत होतो. मधली सुट्टी झाली. सर्व मुले भराभर बाहेर निघाली. थोड्या वेळाने एक विद्यार्थी माझ्याकडे आला. त्याच्याबरोबर दोन -तीन मुले होती. मला वाटले काहीतरी गडबड झाली. मी विचारले, काय झाले तर त्याने सांगितले, सर मला १०० रू. ची नोट रोडवर मिळाली आहे. ती मी तुम्हांला देण्यासाठी आलो आहे. ती नोट जर कुणाची असेल तर त्यांना ती देऊन टाका.
त्याचे मी कौतुक केले व शाबासकी दिली. दुसऱ्याच दिवशी परिपाठाच्या वेळी त्या विद्यार्थ्याला बोलावून पेन बक्षीस दिला. शाळेत पालक सभा आयोजित करून त्या विद्यार्थ्याचा पालकांच्या समक्ष सत्कार केला. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी कुणाची कुठलीही वस्तू सापडली की, सरांकडे आणून देतात. मला व माझ्या सर्व शिक्षकांना याचा फार आनंद वाटतो. विद्यार्थ्यांत मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे ईष्ट बदल होत असल्याचे दिसून येत आहे.
उद्याचा भारत आजच्या शाळेमधून घडतो आहे. एक सुसंस्कृत् व्यक्ती म्हणून आणि समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून बालवयात मुलांच्या मनावर सुसंस्कार होणे आवश्यक आहे. या वयात झालेले संस्कार कायम टिकणारे असतात. म्हणून मी आणि मूल्यवर्धन यांचा संबंध एकाच नाण्याच्या दोन बाजू असा दिसून येतो.
-श्री रामकृष्ण मा. बडवाईक
मी आणि मूल्यवर्धन ( एक अनुभव कथन )
-श्री रामकृष्ण मा. बडवाईक
मूल्यवर्धनमुळे शाळेतील मूलांमध्ये होत असलेला बदल
महाराष्ट्र राज्य व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन तर्फे सुरू करण्यात आलेला मूल्यवर्धन प्रकल्पाचे आम्ही सर्व प्राथमिक शिक्षक स्वागत करतो. सुरूवातीला जिल्हयामध्ये फक्त एक- दोन तालुक्यांमध्येच हा प्रकल्प राबविला गेला. मात्र आता मूल्यवर्धन हा प्रकल्प इतर तालुक्यांमध्येसुध्दा उत्सफूर्तपणे राबविला जात आहे. त्याला प्रतिसादसुध्दा चांगला मिळत आहे. याचा सर्व शिक्षकांना फार आनंद होत आहे.
आनंद याकरिता होतो की, आजची मुले ही आत्महत्येला, हिंसेला बळी पडलेली दिसतात. याचाच अर्थ असा की, विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रूजलेले दिसत नाहीत. अशावेळी मूल्यवर्धन प्रकल्प जे शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्यासंबंधीत कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे अत्यंत गरजेचे व आवश्यक आहे.
आमच्या जि. प. उच्च प्राथ. शाळा भिलेवाडा, केंद्र- कारधा, पं. स. भंडारा येथे मूल्यवर्धन प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल झालेला दिसून येतो. मुले वर्गामध्ये शांतता संकेत, वर्गनियम पाळायला लागलेत. वर्गात शिक्षक नसताना विद्यार्थी कृती करताना दिसायला लागले. वर्ग सुरळीत सुरू असतात. विद्यार्थ्यांमध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधता ही राज्य घटनेतील मूल्ये रुजायला लागली.
विशेष म्हणजे शालेय परिसरात व वर्गांमध्ये गोंधळ आता बंद झालेत. विद्यार्थ्यांना समान संधी हा अर्थ कळायला लागला. वर्गातील एक मूल बोलत असतांना इतर मुले लक्ष देऊन ऐकतात. इतरांचा आदर करावा, ही वृत्ती त्यांच्यात निर्माण झाली. शिक्षकांनी घेतलेल्या नियोजित उपक्रमातून आनंददायी पध्दतीने रूजवली गेलेली मूल्ये त्यांच्या वर्तनातून दिसायला लागली.
विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम समजले व ते त्यांचे पालन करताना दिसतात. विद्यार्थी जोडीचर्चा, गटचर्चा, सामूदायिक वर्तुळ इत्यादीच्या माध्यमातून विविध उपक्रम करायला लागले. सहकार्याची भावना, इतरांचा आदर, आत्मविश्वास, स्वावलंबन, स्वयंअध्ययन, एकता, बंधूता, प्रामाणिकपणा, आरोग्याविषयी चांगल्या सवयी, शाळेच्या नियमांचे महत्त्व या सर्व बाबी विद्यार्थ्यांमध्ये रुजायला लागल्या. एकंदरीत महाराष्ट्र राज्य सरकार व मुथ्था फाउंडेशन तसेच तालुका समन्वयक ज्यांनी शाळेला वेळोवेळी भेटी देऊन योग्य मार्गदर्शन केले तसेच पंचायत समिती अंतर्गत येणारे मा. गटशिक्षणाधिकारी साहेब तसेच मा. वरिष्ठ व कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी यांचे आम्ही सर्व प्राथमिक शिक्षक आभार मानतो. हा प्रकल्प निरंतर चालू ठेवावा हीच सदिच्छा व्यक्त करतो.
-श्री अनमोल केवळराम रंगारी
मूल्यवर्धनमुळे शाळेतील मूलांमध्ये होत असलेला बदल
-श्री अनमोल केवळराम रंगारी
.