संवेदनशीलता
शिक्षण हक्क कायदा 2009 मध्ये सांगितले आहे की, अभ्यासक्रम राज्यघटनेतील मूल्यांशी सुसंगत असावा, बालकेंद्री, बालस्नेही व कृतियुक्त अध्यापन पद्धतींचा वापर अध्यापनात असावा. मुक्त अभिव्यक्तीस पोषक शालेय वातावरण असावे. मीही गेल्या अनेक वर्षांपासून वरील तत्त्वांना अनुसरून अध्यापनाचे काम करत आहे. माझे नाव राजेंद्र रामनाथ कोकाटे (जि. प. शाळा डुबेरेवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक)
शैक्षणिक वर्ष 2018-19 या वर्षापासून सिन्नर तालुक्यात मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाला. मी तालुकाच्या ठिकाणी प्रशिक्षण घेतले व केंद्र स्तरावर प्रेरक म्हणून काम केले.
मूल्यवर्धन कार्यक्रमातून शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व SCERT ने सुरु केलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाची चांगल्याप्रकारे माहिती मिळू शकली. मूल्यवर्धन उपक्रम घेत असताना घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समता या मूल्यांचा विचार करून वर्गांवर विविध उपक्रम मी 2018-19 या वर्षात राबविले. त्यामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे मला दिसून आले. एके दिवशी वर्गात काम करत असताना पताकांचा दोरा कापण्यासाठी मी माझ्या बॅगेमध्ये ब्लेड शोधू लागलो. बॅगेमध्ये ब्लेड उभे आणि उघडे असल्यामुळे मी हात घालताच माझे बोट कापले. रक्त वाहू लागले. रक्त निघाल्यानंतर वर्गातील बरीच मुले हळहळल्याचे माझ्या लक्षात आले. नंतर मी रक्त पुसून कामाला लागलो. मधल्या छोट्या सुट्टीनंतर 7 ते 8 मुली माझ्याकडे आल्या. त्यांनी दुकानातून बँडेजपट्टी आणली होती. ती माझ्या बोटाला लावण्याची विनंती केली. मला समजेना की या मुली मला न सांगता दुकानात का गेल्या? या बँडेजपट्टीची गरज नाही. जखम किरकोळ आहे असे सांगितले. परंतु त्यांनी खूपच आग्रह केला. त्यांच्या समाधानसाठी मी बँडेजपट्टी लावली. पैसे कोणी दिले हे त्यांना विचारले. त्यांनी सांगितले नाही. माझ्या लक्षात आले की, आपण जसे शिक्षक म्हणून मुलांची काळजी घेत असतो तशीच मुलेसुद्धा शिक्षकांची काळजी घेत असतात. ही सर्व मुले आज ५ वीमध्ये दुसऱ्या शाळेत शिकण्यासाठी गेली आहेत. परंतु हा प्रसंग मी कधीही माझ्या आयुष्यात विसरू शकणार नाही. हे मूल्यवर्धन कार्यक्रमाचे फलित असल्याचे उदाहरण आहे.
-जयश्री गायकर
संवेदनशीलता
-राजेंद्र कोकाटे
मूल्यवर्धन एक संजीवनी
मूल्यवर्धन आजच्या काळाची गरज आहे. ढासळत जाणारी नीतिमूल्ये, जीवघेणी जगण्याची लढाई यातच माणसाचे माणूसपण हरवून बसले आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी माणूस कोणतीही टोकाची भूमिका घ्यायला घाबरत नाही. संस्कारांचे मूल्य चिरकाल टिकण्यासाठी मूल्यवर्धन हा उपक्रम नक्कीच पथदर्शी ठरेल.
संदीप कडू हिरे मो.नं 9421287480 मूल्यवर्धन एक संजिवनी…. शिक्षण घेऊन माणूस साक्षर होतो. स्वत:च्या पायावर उभा राहून स्वत:च्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी लायक बनतो. लठ्ठ पगाराची नोकरी करताना त्याचे आयुष्य यांत्रिक होवून जाते, हे त्यालाही कळत नाही. एकदा का त्याची संवेदनशीलता हरवली की मग त्याचे विश्व त्याच्या कुटुंबापुरतेच सिमित होऊन जाते. आज शिक्षणाच्या बाजारात मानवी मूल्ये हरवली आहेत. जे शिक्षण मूल्यांवर आधारित असते, त्यात जगणे शिकवावे लागत नाही. पूर्वीपासून अनौपचारिकरित्या मूल्यशिक्षणाचे बाळकडू शाळेत, समाजात, घरात नकळत मिळायचे. माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून नम्रता, प्रेम, आपुलकी, त्याग, सहकार्यवृत्ती दिसून यायची. कुठेही जाणीवपूर्वक मूल्यशिक्षण दिले-घेतले जात नसायचे. आचरणातून ते शिकले जायचे. खरे तर मूल्यशिक्षण ही संकल्पनाच मला मान्य नाही. मूल्ये शिकवायची नसून रूजवायची असतात. अलीकडच्या काळात तंत्रज्ञानामुळे जशी प्रगती झाली तसा मूल्यांचा –हास होताना दिसतो. आज जगात जे काही घडते आहे ते ऐकून आणि बघून आपल्या डोळ्यांवरचा, कानांवरचा विश्वास उडत चालला आहे. अर्थात हे जे काही वास्तव आहे ते आपल्याला नाकारून चालणार नाही. माणसातले माणूसपण जागवणारे शिक्षण ही आजच्या काळाची गरज आहे. महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असलेला कार्यक्रम नक्कीच प्रेरणादायी आहे. बालमनावर केलेले संस्कार चिरकाल स्मरणात राहतात. म्हणूनच मूल्यवर्धन कार्यक्रम जीवन संजिवनी आहे असे मला वाटते. आभाळच फाटलंय, कुठेकुठे शिवायचे? हे म्हणणे योग्य नाही. कारण वणवा विझवणारी चिमणी आणि सेतू बांधताना मदत करणाऱ्या खारीची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मूल्यवर्धनच्या रूपाने नकळत आपल्याकडून समाजसेवाच घडत आहे. मनोरंजनातून आणि खेळांतून मूल्यवर्धन ही संकल्पनाच सुंदर आहे. मूल्यवर्धनची संकल्पना समता, बंधूता, स्वातंत्र्य, न्याय या राज्यघटनेतील मूल्यांवर आधारित आहे. प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे घटनात्मक मूल्यांची सुसंगत असल्याने मूल्यवर्धन कार्यक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आज वाढती बालगुन्हेगारी रोखण्यासाठी मूल्यवर्धन नक्कीच चांगली भूमिका बजावेल. आजची शिक्षण प्रणाली बालकेंद्रित, बालसुलभ, बालस्नेही व कृतियुक्त असल्याने हसतखेळत शिक्षणातून मूल्ये रूजविणे आणि संवर्धन होत आहे. हात उगारून वर्ग शांत करण्यापेक्षा हात उंच करून शांतता संकेताने वर्ग शांत करता येतो ही बाब खूप महत्त्वाची आहे. मूल्य रूजले की, त्याची प्रचिती आपोआप दिसू लागते. समता आणि समानता याचे उदाहरण खूप काही सांगून जाते. मानवी जीवनात नियमांना खूप महत्त्व आहे. नियम हे आपल्यासाठीच असतात. ते पाळले की आपलाच फायदा होतो याची जाणीव मूल्यवर्धन करून देते. वर्गउपक्रम राबवताना विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. निर्णायक क्षमता आणि आत्मविश्वास वाढीस लागतो. नव्या भारताचे स्वप्न म्हणजे मूल्यवर्धन. उद्याचा भारत आज मूल्यांच्या रूपात घडतो आहे. पूर्वीचे सुवर्णयुग आता दूर नाही. फक्त प्रत्येकाने बदलण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या देशात डोक्यावर ग्रंथ घेऊन नाचण्यापेक्षा त्यांच्या विचारांचे मूल्य डोक्यात घ्यावे. भारत जगात आर्दशस्थान निर्माण करेल. शिक्षणाला मूल्यांची जोड मिळाली तर ते शिक्षण मौल्यवान असते हे कधीच विसरून चालणार नाही. मूल्यवर्धनच्या रूपाने महाराष्ट्राला नवसंजीवनी मिळाली असेच म्हणावे लागेल.
-भाऊसाहेब शेळके
मूल्यवर्धन एक संजीवनी
-भाऊसाहेब शेळके
मूल्यवर्धनने घडतो माणसातला माणूस
कोणत्याही स्पर्धेमध्ये सहभागी न होणारी लाजरी-बुजरी मुले बोलायला, गायला, चित्रे रेखाटायला लागली. विज्ञान प्रदर्शन, क्रीडास्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली. जयंती, पुण्यतिथी निमित्त विचार मांडायला लागली, उपस्थिती वाढली .हा बदल माझ्या शिदवाडी शाळेत झाला आहे तो फक्त मूल्यवर्धन उपक्रमामुळेच.
जून २०१६-१७ पासून शिदवाडी, केंद्र- घोटी-२, ता. इगतपुरी, जि.नाशिक येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र विद्या प्राधिकरण व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जत आहे. हसतखेळत कृतीतून चांगले संस्कार करण्याचे काम नकळत झाले. वाडीच्या शाळेत उपक्रम राबविताना अध्ययन-अध्यापनातील क्रियाप्रतिक्रिया सुलभ झाल्या. आदिवासी वस्ती असल्याने विद्यार्थी गलोलने पक्षी मारत किंवा दगड भिरकावून मारत असत, परंतु जेव्हापासून संवेदनशीलता हे मूल्य बिंबवले गेले तेव्हापासून मुलांनी शाळेत वर्गशिक्षकाकडे गलोल आणून जमा केल्या. वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनासाठी एक मूल-एक झाड, एक कुटुंब –एक झाड असे पालकांनी पालकत्व स्वीकारून, त्यांचे संगोपन करून ६१ वृक्षांचा प्रथम वाढदिवस साजरा केला. हा आगळावेगळा उपक्रम जिल्ह्यात राबविला. सुट्टीच्या कालावधीत झाडांना पाणी घालण्यासाठी पालकांचे सहकार्य मिळाले. राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित दहीहंडी, गणेशोत्सव, एक राखी सैनिकांसाठी असे उपक्रम घेऊन सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोणत्याही स्पर्धेत सहभागी न होणारी लाजरी-बुजरी मुले बोलायला लागली. गायला लागली, चित्र रेखाटायला लागली व ती ‘सकाळ बालमित्र’ पुरवणीत चित्र प्रकाशित झालेली पाहून आनंदली. मुले विज्ञान प्रदर्शन, क्रीडास्पर्धांमध्ये, सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली. जयंती, पुण्यतिथीनिमित्त विचार मांडायला लागली. सहयोगी खेळांतून मुलांना शाळेची गोडी लागली. त्याचबरोबर मूल्यवर्धन कार्यक्रमासोबतच ‘दप्तरमुक्त शाळा’ उपक्रम घेतल्याने २०१२-१३ साली ३३ पटसंख्या असणाऱ्या शाळेत सन २०१७-१८ मध्ये ५७ पटसंख्या झाली.
-विद्या पाटील
मूल्यवर्धनने घडतो माणसातला माणूस
-विद्या पाटील
मूल्यवर्धन कार्यक्रम : शिक्षणासाठी वरदान
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणा-या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल प्रकर्षाने दिसून येत आहेत. या बदलांमुळे समाजाचा जिल्हा परिषदेच्या शाळांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. शिक्षणातून सुसंस्कृत पिढी व सुजाण नागरिक निर्माण करणे हेच तर आपले ध्येय आहे.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र सरकार या दोहोंनी मूल्यवर्धन उपक्रम सुरु केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थी मुक्तपणे व्यक्त होत आहेत. शांतता संकेताचे पालन करतात. लहान, थोरांचा आदर करतात. पालकही आपल्या मुलांमध्ये होत असलेल्या बदलांची नोंद घेत आहेत. अभ्यासक्रमातून रुजवायची मूल्ये सहज, सुलभपणे रुजविणे शक्य होत आहे. त्यामुळेच मुलांची शिकण्यातील गोडी वाढत आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या राज्यघटनेतील मूल्यांचा आधार घेऊन मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत वैविध्यपूर्ण उपक्रमांची रचना केलेली असल्यामुळे मुलांना शिकण्याचा कंटाळा जाणवत नाही. विद्यार्थी नेहमी ‘मूल्यवर्धन उपक्रम घ्या ना सर …’ असा आग्रह करतात. त्यांच्या आग्रहातच या कार्यक्रमाचे फलित आहे असे मी मानतो. मुलांच्या या आग्रहामुळेच आम्हा शिक्षकांनाही नवचेतना मिळते.”
-श्री. श्रीकांत सुधाकर पगारे (जि. प. प्राथमिक शाळा, वडबारे, केंद्र- राहुड, ता. चांदवड, जि. नाशिक)
मूल्यवर्धन कार्यक्रम : शिक्षणासाठी वरदान
-श्री. श्रीकांत सुधाकर पगारे (जि. प. प्राथमिक शाळा, वडबारे, केंद्र- राहुड, ता. चांदवड, जि. नाशिक)
मूल्यवर्धन प्रशिक्षण
मूल्यवर्धन प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये वेगवेगळ्या उपक्रमांतून कशाप्रकारे रुजवायची याबद्दल माहिती दिली जाते.
प्रशिक्षणातून मूल्यसंवर्धनाविषयी विस्तृतपणे माहिती मिळाली. उपक्रमांचे विविध व्हिडिओ दाखवले तसेच उपक्रम सादरीकरण करून त्यातून कोणकोणती मूल्ये रुजवू शकतो हे समजले.
-जयवंत भूतकर
मूल्यवर्धन प्रशिक्षण
-जयवंत भूतकर
मूल्यवर्धन समाज परिवर्तनाचे एक साधन
आजचा विद्यार्थी हा परिपूर्ण होणे आवश्यक आहे. कारण विद्यार्थी हा देशाचा सक्षम व सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी त्याला काही मुलभूत क्षमतांबरोबरच जीवन जगण्याची कला विकसित होण्यासाठी अध्यापन प्रक्रियेच्या माध्यमातून त्यामध्ये योग्य ती मूल्ये रुजविण्यात यायला हवीत. त्यासाठीच पुढीलप्रमाणे उपक्रमांची अंमलबजावणी झाल्यास निश्चितच योग्य दिशा मिळेल.
मूल्यवर्धन या शीर्षकातच मतितार्थ समाविष्ट आहे. आजच्या बदलत्या शिक्षणपद्धतीत प्रत्यक्षरित्या प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थी आणि शिक्षक (मी) यांच्यातील सजीव आंतरक्रिया घडून येण्यासाठी सर्वच घटकातील विद्यार्थ्यांस स्वयंभू व सक्षम बनविण्यासाठी त्याला बौद्धिक, मानसिक, शारीरिकदृष्ट्या आकार व आधार देणे क्रमप्राप्त आहे. सर्वच स्तरांतील विद्यार्थ्यांना राज्यघटनेतील मूल्ये समर्थपणे संक्रमित करता येणे अनिवार्य आहे. त्यासाठी अनेकविध उपक्रमांच्या, सहयोगी खेळांच्या माध्यमातून चिकित्सक व सर्जनशील पद्धतीने विद्यार्थ्यांमधील स्वतः बद्दलची व जबाबदारीची जाणीव, स्वव्यवस्थापन, सहकार्य भावना, इतरांबाबत आस्था व विविधतेचा आदर इत्यादी कौशल्ये स्वतःच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी रुजविणे आवश्यक आहे. ही मूल्ये निश्चितच देशाचा भावी, सक्षम, सुसंस्कृत नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये रुजणे ही काळाची गरज झाली आहे. आजचा विद्यार्थी केवळ बौद्धिकदृष्ट्या विद्वान असून उपयोग नाही तर ‘जीवन कसे जगावे?’ ही संकल्पना समजणारा असणे आवश्यक आहे. खऱ्या अर्थाने वैचारिकदृष्ट्या मूल्यांची रुजवणूक ही विद्यार्थ्यांमध्ये हसतखेळत, आनंददायी वातावरणात अनपेक्षितपणे बिंबवण्याचा प्रयत्न उपक्रमांच्या माध्यमातून केल्यास आपसूकच त्यांच्यातील सुप्तगुण दिसून येण्यास मदत होते. पर्यायाने शिक्षक-विद्यार्थी यांमधील दरी कमी होऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होते. त्याबरोबरच काही विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड भावना दूर होऊन ते प्रवाहात येतात. साहजिकच विद्यार्थ्यांमध्ये न्यायाची भावना वाढीस लागून आपलेपणाच्या भावनेने जबाबदारीची जाणीव होते. स्वतंत्रपणे विचार करण्याची वृत्ती बळावते. सर्जनशीलतेला वाव मिळतो. बंधुभाव निर्माण होतो. सदरील कार्यक्रमामुळे दैनंदिन उपस्थिती वाढून सहयोगी खेळांत मुले आनंदाने सहभागी होतात. आनंददायी अध्ययनाची गोडी वाढून विद्यार्थी सहभाग वाढतो. स्वतःच्या क्षमतांबाबत आत्मविश्वास दुणावतो. थोडक्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी प्रवाहाबरोबर आत्मविश्वासाने चालतोच. शिवाय देशाचा जागरूक व सक्षम नागरिक बनण्यास पात्र होतो. म्हणूनच सदरील कार्यक्रम खरोखरीच दिशादर्शक व प्रेरणादायी असाच आहे यात शंकाच नाही.
-पंकज दावल पवार (नाशिक मनपा शाळा क्र.०९, फुलेनगर, पंचवटी, नाशिक)
मूल्यवर्धन समाज परिवर्तनाचे एक साधन
-पंकज दावल पवार (नाशिक मनपा शाळा क्र.०९, फुलेनगर, पंचवटी, नाशिक)
मी आणि मूल्यवर्धन
मूल्ये हा फार मोठा दागिना आहे. ज्याच्याकडे हा दागिना आहे तो आज खूप श्रीमंत आहे. आदरणीय मुथ्था सरांनी हा जो संस्कार दिला आहे, त्याचे मोल नाही. समाजामध्ये या कार्यक्रमाची नोंद व्हावी.
मी प्रविण ओंकार साबळे (जि. प. शाळा. रानमळा (चितेगाव) ता. निफाड, जि. नाशिक)
या प्रशिक्षणासाठी जेव्हा निवड झाली तेव्हा असे वाटले की, कशासाठी पुन्हा प्रशिक्षण? आम्हांला फक्त मुलांना शिकवू द्यावे असे वाटायचे. जेव्हा प्रशिक्षण घेण्यासाठी गेलो, तेव्हा मूल्यवर्धनचा गाभा तो मुळातच विद्यार्थीभिमुख व समाजाच्या गरजेचा आहे याची जाणीव झाली. उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार करणारे आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल झालेले आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थी आनंदाने सहभागी होऊ लागले. आई-वडीलांबद्दल वाढत चाललेला आदर, आपलेपणा, मित्रांबद्दल वाटणारी सुरक्षितता, शिक्षकांप्रती वाढणारी आपलेपणाची भावना, इतरांच्या मताचा आदर, कुटुंबाबद्दल, शाळेबद्दल समाजाबद्दल, देशाबद्दल अभिमान या गोष्टी जाणवल्या. महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना आपली जबाबदारी काय हे कळते. असे अनेक घटक आहेत. यापुढे मूल्यवर्धन ही एक लोक चळवळ बनावी असे वाटते.
-प्रविण ओंकार साबळे
मी आणि मूल्यवर्धन
-प्रविण ओंकार साबळे