मूल्यवर्धन एक नावीन्यपूर्ण उपक्रम
आमच्या जिल्हा परिषद शाळा झिरवे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथे जानेवारी 2016 पासून मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. हा कार्यक्रम राबवित असताना आम्हांला विद्यार्थ्यांमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून यायला लागले. विद्यार्थ्यांनाही मूल्यवर्धन उपक्रमांविषयी एक प्रकारची आवड निर्माण झाली. गाण्यांतून,गोष्टींतून, प्रसंगातून, नाट्यीकरणातून अशा विविध प्रकारे मूल्यवर्धन उपक्रमाची अंमलबजावणी शाळेत करून विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारची बदल जाणवू लागले.
जानेवारी 2016 पासून आमच्या जिल्हा परिषद शाळा झिरवे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे या ठिकाणी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. सुरुवातीला हा उपक्रम आमच्या निमगुळ केंद्रातील झिरवे शाळेत प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला. ज्या वेळेस उपक्रमाची सुरुवात झाली, त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये जे सकारात्मक प्रकारचे बदल झालेत, ते आमच्यासाठी एक नवी पर्वणीच होती. कारण दैनंदिन अध्यापन करताना अशा प्रकारचे बदल होण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले, परंतु तसे परिणाम दिसत नव्हते. जेव्हा मूल्यवर्धन उपक्रम वर्गस्तरावर राबविला, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल जाणवू लागले. असे लक्षात आले, की हा अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये बदल म्हटले तर आपापसात एकमेकांना सहकार्य करणे, एकमेकांना मदत करणे, वर्गात विद्यार्थ्यांशी आपुलकीने, प्रेमाने, सहकार्याने वागणे या गोष्टी या उपक्रमांच्या माध्यमातून आम्हांला सहज जाणवत होत्या. मी ज्यावेळेस वर्गात उपक्रम घेऊ लागलो, त्यावेळेस माझ्या वर्गातले बरेच विद्यार्थी हे अबोल असायचे. माझी शिकविण्याची पद्धतीसुद्धा ही एकतर्फी होती. परंतु जेव्हा हे उपक्रम घ्यायला सुरुवात केली, तेव्हा मी प्रत्यक्षात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचू शकलो. हीच या उपक्रमाची सर्वात मोठी जादू आहे. या उपक्रमामुळे मला प्रत्येक विद्यार्थ्याजवळ जाता आलं. प्रत्येकाला जाणून घेता आलं. प्रत्येक विद्यार्थ्याविषयी माझं एक वेगळं नातं निर्माण झालं. त्यामुळे आमच्यातली आपुलकी अजून जास्त वाढली. प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासपूर्ण बोलू लागला. बोलताना तो अडखळू लागला, परंतु त्याला जे म्हणायचं आहे त्या गोष्टीचा त्याला खूप आनंद वाटला. मूल्यवर्धन उपक्रमाअंतर्गत येणारे विविध प्रकारचे खेळ आहेत. या खेळांमध्ये विद्यार्थी तल्लीन होऊ लागले. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विद्यार्थी आपापसात चर्चा करू लागले, एकमेकांशी सकारात्मक गप्पा करू लागले, चांगलं काय आणि वाईट काय हे ओळखू लागले.
मूल्यवर्धन उपक्रमांना जोडूनच आम्ही आमच्या शाळेत सन 2016 पासून शाळेत दाखल होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक झाड लावायचं आणि त्या झाडाचे संवर्धन त्या मुलाने करायचं, अशी योजना सुरु केली. आम्ही या उपक्रमातून विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. आज आमच्या शाळेत मागील चार वर्षांपासून विद्यार्थ्यांनी लावलेली सर्वच्या सर्व झाडं अतिशय डौलदारपणे वाढलेली आहेत. दरवर्षी हा उपक्रम आम्ही नित्यनेमाने चालू ठेवलेला आहे. त्यानुसार वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना ते झाड देणे, विद्यार्थ्याने त्या झाडाची अतिशय काळजी घेणे, या गोष्टी शक्य झाल्या त्या फक्त मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे. विद्यार्थ्यांनाही त्यांचे झाड मोठं झालं या गोष्टीचा खूप मोठा आनंद आहे.
प्रत्येक विद्यार्थी संध्याकाळी घरी जाताना त्याच्याकडे असणाऱ्या पाण्याच्या बॉटलमधून दररोज त्याला दिलेल्या झाडाला पाणी घातल्याशिवाय जात नाही. आज शाळेत झालेले वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन हे केवळ मूल्यवर्धन कार्यक्रमाचे देणं आहे. जे विद्यार्थी छोट्याछोट्या गोष्टीसाठी भांडत होते, हेच विद्यार्थी आज हसतखेळत आपापसातल्या गोष्टी सहजतेने एकमेकांना सांगत आहेत. तसेच विद्यार्थी ग्रामीण भागातले आणि परिस्थिती खूप बिकट असल्यामुळे पालकांचे तेवढे लक्ष राहत नाही. परंतु स्वच्छतेच्या बाबतीत विद्यार्थी हे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला लागले. हीच गोष्ट पूर्वी अशी होती की, विद्यार्थी स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत. अशा पद्धतीने त्यांचे राहणीमान होते, परंतु मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे ते पूर्णपणे बदलले. एकंदरीतच मी माझ्या अनुभवातून एकच गोष्ट सांगू इच्छितो, की मूल्यवर्धन उपक्रम हा सर्व स्तरातून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे.
-जगन वाडीले
मूल्यवर्धन एक नावीन्यपूर्ण उपक्रम
-जगन वाडीले
मूल्यवर्धन देई मदतीचे शिक्षण
मूल्यवर्धन हा मुलांमध्ये संस्काराचे संवर्धन करणारा कार्यक्रम ठरत आहे.मुलांमध्ये असणाऱ्या विविध गुणांची ओळख त्यातून होत आहे. रिकाम्या वेळेत करावयाचे उपक्रमही तितकेच आकर्षक व मुलांना एकाग्र करणारे आहेत. खरच आज मूल्यवर्धन ही समाजासाठी सुसंस्कारित संजीवनी ठरत आहे.
मी वर्गात मूल्यवर्धन उपक्रम घ्यायला सुरुवात केल्यामुळे मुलांमध्ये बदल जाणवायला लागलेत. मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका वर्गात आणताच मुले आनंदित होतात. काहीतरी नवीन शिकायला, खेळायला, करायला मिळणार या भावनेने उत्साहित होतात. माझ्या वर्गातील विशाल नावाचा मुलगा कधी कुणाला मदत न करणारा, पण एके दिवशी तो माझ्याजवळ आला व म्हणाला, “टीचर, आज मी खिचडी आणणाऱ्या मावशींना मदत केली. त्यांना खिचडीचे भांडे दुसऱ्या मजल्यावर आणण्यासाठी उचलू लागलो. तुम्ही म्हणाला होता ना मदत करायची!” ती छोटी मदत होती, पण त्याच्यामध्ये झालेला तो बदल फारच अनाकलनीय होता. असेच अनेक अनुभव मूल्यवर्धनमुळे आले.
-सोनाली गाडीलोहर
मूल्यवर्धन देई मदतीचे शिक्षण
-सोनाली गाडीलोहर
मूल्यवान बालके, बलवान राष्ट्र
शाळेत राबवलेल्या मूल्यर्धन कार्यक्रमातील विविध उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या वर्तनातील सकारात्मक बदलाचे मोजक्या शब्दात चित्र मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. बालकांतील मूल्यांची वृद्धधी करणे हे मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे अगदी सहज आणि सोपं झालं. या प्रवासातील काही अनुभव मी मोजक्या शब्दांत मांडण्याचा प्रयत्न करतोय.
आजच्या गतिमान युगात शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजूवणूक करणे ही काळाची गरज आहे.जर बलशाली भारत देश घडवायचा असेल, तर देशातील नागरिक जबाबदार आणि सुसंस्कृत घडले पाहिजेत. जिल्हा परिषद शाळा मांडळ, ता. शिरपूर येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. गाव तालुक्याच्या ठिकाणापासून अगदी जवळ असले तरी शाळेत बहुसंख्य विद्यार्थी आदिवासी जमातीतील आहेत. गावाच्या परिसरात अनेक छोटेमोठे व्यवसाय आहेत. बांधकामे मोठ्या प्रमाणावर चालतात. आणि त्यासाठी जवळच्या राज्यातून, सातपुडा पर्वत रांगेतील आदिवासी लोक रोजगाराच्या निमित्ताने या परिसरात झोपड्या टाकून राहतात. अशा घरातील मुलं आमच्या शाळेत दाखल होतात. पालकांचे अज्ञान आणि व्यसन, घरातील वातावरण यामुळे या विद्यार्थ्यांनाही काही चुकीच्या सवयी लागलेल्या असतात. मूल्यवर्धन प्रशिक्षणानंतर अशा विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्ये कशी रुजवता येतील याचे नियोजन आम्ही शाळा स्तरावर केले. विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना आधी ‘स्व’ची जाणीव करून दिली. मी आणि कुटुंब या उपक्रमातून विद्यार्थ्याला स्वतःची ओळख झाली. आरोग्यविषयक चांगल्या सवयी त्यांचे फायदे माहीत झाल्यावर प्रत्येक विद्यार्थी स्वतःच जागरूक झाला. विद्यार्थ्यांच्या अंगी आज स्वयंशिस्त दिसते. त्यांच्या वर्तनाचे नियम ते स्वतः बनवून कसे वागावे याची जाणीव झाल्याचे दिसून येते.
मी आणि माझे कुटुंब या घटकासाठी खूप सुंदर कार्यक्रम आम्ही शाळेत राबवले. मी आणि माझे कुटुंब हे चित्र रेखाटताना त्याला त्याच्या कुटुंबविषयीची आपुलकी वाटू लागली. कुणाचंही कामे न ऐकणारी मुले आता कुटुंबातील मोठ्यांचा आदर करतात, घरातील कामे करतात. काही पालक आम्हांला येऊन भेटतात आणि याविषयी सांगतात, समाधान व्यक्त करतात. आम्हांलाही खूप समाधान वाटते की, मूल्यवर्धनच्या उपयुक्त अशा उपक्रमामुळे आमच्या शाळेतून जबाबदार आणि मूल्यवान विद्यार्थी घडत आहेत.
-नंदलाल धनगर
मूल्यवान बालके, बलवान राष्ट्र
-नंदलाल धनगर
मूल्यवर्धन पुस्तिका आणि मी व माझे विद्यार्थी
मूल्यवर्धन पुस्तिकेतील उपक्रम घेताना मला आलेला अनुभव
मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी अतिशय सुरेख पुस्तिका तयार केली आहे. त्यामुळे मला मूल्यवर्धन कार्यक्रमाची ओळख झाली. त्यातील विविध उपक्रमांचा मला अध्यापन करताना खूपच फायदा झाला. वर्गस्तरावर कोणकोणते उपक्रम कसे, केव्हा घ्यावयाचे, याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे मी उपक्रम घेतले. त्यामुळे मला माझ्या वर्गातील मुलांमध्ये अपेक्षित बदल जाणवला. उपक्रमाचे घटक, उपक्रमाचे मुख्य प्रकार समजून घेतल्यामुळे मला विविध उपक्रम प्रभावीपणे घेता आले. उपक्रम पुस्तिकेत पाच विभाग केले असून, मी आणि माझ्या क्षमता यातून मुले स्वतःविषयी बोलू लागली. तसेच इतरांची ओळख, आपली शाळा, आपले शेजारी यांच्याविषयी बोलू लागली. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेऊ शकत होती. माझ्या जबाबदाऱ्या यातून मुले आपली जबाबदारी समजू लागले व चिकित्सक वृत्तीने विचारपूर्वक निर्णय घेताना दिसू लागले. योग्य-अयोग्य वर्तन समजू लागले. माझे नातेसंबंध यातून मुलांमध्ये बंधुता, समानता, न्याय ह्या मूल्यांमधून सहसंवेदना, सुसंवाद, लक्षपूर्वक ऐकणे, अयोग्य गोष्टींना विरोध, वाद सोडविणे, दुसऱ्यांना सहकार्य करणे, गरज असेल तेथे मदत करणे ह्या गोष्टींचा विकास झालेला दिसून आला. मी आणि आपले जग यातून बंधुता या मूल्याचा समावेश केल्यामुळे यातील उपक्रमांतून पर्यावरण रक्षणाची जाणीव झालेली दिसून आली. तसेच सामाजिक हिताचा विचार करणे, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेताना मुले दिसू लागली. सहयोगी खेळातून खेळाचे नियम पाळणे, दुसऱ्याला समजून घेणे, आपुलकीने विचारपूस करणे, एकमेकांना मदत करणे, खेळातून आनंद घेणे यासारख्या गोष्टी दिसून आल्या. स्वअभिव्यक्ती, गोष्टी, प्रसंग, गाणी/कविता, नाटिका, कला आणि हस्तकला, भूमिका अभिनय या उपक्रमांतून विविध मूल्यांची रुजवणूक होताना दिसून आली. मूल्यवर्धन पुस्तिकेमुळे अध्यापन करताना मुले आनंदी वाटत होती व सर्वच मुले विविध उपक्रमांत सहभागी होताना दिसत होती.
सहयोगी अध्ययन पध्दती, जोडीचर्चा, गटचर्चा सामुदायिक वर्तुळ यातून मुले आनंदाने अध्ययन करताना दिसून आली. शांतता संकेत, वर्गनियम यामुळे शालेय जीवनातच मुलांना जबाबदारी, एकाग्रता, योग्य-अयोग्य वर्तन याची जाणीव झालेली दिसून आली.
-श्री. आत्माराम काशिराम पाटील
मूल्यवर्धन पुस्तिका आणि मी व माझे विद्यार्थी
-श्री. आत्माराम काशिराम पाटील
मूल्यवर्धनची गरज
शिक्षक व पालक म्हणून मला मूल्यवर्धनची फार गरज वाटते. असे नाही, की मुलांमध्ये मूल्ये नसतात. ती त्यांच्यात असतातच. आपल्या वागण्याचे बारकाईने निरीक्षण करीत असतात. आपले वागणे मुलांच्या दृष्टीने आदर्श असते. हे सर्व लक्षात घेऊन आपले विचार, बोलणे, आचरण योग्य असे ठेवणे आवश्यक आहे. ती गरज मूल्यवर्धनने पूर्ण होत आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थीकेंद्रीत अध्ययन-अध्यापन हवे. वातावरण बालस्नेही हवे. मूल्ये शिकवता येत नाहीत तर वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमातून मुले ही मूल्ये आत्मसात करतात. यात शिक्षकाची भूमिका सुलभकाची असते. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. एक प्रसंग असा की, मूल्यसंस्कार व्हावेत या हेतूने मी साने गुरुजींच्या कथामालेचे वाचन उपक्रम घेतला. एका कथेत पक्षी मरतो व शाम त्याला मातीत खड्डा करून पुरतो असा घटनाक्रम आहे. कथा वाचनानंतर काही काळ लोटला. विद्यार्थ्यांना असाच एकदा एक पक्षी सापडला. त्यांनी त्याला घरी आणले, परंतु पक्षी वाचला नाही. पक्षी मेल्यावर त्याला मातीत पुरले. नंतर त्याचे उत्तरकार्य देखील मुलांनी मुरमुरे वाटून केले.
दुसरा प्रसंग असा की, दुपारी जेवणाच्या सुट्टीत पहिलीचा एक मुलगा पडला. त्याला डोक्याला लागले. मुलांनी लगेच उचलून कार्यालयामध्ये आणले. प्रथमोपचारपेटी काढून त्याला मलमपट्टी केली. यावरुन मुले जबाबदारीने, भानाने वागतात.
यावरून मूल्यवर्धन उपक्रमाची गरज, आवश्यकता लक्षात येते. सर्वच विद्यार्थ्यांना उपक्रम पुस्तिकेतील चित्रे, प्रश्नावली चित्र निरीक्षण, चित्रे रंगवा आणि शीर्षक द्या, चित्रप्रसंग, छोट्या नितीकथा, व्यक्ती परिक्षण, स्वयंमूल्यमापन, रिकाम्या वेळेत करावयाचे उपक्रम आवडतात. यामुळे भविष्यात चांगले नागरिक तयार होतील यात शंका नाही. मूल्ये आणि कौशल्ये यातून मुले जबाबदारीने वागायला आणि काळजी घ्यायला शिकतात. मूल्यवर्धन या प्रयत्नांना हातभार लावते. उपक्रमांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदल घडविला जातो. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही तर चित्र काढणे, गाणी म्हणणे, अभिनय करणे आणि खेळणे या गोष्टीसुध्दा शिकण्याचा महत्त्वाचा भाग आहेत. शिक्षण माणसाला जगायला मदत करते. मूल्यांमुळे माणुसकी जगत असते. प्रत्येक मूल वेगळे असते. त्याला तसे स्विकारून शक्य तेवढ्या नवीन गोष्टी शिकायला संधी द्यावी. छोट्याछोट्या गोष्टीमुळेच, मूल्यांमुळेच डोंगराएवढी मुले तयार होतात. त्यांचे जगणे स्वतःसाठी सुसह्य व घरासाठी, समाजासाठी, देशासाठी अर्थपूर्ण बनत असते. कर्तव्याने घडतो माणूस. हे मला अनुभवाने समजले आहे. म्हणूनच मूल्यवर्धनची गरज आहे. शिक्षणाने माणूस शिक्षित होतो, तर मूल्यांमुळे बुध्दीला सत्याकडे व भावनेला माणुसकीकडे नेणारा मार्ग सापडतो.
-ज्योती सोनार
मूल्यवर्धनची गरज
-ज्योती सोनार
बंधूभाव
लहान भावाबाबत प्रेम
आमच्या शाळेत गणेश लहू माळचे नावाचा विद्यार्थी आहे. मागील वर्षी तो पहिलीत होता. शाळेत सर्व आदिवासी भिल्ल समाजाची मुले आहेत. सर्व पालक म़ोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मजुरीला जाताना पालक लहान मुलांना सांभाळण्यासाठी शाळेतील मोठ्या मुलांना सोबत घेऊन जात असत. परिणामी शाळेतील उपस्थिती कमी व्हायला लागली. उपस्थिती वाढावी म्हणून आम्ही पालकांना विनंती केली की, आपल्या मुलांना शाळेत पाठवा. सोबत त्यांच्या लहान भावांनाही शाळेत पाठवा. अशा प्रकारे हळूहळू उपस्थिती वाढू लागली.
-श्री सतिष दौलतराव खैरनार
बंधूभाव
-श्री सतिष दौलतराव खैरनार
प्रेरणादायी व आनंददायी मूल्यवर्धन
मूल्यवर्धन पुस्तिकेतून स्वतःमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये झालेले विधायक बदल.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व MSCERT, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व शिक्षण विभाग, पं. स. शिरपूर, जि. प. धुळे यांच्या उत्कृष्ठ आयोजनाने आम्हांला मूल्यवर्धन प्रेरक म्हणून प्रशिक्षण देण्यात आले. तेच प्रशिक्षण केंद्र स्तरावर सर्व शिक्षकांना देण्याचा प्रयत्न केला. तालुका व केंद्रस्तरिय प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःच्या शाळेत मूल्यवर्धन तासिकांचे आठवड्यातून तीन दिवस नियोजन केले. मूल्यवर्धन शब्द उच्चारताच विद्यार्थी हात वर करून शांतता संकेत एकमेकांना देत. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद दिसून येई. प्रत्येक उपक्रम राबविताना विद्यार्थी पुन्हापुन्हा उपक्रम घेण्यासंदर्भात आग्रही असत. उपक्रम आयोजनामुळे अनियमित असणारा विद्यार्थीही शाळेत नियमित यायला लागला. विद्यार्थ्यांमध्ये विधायक बदल होऊ लागले. चांगल्या-वाईट सवयींबाबत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा करत. शाळेत, घरी, इतरत्र कोणाला काय सहकार्य केले याचे विद्यार्थी अनुभवकथन करू लागले. सहयोगी खेळ विद्यार्थी स्वतःगट करून खेळू लागले. विद्यार्थी सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला. एकंदरीत ह्या प्रशिक्षणाचा व कार्यक्रमाचा उद्देश नक्कीच सफल होताना दिसून येत आहे. या सर्व बाबतीत गशिअसो, शिविअसो, केंद्रप्रमुखसो, शाळेचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक यांनी नेहमी प्रेरित केले, सहकार्य केले. पुन्हा या शैक्षणिक वर्षात मूल्यवर्धन कार्यक्रम योग्य पद्धतीने नियमित राबवून विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न करू.
-उपेंद्र पाटील
प्रेरणादायी व आनंददायी मूल्यवर्धन
-उपेंद्र पाटील
मूल्यवर्धन आणि विशेष नोंदी
मूल्यवर्धन उपक्रम वर्गावर राबविल्यानंतर विद्यार्थ्यांच्या उपक्रम पुस्तिकेत शेवटी विशेष नोंदी केल्या जातात. ह्या नोंदी म्हणजे उपक्रमाच्या मूळ ध्येयाच्या यशस्वीतेचे प्रतिक होय. ह्या नोंदी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या माहितीस्तव आहेत, पण नोंदी करताना वर्गातील प्रत्येक मूल जाणून घेणे व त्याच्यातील बदल लक्षात घेणे आणि ते बदल आणि त्याच्यातील सकारात्मक बाबी मांडणे हा एक वेगळा अनुभव या ठिकाणी मांडत आहे.
रवींद्रनाथ टागोर म्हणतात, “जन्माला येणारे प्रत्येक मूल म्हणजे ईश्वराचा एक संदेश असतो, त्याने मानवाबद्दलची आशा सोडलेली नाही हा तो संदेश होय.” मानवाने ईश्वराविषयीच्या ऋणाची जाण व्यक्त करण्यासाठी या प्रत्येक मुलातील मानवता वर्धित करणे गरजेचे आहे. मानवता म्हणजे काय, तर संस्कार आणि मूल्यांची कृती आणि उक्तीतून व्यक्तता होय . शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने यासाठीच मूल्यवर्धन कार्यक्रमाची आखणी केलेली आहे असे दिसते.
लीला दीक्षित म्हणतात, “मुलांचे मन संवेदनक्षम, विवेकी, विचारी बनायला आज विश्वसंघटना तयार होणे महत्त्वाचे आहे. या संघटनेने मुलांचे आरोग्य, शिक्षण, मानसिक आरोग्य, मुलांचे साहित्य आणि कलांचा साऱ्यांचाच एकत्रित विचार करायला हवा. “मूल्यवर्धन उपक्रम हा असाच एक खात्रीचा विचार असल्याचे लक्षात येते. हा विचार उपायाप्रमाणे लागू झाला की नाही हे पाहायचे असेल तर मूल्यवर्धन उपक्रम वर्षभर राबविल्यानंतर केल्या जाणाऱ्या विशेष नोंदी पाहणे गरजेचे ठरेल. उदा . विशाल सायबू पावरा ( इयत्ता चौथी, जि. प. शाळा क्र .४ कापडणे ता. जि. धुळे) विशालचे वाचन,शब्दसंग्रह अफाट आहे. पुस्तकांच्या दुनियेत हरवून जाणारा विशाल एक चांगला मुलगा आहे. मूल्यवर्धन संदर्भात त्याला कळते. चांगल्या-वाईटाची जाण आहे. आपल्या आईची तंबाखू खाण्याची सवय त्याने स्वप्रयत्नाने सोडवली. पक्षी संवर्धन संदर्भात च्युईंगम विरोधी अभियानात त्याने उत्तम भूमिका बजावली आहे. च्युईंगम खाण्याने पक्षांना होणारा त्रास तो मित्रांना, नातेवाईकांना सांगतो. त्याने आपले पक्षीप्रेम आयुष्यभर जोपासावे आणि त्या संदर्भात अधिक काम करावे ही शुभेच्छा.
मूल्यवर्धनची वैशिष्ट्ये
१ ) मूल्यवर्धन नोंदींच्या माध्यमातून उपक्रमाची यशस्विता मुलांमधील वर्तन बदलाच्या स्वरुपात लक्षात आली .
२) विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःमधील चांगल्या बाबी समजल्या. त्यातून स्व-जाणीव विकसित झाली .
३) पालकांनाही मुलांमधील बदलांची जाणीव नोंदींच्या माध्यमातून झाली. त्यातून शाळांविषयीची आत्मीयता वाढली.
४) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीप्रमाणे शाब्दिक स्वरूपात या नोंदी आहेत.
५) नोंदवलेला प्रत्येक विद्यार्थ्यांमधील सकारात्मक बाबींचा आलेख हा स्वतंत्र आहे. कुठेही दोन विद्यार्थ्यांमध्ये तुलना वगैरे नाही. म्हणजेच मुलाचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व त्यात मान्य केले गेले आहे.
६) विशेष म्हणजे या ठिकाणी शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही प्रेम, जिव्हाळा, आपुलकीच्या रेशमी धाग्यांनी जोडले जात असल्याचे दिसते.
-हर्षदा बोरसे
मूल्यवर्धन आणि विशेष नोंदी
-हर्षदा बोरसे
मूल्यवर्धनच्या वाटेवर आमचा प्रवास
मूल्यवर्धन एक दिशादर्शकासारखे आहे. या आधी आपण मुलांमध्ये मूल्य रुजवणूक करत होतोच, पण या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांमुळे दिशा मिळाली. आपल्या स्वतःमध्ये आधी बदल होत आहे. त्यामुळे मुलांमध्ये आपोआप बदल जाणवू लागले. ती आज काळाची गरज आहे.
सन 2017-18 चा प्रसंग माझ्या वर्गातला. माझ्याकडे पाहिलीचा वर्ग होता. सप्टेंबर महिना होता. आमच्या शाळेला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. माझ्या वर्गात सुमित नावाचा विद्यार्थी होता. मुले त्याला चिक्या म्हणत. साहेब वर्गात आले आणि सुमीतला विचारले, “बाळा तुझे नाव काय?” सुमित काहीच बोलला नाही. त्याला पुन्हा विचारले, “तुला गाणे म्हणता येते का?” तो रागातच बोलला, “माले न्हही येस जाय” अधिकारी अवाक झाले. वर्गशिक्षक या नात्याने त्यांनी मला सूचना केल्या. सुमित रागीट स्वभावाचा होता. कुणाचेच ऐकत नसे. कायम खोड्या करणे, दुसऱ्याच्या वस्तू घेणे, उद्धट बोलणे असे पराक्रम करण्यात त्याला आनंद वाटे. त्यादिवशी अशीच खोडी त्याने केली होती. शिक्षा म्हणून त्याला वर्ग स्वच्छ करण्यास सांगितले होते. तो राग त्याच्या मनात असावा, असे मला वाटले.
प्रसंग दुसरा- वर्गात मी मुलांना विविध वस्तू दाखवून त्यांचे उपयोग विचारत होतो. मुलांना मी दगड दाखविला. मुलांनी वेगवेगळी उत्तरे दिली. कुणी म्हटले घर बांधण्यास, कुणी विहीर बांधण्यास इ. मी सुमितला विचारले. तो म्हणाला, “भांडणात डोके फोडण्यासाठी.” मी विचारात पडलो. याला प्रवाहात आणायचे कसे?
वास्तविक सुमित अभ्यासात हुशार होता. त्यानंतर सन 2018-19 मध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी माझी निवड झाली. प्रशिक्षण खूप छान झाले. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, सुमितचा स्वभाव आपण या उपक्रमातून नकळत बदल करू शकतो. प्रशिक्षण संपले आणि मोठ्या उमेदीने शाळेत गेलो. हळूहळू अनेक उपक्रम वर्गात राबविले. विद्यार्थी पुस्तिका, शिक्षक पुस्तिका याचा आधार घेतला. स्वतःची ओळख, मोठ्यांचा आदर, आपल्या भावना, शेजारी, मित्र याविषयी महिती असे गटात, चर्चेतून, खेळातून उपक्रम घेत राहिलो. नकळत मुलांचे निरीक्षण करत होतो. अवघ्या 6 महिन्यांत सुमितमध्ये खूप फरक जाणवला. आज सुमित खूप आज्ञाधारक झाला आहे. सर्वांशी प्रेमाने वागतो. मोठ्यांचा आदर करतो. वर्गात तो गटप्रमुख आहे. शिस्त पाळतो. त्याच्या वागण्यात, बोलण्यात खूप बदल झाला. मुलांना शाळेत अंडी व केळी पूरक आहार दिला जातो. तर हा खोड्या करणारा सुमित स्वतः केळी वाटप करतो. केळीच्या साली सर्वांना एका ठिकाणी टाकण्यास सांगतो. ते सर्व साली टोपल्यात टाकून जवळच असलेल्या शेळ्यांना टाकून येतो. त्याचे वडील एके दिवशी शाळेत आले. ते म्हणाले, “गुरुजी सुमितवर जादू केली की काय? खूप बदल झाला त्याच्यात.” मी त्यांना मूल्यवर्धन उपक्रमाविषयी सांगितले. त्यांना खूप बरे वाटले. सुमितचे वडील शिक्षित होते, परंतु शेतीच्या कामामुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. ते म्हणाले, “खरंच, वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आहेत हे. हे फक्त जि. प. च्या शाळेतच घडू शकते.” धन्यवाद देऊन ते आनंदाने घरी गेले. त्या दिवशी मला खूप समाधान वाटले.
सुमित सारखी अनेक मुले आहेत. त्यांना वेग खूप आहे, पण त्या वेगाला योग्य दिशा देणारे स्टेअरिंग मूल्यवर्धन होऊ शकते. आज आपण बघतो की मुले खूप हुशार आहेत, परंतु त्यांच्यातील संस्कारांचा अभाव दिसून येतो. ते संस्कार मूल्यवर्धन कार्यक्रमातून देऊ शकतो. याच्या आधी आपण शाळेतून मूल्य शिकवित नव्हतो का ? नाही, असे नाही. आज जग बदलले आहे. या धावपळीत, स्पर्धेच्या युगात मूल्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
-निलेश विखरणकर
मूल्यवर्धनच्या वाटेवर आमचा प्रवास
-निलेश विखरणकर
मी आणि माझे अनुभव
मूल्यवर्धन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केलेले प्रयत्न.
मूल्यवर्धन हा कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी व उपयुक्त असा आहे. विद्यार्थांमध्ये शाळेतच मी वेगवेगळी मूल्ये रुजवत असते. भूतदया, सहानुभूती, सृजनशीलता अशा सर्व मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना त्यांच्या रोजच्या वागण्यातून मी त्यांना सांगत असते. देशाचा सुजाण नागरीक घडविण्यासाठी मूल्य खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सामाजिक, आर्थिक, भौगोलिक परिस्थिचा विचार करून अपेक्षित मूल्ये रुजवायची आहेत. गतिमान आयुष्यात माणूस दिवसागणिक संवेदनशून्य होत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पिढीवर आपण नक्की काय आणि कसे संस्कार करणार आहोत, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळेच उद्याची पिढी संस्कारक्षम आणि चांगली बनवायची असेल व त्यातून उद्याचे सुसंस्कृत नागरिक तयार करायचे असतील, तर शालेय जीवनापासून मूल्यशिक्षण असणे नितांत गरजेचे आहे. या मूल्यवर्धन कार्यक्रमातून शाळेत पाठ्यपुस्तकातील अशयातून मूल्यांवर योग्य ते संस्कार रुजविण्याचे कार्य होत असते. शिक्षकांनी अध्यापनातून सातत्याने संस्कार करणे ही काळाची गरज आहे. मूल्यशिक्षण ही प्रत्येकवेळी चार भिंतीत, वर्गात शिकविण्याची गोष्ट नसून वागणुकीतून, व्यवहारातून मूल्ये मनात रुजायला हवीत. यासाठी शिक्षक, पालक, समाज यांची तिहेरी भूमिका महत्त्वाची आहे. सर्वांनी मिळून मुलांसमोर उत्कृष्ट वागणुकीचा आदर्श ठेवला तर निश्चितच कायापालट होईल.
-जयश्री सावले
मी आणि माझे अनुभव
-जयश्री सावले
मीमी आणि माझा उपक्रम
मूल्यवर्धन म्हणजे नव्या दिशेला घेऊन जाणारी प्रेरणा. त्या प्रेरणेमुळे मला माझ्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणण्यात मदत झाली.
माझी जि. प. शाळा संपूर्ण आदिवासी भिल्ल वस्तीवरील आहे. दयनीय परिस्थिती व परिसरातील, मातीच्या आणि कुडाच्या, भिजत्या आणि पडक्या भिंतीतील त्या मागासलेल्या विद्यार्थ्यांची शाळा. ज्या मुलांचे अगं झाकून जाईल येवढे कपडे नाही, पोटभर जेवण होईल येवढी परिस्थिती नाही, अशा गरिब वस्तीवरील माझे विद्यार्थी. शाळेत येताना अंघोळ नाही, स्वच्छ आणि पुरेसे कपडे नाहीत, डोक्याला तेल नाही, पायात चप्पल नाही, हातात दप्तर नाही, दोन रिकाम्या हातांनी आणि मोठ्या अपेक्षेने आलेली माझी बालके. अशा मोठ्या आव्हानाला मी मनापासून स्वीकारले आणि त्यांचा विडा उचलला. अनेक समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केला. आधी त्यांनी शाळेत येणे, शाळेत, बसायची सवय लावणे, अंघोळीसाठी साबण, डोक्याला तेल, पावडर, लेखन साहित्य अशा अनेक गोष्टींची पूर्तता मी आधी केली. रोज सारखे प्रयत्न करावे लागत होते, पण यश 100% येत नव्हते. कारण सर्व कुटुंब सकाळी मजुरीसाठी घराबाहेर पडणार. दिवसभराची मजूरी आली की दोन वेळचं भागणार. त्यामुळे शाळेचे महत्त्व, शिक्षणाचे महत्त्व याला दुय्यम स्थान होते. परंतु म्हणतात ना ‘प्रयत्नांती परमेश्वर’ माझ्या प्रयत्नांची हाक प्रत्येक घर, प्रत्येक पालक आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत गेली. रंगरंगोटी, परिसर, झाडी, चित्रे, लेखन साहित्य, खेळाचे साहित्य यामुळे शाळचे आकर्षण वाढत गेले. या कणखर धातूरुपी प्रयत्नांना परिसरूपी स्पर्श झाला तो मूल्यवर्धन उपक्रमाचा. यातील चांगल्या सवयी या मुद्यांनुसार मी काही चांगल्या सवयी व त्यांचे चित्र मुलांना दिसतील असे तयार करून वर्गात लावले. रोज त्यांना त्याप्रमाणे करण्यास सांगितले. तरी सगळ्याच मुलांवर त्याचा परिणाम होत नव्हता. मग प्रत्येक चांगली सवय लिहून त्याची पट्टी तयार केली. जसे : रोज लवकर शाळेत येणे, रोज अंघोळ करणे, स्वच्छ धुतलेले कपडे घालणे, दररोज अभ्यास करणे. याप्रमाणे पट्ट्या करून घेतल्या. शाळा भरली की, सकाळीच जो विद्यार्थी अंघोळ करून आला असेल त्याच्या हातात ती पट्टी द्यायची. त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढायचा आणि सगळ्यांनी त्याचे टाळ्या वाजवून कौतुक करायचे. असे प्रत्येक पट्टीप्रमाणे येणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक करायचे. या उपक्रमाकडे मुले इतकी आकर्षित झाली, की प्रत्येकाला वाटायचं मला पट्टी धरायला मिळावी, माझा फोटो निघावा आणि माझही कौतुक व्हावे. या उपक्रमाचा मला खूप उपयोग झाला. माझ्या वर्गाची उपस्थिती वाढली. नटनेटकेपणा, स्वच्छता, अभ्यास करणे, अशा अनेक चांगल्या गोष्टी मला एकाच उपक्रमातून साध्य झाल्या. आज माझी शाळा केंद्रात नं. 1 आहे. तालुक्यात उल्लेखनीय आहे.
आमच्या प्रयत्नाला मिळाली मूल्यवर्धनाची साथ
धन्यवाद करते या उपक्रमाचे जोडूनी दोन्ही हात
-संगिता मराठे
मी आणि माझा उपक्रम
-संगिता मराठे
मूल्यवर्धन व माझे विद्यार्थी
“माणूस पक्ष्याप्रमाणे आकाशात उडायला शिकला, माशाप्रमाणे पाण्यात पोहायला शिकला पण माणसाप्रमाणे वागायला शिकला नाही.” डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन. सात दशकांपूर्वी स्वातंत्र्याच्या आनंदोत्सवात या महान शिक्षण तज्ज्ञांनी केलेले विधान आज तंतोतंत लागू पडतेय. देशाचे आधारस्तंभ असलेली तरूणाई व्यसनाधीनतेच्या व आंतरजालावरील भूलभुलैय्यात गुरफटलीय. कुटुंब व समाज यांचे अस्तित्व धोक्यात येऊ पहातेय. स्पर्धेच्या मागे धावताना विद्यार्थीच काय, पण पालकही आपला प्राचीन व सांस्कृतिक वारसा विसरले आहेत. ही सर्व परिस्थिती पाहता माझ्या शाळेत शिकविले जाणारे शांतीगीत, पसायदान, ‘श्यामची आई’ यांच्या जोडीला आलेले शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे मूल्यवर्धनम्हणजे दुधात साखर! या पुस्तिकेतील अभ्यासपूर्ण उपक्रम म्हणजे अनुभवांची मांदियाळी!
“If money is lost, nothing is lost, if time is lost something is lost, but if character is lost everything is lost” वरील वचनातून मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करताना विषयाला साजेसे आनंददायी व उपक्रमांनीयुक्त प्रशिक्षण व मार्गदर्शन पुस्तिका मला भावली. आकर्षक मुखपृष्ठ, गोष्टी, गाणी व साजेशी रंगीबेरंगी चित्रे, कल्पकतेला वाव देणारे प्रश्न, कृतींची रेलचेल यांनी युक्त ‘विद्यार्थी उपक्रम पुस्तिका’ हातात पडताच विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याचबरोबर पुस्तिकेतील विविध कृती, गोष्ट वाचन व कथन, चित्रांतील फरक ओळखणे, विविध कोडी, टप्प्याटप्प्याने चित्रे काढून रंगविणे इ. वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना हसतखेळत मूल्यशिक्षण प्रत्यक्ष कृतीतून देणे आनंददायी ठरले. नियोजनबध्दरित्या पाच विभागात केलेली पुस्तिकेची विभागणी व त्यासाठी नमूद केलेला कालावधी आम्हा शिक्षकांना उपयुक्त व मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्यांना बोलके करण्याबरोबरच त्यांच्या क्षमता, जबाबदारी, नातेसंबंधातील आपुलकी, परस्पर सहकार्य व आदर यांची रूजवण या नाविण्यपूर्ण उपक्रम पुस्तिकेने केली व ज्ञानरचनावाद, कृतीतून शिक्षण, विद्यार्थी केंद्रित आनंददायी प्रक्रिया यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
माझ्या शाळेतील व वर्गातील बदल खालीलप्रमाणे-
१) विद्यार्थी स्वतःसोबत आपल्या मित्र-मैत्रिणीचा परिचय करून देऊ लागले.
२) सहयोगी खेळ खेळताना परस्पर सहकार्य करू लागले.
३) पाण्याचा जपून वापर करताना आढळले.
४) वर्गात व वर्गाबाहेर शिस्तीने व रांगेने आचरण करू लागले.
५) नीटनेटकेपणा दररोज दिसू लागला.
६) दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वयंस्फूर्तीने मदत करू लागले.
७) पालकांची भेट घेतली असता घरीदेखील विद्यार्थ्यांत झालेल्या आमुलाग्र बदलाची कल्पना आली.
८) रस्त्याने जाता येता वाहतुकीचे नियम पाळू लागले.
९) घर व परिसरातील आजी, आजोबांना आधार देतानाच्या प्रसंगात सौजन्यशीलता हे मूल्य दिसून आले.
१०) मुके प्राणी व झाडे यांच्याबरोबरच्या कृतींतून संवेदनशीलता मूल्याची जपणूक विद्यार्थ्यांना समजली.
११) टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून पर्यावरण रक्षणास हातभार लावू लागले.
१२) देशाच्या विविधतेतील एकता गोष्ट रुपाने त्यांच्यात रूजली.
१३) मुले आईला घरकामात आवडीने मदत करू लागली.
१४) शाळेत व घरीदेखील श्रमाची कामे करण्यासाठी उत्सुक दिसू लागली.
१५) कचरा कचरापेटीत टाकू लागली व इतरांना ते पटवून देऊ लागली.
याबरोबरच अजूनही अनेक बाबतीतील पालक व ग्रामस्थ यांच्या विद्यार्थ्यांतील वर्तनबदलाच्या प्रशंसनीय प्रतिक्रिया शाळेत येत आहेत. यामुळे आम्हा शिक्षकांचा उत्साह वाढला आहे. “देशाचा भार आहे शिरावरी असे थोडे तरी वाटू द्या हो” या सेनापती बापट यांच्या उक्तीप्रमाणे समाजकार्यात अग्रणी असलेल्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने आजच्या ढासळलेल्या सामाजिक परिस्थितीत राबवलेला ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रम म्हणजे राष्ट्रभक्तीचा उत्कृष्ट नमुनाच! या उपक्रमासाठी आम्हा शिक्षकांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवीत हा कार्यक्रम अव्याहतपणे सुरू राहील, ही ग्वाही मी देते.
-अंजनी भावसार
मूल्यवर्धन व माझे विद्यार्थी
-अंजनी भावसार
मूल्यवर्धनचा अविष्कार (माझ्या बालकांमधील झालेला बदल
शैक्षणिक अभ्यासक्रमात मूल्यशिक्षण रुजवत होतो. त्यात मूल्यवर्धनने भरीव कामगिरी केली. त्यामुळे प्रेरणा मिळाली व विद्यार्थ्यांची अभिरुची वाढली.
मूल्यवर्धनाचा अविष्कार …नहि ज्ञानेन सदृशं पवित्र इंह विदयते.
ज्ञानासारखी पवित्र गोष्ट जगात दुसरी नाही. मग ज्ञान म्हणजे नुसते पुस्तकी ज्ञान नव्हे तर मानवाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दिले जाणारे शिक्षण व त्या शिक्षणातून एक सुजाण, जबाबदार, संवेदनशील, कर्तबगार नागरिक बनावा. हे संस्कार, जडणघडण त्याच्या बालमनावर रुजवणे, फुलवणे व ती दीर्घकाल टिकवणे यासाठी अनेक संस्था धडपडत आहेत. त्यातीलच संस्कार देणारी व प्रत्येक मुलाचे भविष्य तेजोमय होण्यासाठी उत्कृष्ट काम करणारी संस्था म्हणजे शांतिलाल मुथ्था फाउंडेशन.
आजपर्यंत मौखिक स्वरूपात मूल्यशिक्षण देत होतो. त्याचे फलितही चांगले पाहायला मिळत होते, पण आता या अभ्यासक्रमातील एक घटक व त्यावर प्रत्येक वयोगटानुरुप प्रेरणा देणारे पुस्तक मिळाल्यावर नक्कीच वाढ होईल. मूल्यशिक्षण, मूल्यसंवर्धन त्याही पलीकडे जाऊन मल्यवर्धन होत आहे. वर्धन म्हणजे वाढ. असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम हाती घेतल्यावर नक्कीच मूल्यांचे वर्धन होईल व ते चिरकाल मनावर बिंबवले जातील. कारण विद्यार्थी ही देशाची संपत्ती आहे. तिला जर सुसंस्कारांनी घडवले तर देशाच भविष्य उज्ज्वल होईल. परिणामी व्यक्तिविकास, समाजविकास, राष्ट्रविकास होईल. एक प्रगतिशील राष्ट्राची वाटचाल सुरू होईल.
प्रत्येक विद्यार्थी हा संवेदनशील झाला पाहिजे. सहकार्याची वृत्ती त्याच्यात भिनली पाहिजे. त्याने सर्वांचा आदर राखून सर्वांप्रती प्रेम, सहानुभुती, ऐक्य, संघशक्तीने राहून नवीन गोष्टी तो शिकला पाहिजे. संशोधनवृत्ती जागृत झाली पाहिजे. विद्यार्थ्यांमधील क्रुरता कमी होऊन नम्रता, मैत्री वृद्धींगत व्हावी यासाठी मूल्यवर्धनची गरज भासतेय. भावी पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडू नये, म्हणून त्यांच्या कोवळ्या मनावर संस्कार यातून दिले जातात. सृष्टीतील जे पाच तत्त्व आहेत, आप, तेज, वायु, आकाश, भूमी यांचे त्याने संर्वधन करायला हवे. अध्यात्मिक ज्ञानाची ज्योत मनामध्ये तेवत ठेवून त्यातून ज्ञान विज्ञानाची सांगड घालून एक आदर्श तत्त्वज्ञान, आदर्श तत्ववेत्ते तयार करण्याची क्षमता जर प्रत्येक बालकामध्ये रोवली, तर मूल्यवर्धन झाले असे समजावे.
-शुभांगी पाटील
मूल्यवर्धनचा अविष्कार (माझ्या बालकांमधील झालेला बदल)
-शुभांगी पाटील
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे झालेला अमुलाग्र बदल
मूल्यवर्धन कार्यक्रम शाळेत राबवल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्य चांगल्याप्रकारे रुजवली गेली.
मूल्यवर्धन कार्यक्रम राबवत असताना विद्यार्थ्यांमध्ये नकळत त्यांना स्वतः चे मत, आवडी-निवडी व्यक्त करणे, स्वतंत्र विचार करणे, जबाबदारीची जाणीव, जगाशी संबंधित घडामोडी, एकमेकांचा आदर करणे, कुटुंब, समाज व शाळा याबद्दल आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना कवितेच्या माध्यमातून शाळेचे नियम कसे पाळावे याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला. चित्रांवर आधारित प्रश्न विचारून तुम्ही काय कराल? याविषयी त्यांच्याकडून त्या गोष्टी करुन घेण्याचा प्रयत्न केला. अशा अनेक उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला गेला. शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत यासाठी संविधानातील मूल्ये व त्यासंबंधीत कौशल्ये विकसित करण्यासाठी हा कार्यक्रम अतिशय उत्तम आहे व तो राबवला जावा.
-रत्नाकर सोनवणे
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे झालेला अमुलाग्र बदल
-रत्नाकर सोनवणे
“कच-याला करु हद्दपार – स्वच्छतेचा करु प्रचार”
इयत्ता चौथीच्या वर्गात ‘कचऱ्याच्या विघटनास लागणारा कालावधी’ यावर चर्चात्मक संवाद घेतला. स्वच्छतेचा संस्कार रुजला. त्यानंतर शालेय परिसरात वावरताना विद्यार्थ्यांमधील संवादातून त्यांच्यात झालेला बदल नजरेस आला. त्याचाच हा अनुभव सांगत आहे.
शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून आज सर्व विद्यार्थ्यांना केळी वाटप करण्यात आल्या. सगळ्या विद्यार्थ्यांनी केळी घेतल्या. केळीच्या साली काढून कचराकुंडीत टाकल्या. मात्र इयत्ता पहिलीच्या काही मुलांनी केळी खाऊन साली तेथेच मैदानावर टाकल्या. चौथीमधील दिनेशने हे पाहिले. तो लगेचच त्या मुलांजवळ गेला आणि कचरा कचराकुंडीत का टाकावा, याविषयी समजावून सांगू लागला. पुढच्या पाच मिनिटांत पहिलीच्या मुलांनी मैदानावर फेकलेल्या केळीच्या साली गोळा केल्या आणि कचराकुंडीत टाकल्या. दिनेशच्या या यशस्वी सुसंवादाची बातमी चौथीतील त्याच्या मित्रांना कळली. ते सगळे एकत्र गोळा झाले. त्यांच्यातील संवाद-
“दिनेश, तू खूप छान काम केलेस. शाळेत स्वच्छता हवीच, पण तुला असं करावं असे का वाटले?”
“अरे रोहित, पहिलीची मुले अजून लहान आहेत. त्यांना कचऱ्याच्या विघटनाची माहिती नाही, पण नरेंद्र सरांनी मूल्यवर्धनच्या तासाला आपल्याला शिकवले आहे. कचऱ्याचे विघटन खूप महत्त्वाचे असते. संत्र्याच्या सालीचे विघटन व्हायला २ ते ५ आठवडे लागतात. मग केळीच्या सालीलाही १-२ आठवडे तर नक्कीच लागणार.”
“खरे आहे तू म्हणतोस ते.”
“अमोल, अरे एवढंच नाही, कागदाचे बारीक कण होऊन मातीत मिसळायला दोन आठवडे लागतात. ही तर केळीची साल आहे.”
“पण दोस्तांनो, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि बाटल्या ह्या मात्र खूप त्रास देणार आपल्याला.” “वैशाली, कशावरून असं म्हणतेस तू ?”
“रोहित, अरे गायी, म्हशी, बकऱ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या खाऊन मरायला लागल्या. पांडू तात्यांची बकरी अशीच मेली.”
“हो का? बाप रे ! मग तर आपणच काळजी घ्यायला पाहिजे.”
“तेच तर म्हणायचे मला. प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे विघटन अनेक वर्षे होत नाही. असा कचरा माणसाला घातक आहे. म्हणून आपणच प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करु. म्हणजे पहिली-दुसरीच्या मुलांना आत्तापासूनच कच-याबाबत सवय लागेल.”
“अगदी बरोबर दिनेश, आपण आपल्या घरीपण ही काळजी घेऊ.”
“सारे मिळून कचऱ्याला हद्दपार करु आणि स्वच्छतेचा प्रचार करु .. चला तर मग ! आपले सर आपल्या सोबत आहेतच.” असे म्हणत चौथीचे सारे विद्यार्थी एका नव्या जोमाने प्लॅस्टिक पिशव्यांपासून पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तयारीला लागले. जणू मूल्यवर्धनमुळे चिमुकल्या पावलांना बळ मिळाले.
-नरेंद्र खैरनार
“कच-याला करु हद्दपार – स्वच्छतेचा करु प्रचार”
-नरेंद्र खैरनार
मूल्यवर्धन शिक्षण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आलेली सामाजिक जाणीव
“शिक्षण म्हणजे समाजोद्धाराचे प्रभावी साधन असते” या उक्तीने मूल्यवर्धन कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल झालेले अनुभवास येत आहेत. राष्ट्र प्रगतीसाठी समाज व येणारी पिढी हे स्तंभ महत्त्वाचे असतात. कारण लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील व कर्तबगार नागरिक हेच देशाची संपत्ती आहे व ते घडविण्यासाठी मूल्यवर्धनची खूपच जास्त मदत मिळते आहे.
माझ्याकडे इयत्ता दुसरीचा वर्ग आहे. मूल्यवर्धन तासिका वेळापत्रक नुसार घेत असतेच, परंतु दिवसभरात अध्ययन-अध्यापन कार्य करीत असताना मला विद्यार्थी निरीक्षणातून त्यांच्यात झालेले काही सकारात्मक बदल, अनुभव जे मूल्यवर्धन तासिकेमुळे झाले ते पुढीलप्रमाणे.
1) विद्यार्थी शांतता संकेत अगदी प्रामाणिकपणे पाळतात. त्यामुळे वर्गात गोंधळ होत नाही.
2) मोठ्या लोकांशी आदराने वागतात. हे वर्गातच नव्हे तर त्यांच्या पालकांनी येऊन सांगितले. 3) प्रदीप रवींद्र मोरे हा शाळाबाहय विद्यार्थी होता. तो शाळेतील विविध उपक्रम व साहयोगी खेळ पाहून मला देखील शाळेत प्रवेश देणार का, असे म्हणू लागला. त्याला आम्ही कुठलीही अट न ठेवता प्रवेश दिला. आता तो रोज नियमित उपस्थित राहतो.
4) सुनील बापू भिल हा मुलगा नेहमी कुठल्याही गटकार्यत भाग घेत नव्हता, परंतु मूल्यवर्धन तासिकेमुळे त्याची भीती, लाजळूपणा व सामाजिक दरी नाहीशी झाली.
5) विद्यार्थी एकमेकांना स्वतःहून मदत करू लागले.
6) विद्यार्थ्यांना घरातील व्यक्तींची माहिती लिहायला सांगितली, तेव्हा मुलांनी आपापल्या कुटुंबातील सदस्यांची माहिती, त्यांनी केलेली मदत याविषयी चर्चा करू लागले. पालकांनी ह्या विषयी समाधान व्यक्त केले व असे काही उपक्रम सतत घेतले पाहिजेत असे सुचविले. मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात आल्यामुळे पालकांचा शाळा, शिक्षक, विद्यार्थी यांच्यावर अधिकच विश्वास बळकट झाल्याचे अनुभवास येते. विश्वास मिळवणे व तो टिकून ठेवण्यासाठी मूल्यवर्धनसारख्या इतरही संधी आम्हांला उपलब्ध करून द्याव्यात यावी अशी विनंती करते.
-संगीता ठाकरे
मूल्यवर्धन शिक्षण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आलेली सामाजिक जाणीव
-संगीता ठाकरे
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमधील बदल
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आयोजित मूल्यवर्धन कार्यक्रम खरोखरच प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे. आजच्या पिढीला अत्यंत गरजेचा असा हा कार्यक्रम आहे. यामुळे नक्कीच सुजाण नागरिक निर्माण होण्यास मदत होईल.
मी श्रीम. योगिता मधुकर बिरारी, प्राथ. शिक्षिका, जि. प. शाळा, महालकानडामाना, नेर, ता., जि. धुळे येथे कार्यरत आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम माझ्या शाळेत राबवित असून, त्यात अनेकविध उपक्रम करत आहे. ‘शालेय शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही. भविष्यात मुले चांगली संस्कारक्षम नागरिक व्हावीत, यासाठीच हा मूल्यवर्धन कार्यक्रम आहे. त्यासाठी त्यांना मदत होईल, अशी मूल्ये व कौशल्ये या कार्यक्रमातून माझे विद्यार्थी शिकू लागले आहेत. शाळेतील अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक यातून चांगला नागरिक होण्यासाठी प्रयत्न केले जातातच. बऱ्याचदा शाळेत, घरीही आपण मुलांना उपदेश करतो. ती ऐकत नसतील तर रागवतो. तरीही मुलांमध्ये हवा तेवढा बदल दिसत नाही. मूल्यवर्धन कार्यक्रमात मुले या गोष्टी उपक्रमांतून शिकत आहेत. उपक्रमांत ते स्वतःविचार करतात. एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करतात. कोणी चुकीचे वागले तर काय करायचे हेही ठरवतात. हे सर्व करण्यासाठी त्यांना कोणतीही परीक्षा दयावी लागत नाही, या सर्वांची प्रचिती मला माझ्या वर्गाबाबतीत आली. माझ्या दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांत मूल्यवर्धन उपक्रमामुळे चांगली मूल्ये रुजविली जात आहेत. याचे एक ज्वलंत उदा. म्हणजे माझ्या वर्गातील कु. सोनाली दिलीप गायकवाड या विद्यार्थीनीला १० रू. सापडले. तिने कोणताही विचार न करता ते पैसे माझ्याकडे आणले. “मॅडम, मला हे १०रू. सापडले आहेत. ज्याचे कोणाचे असतील त्याला ते द्या” असे सांगितले. यावरुनच माझ्या विद्यार्थामध्ये चांगले मूल्ये रुजविली जात आहेत, याचा अनुभव आला. हे सर्व फक्त आणि फक्त मूल्यवर्धनमुळेच. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आयोजित मूल्यवर्धन कार्यक्रम हा नक्कीच प्रेरणादायी असून आजचा शालेय विद्यार्थी हा भविष्यात जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनेन यात तीळमात्र शंका नाही. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांना माझा त्रिवार सलाम.
-योगिता बिरारी
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमधील बदल
-योगिता बिरारी
आदर्श व्यक्तिमत्त्व व आत्मभान यांची जाणीव
माझ्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला गेला. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांना आदर्श जगणे हे अनुभवातून, कार्यकारणभाव जाणून घेऊन कसे असावे हे खूप छान समजावून देता आले.
माझ्या वर्गात मूल्यवर्धन घेतल्यामुळे मला खऱ्या अर्थाने मुलांच्या विश्वात जाता आले. त्यांना काय वाटते हे लक्षात आले. त्यांचे मन समजल्यामुळे माझे त्यांच्याविषयीचे विचार बदलले. उदा. ‘माझे शेजारी’ हा उपक्रम राबवताना समजले, की त्यांच्या शेजारी राहात असलेल्या काका-काकुंशी त्यांच्या आई-वडीलांचे भांडण झाले होते. त्यांच्यामुळे दोन्ही घरात कोणताही संवाद नव्हता. हे लक्षात आल्यावर मला माझा उपक्रम प्रभावीपणे राबवता आला. हे सर्व शक्य झाले ते मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेत दिलेल्या विचारप्रवर्तक व तर्क, जिज्ञासा जागृत करायला लावणाऱ्या उपक्रमामुळेच. तसेच योग्य वयात योग्य अनुभूती देऊन संस्कार रुजविण्यासाठी केलेले यथासांग प्रयत्न. त्यामुळे हसत-खेळत मूल्यांचे वर्धन होण्यात खूप मोठी मदत होत आहे. पालकांचा आणि समाजाचा शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदलत चालला आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनला खूप खूप धन्यवाद..!
-सुग्रीव मुंडे
आदर्श व्यक्तिमत्त्व व आत्मभान यांची जाणीव
-सुग्रीव मुंडे