माझी प्रिय शाळा
मला आवडणारी माझी शाळा आहे. होय ! नक्कीच मूल्यवर्धन ही काळाची गरज आहे. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये तर बदल झालाच, तसाच शाळेतसुद्धा अमूलाग्र बदल झाला. मूल्यवर्धनमधील सहयोगी खेळांमुळे मुलांना खूपच आनंद होतो. मुले रोज काहीतरी नवीन शोधायला लागली. खरोखरच आमची शाळाच बदलली.
मूल्यवर्धनमुळे माझ्या शाळेत अनेक बदल झाले हे सांगताना मला फार आनंद होत आहे. शाळेतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे शिस्त आहे. मुले ज्या गोष्टी सांगून ऐकत नव्हती, त्या गोष्टी आता स्वत:च्या मनानेच करायला लागली आहेत. शाळेत आल्यावर ते विचारतात, “सर आज खेळ कधी घेणार?”
आमच्या शाळेतील विद्यार्थी शिस्तप्रिय झाले आहेत. म्हणून म्हणतो, “माझी प्रिय शाळा.” मूल्यवर्धन कार्यक्रमाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. तसे पाहिले तर मूल्यवर्धन हा विषय, सर्व विषयांसाठी उपयोगी असाच आहे. मुलांना शाळेविषयी आवड निर्माण करणारा हा विषय आहे. माझ्या शाळेत मुलांमध्ये खूप बदल झालेले जाणवतात. वर्गनियम तयार करून वर्गात लावले तर मुलांमध्ये खूप चांगले बदल दिसून आले. मुलांमध्ये एक वेगळेच नवचैतन्य निर्माण झाले. ती स्वतःहून अनेक कामे करायला लागली. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात खूप बदल दिसून आला. मुले खूप नम्रतेने वागायला लागली. मूल्यवर्धन उपक्रमामुळे त्यांना इतर विषयही समजायला लागले. मूल्यवर्धनमुळे शाळाच बदलली आणि आज मला माझी शाळा प्रिय वाटायला लागली.
-कमलाकर कामले (KAMLAKAR KAMALE)
माझी प्रिय शाळा
-कमलाकर कामले (KAMLAKAR KAMALE)
विद्यार्थी वर्तन बदलले
जि. प. शाळा नागझरी येथील विद्यार्थ्यांमधील काही बदल-
- विद्यार्थी वेळेवर शाळेत हजर राहतात.
- विद्यार्थी नेहमी खरे बोलतात.
- सर्व मुले एकमेकांना मदत करतात.
- विद्यार्थी एकमेकांची काळजी घेतात.
- शालेय वातावरण खूप चांगले झाले आहे.
- विद्यार्थी संयमाने वागतात. गोंधळ घालत नाहीत.
- प्राणी, वनस्पती यांची विद्यार्थी खूप काळजी घेतात.
- मूल्यवर्धन खूप चांगला कार्यक्रम आहे.
-बाळासाहेब कटले (BALASAHEB KATALE)
विद्यार्थी वर्तन बदलले
-बाळासाहेब कटले (BALASAHEB KATALE)
मूल्ये आहेत अमूल्य
सुसंस्कारीत व आदर्श भावी पिढी हा प्रत्येक राष्ट्राचा अमूल्य ठेवा असतो. आदर्श संस्कृतीचे जतन, संवर्धन व रक्षण ही प्रत्येक देशवासीयाची जबाबदारी आहे. मात्र आपल्याकडे पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करताकरता दिवसेंदिवस अंधानुकरण होत गेले व त्याचे दुष्परिणाम भविष्यात नव्हे तर वर्तमानातच दिसू लागले. त्यामुळे मूल्यांची रूजवणूक जी नकळतपणे पूर्वी केली जात होती, ती जाणीवपूर्वक व नियोजनबद्धरितीने करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने काळाची गरज ओळखून सुसंस्कारीत व आदर्श पिढी घडविण्यासाठी उचललेले पाऊल हे निश्चितच कौतुकास्पद आहे. तन, मन, धन झोकून महाराष्ट्रातील शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबवून त्यांनी संस्कृती रक्षणाचा मोठा आदर्श निर्माण केला आहे. एक प्राथमिक शिक्षक या नात्याने शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या आवाहनाला माझाही सकारात्मक प्रतिसाद आहेच.
वेळेवर शाळेत येतात : मूल्यवर्धन उपक्रम घेत असताना त्यामध्ये असणारी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये चांगल्याप्रकारे रुजली आहेत. मुले शिस्तीचे पालन करताना दिसून येत आहे. सर्व मुले शाळेमध्ये वेळेवर व शाळेच्या गणवेशात नियमितपणे येऊ लागली आहेत.
मुलांच्या भाषेत व वर्तनात झालेले बदल : शाळेतील मुले विविध समाजातील तांड्यावरील असून मूल्यवर्धन कार्यक्रम राबविल्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये योग्य असा बदल दिसून आला. मूल्यवर्धन हा कार्यक्रम यापुढेसुद्धा राबविणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्यामुळे सर्व मुलांना याचा फायदा होईल.
-श्री. तांबोळी अब्दुलहमीद याकुब (जि. प. प्रा. शा. नागरगोजेवस्ती, केंद्र-मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड)
मूल्ये आहेत अमूल्य
-श्री. तांबोळी अब्दुलहमीद याकुब (जि. प. प्रा. शा. नागरगोजेवस्ती, केंद्र-मातकुळी, ता. आष्टी, जि. बीड)
अनुभव कथन
शाळा म्हणजे समाजाने आपल्या विकासासाठी निर्माण केलेले एक संस्कार केंद्र आहे. उद्याचा भारत याच शाळांमधून घडत आहे. बालमनावर केले जाणारे संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात. आजचा विद्यार्थी हा पुढील काळात आदर्श व चारित्र्यसंपन्न नागरिक व्हावा यासाठी जाणीवपूर्वक व नियोजनबद्धरितीने शालेय शिक्षणासोबतच मूल्यांची रूजवणूक करणे अत्यावश्यक झालेले आहे. एवढेच नव्हे तर ती काळाची गरज होऊन बसली आहे.
आपण समाजाचे काही देणे लागतो, या उदात्त हेतूने शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने राष्ट्रउभारणीच्या या बहुमूल्य कार्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे. देशाचे भावी आधारस्तंभ निर्माण करणारे शिल्पकार म्हणजे गुरूजन. अशा प्राथमिक शिक्षकांसोबत अत्यंत नियोजनपूर्वक शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे सहकारी मूल्यवर्धनचे काम जबाबदारीने करताना दिसून येत आहेत. माझ्या शाळेत मूल्यवर्धनचे उपक्रमशील शिक्षक श्री. वैभव पठाडे सर व श्री. सचिन भैसडै सर यांनी देशभक्तीपर गीते, कागदकाम, चित्रकला, कवितागायन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी, रंगभरण, गाणी, गोष्टी, साहित्य निर्मिती, वर्गनियम, खेळ इत्यादी बहुमूल्य उपक्रमांतून विद्यार्थ्यांना खूप आनंद मिळवून दिला.
बालस्नेही, आनंददायी व विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीच्या वापरामुळे मुले सरांच्या तासाला आनंदून जात. शिक्षकांच्या मेहनतीचे चांगले परिणाम दिसू लागले. विद्यार्थी स्वतः उत्साहाने विविध उपक्रमांमध्ये भाग घेऊ लागले. अभ्यासात मुलांची रूची वाढू लागली. सोबत वर्गस्वच्छता, मोठ्यांचा आदर, नम्रता, शिस्त असे अनेक चांगले बदल दिसू लागले. वर्गातील विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण वाढू लागले. विद्यार्थ्यांची अभ्यासातील रूची वाढू लागली. शिक्षणप्रक्रियेतून स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय ही लोकशाहीतील तत्त्वे जोपासणारा चारित्र्यसंपन्न नागरिक निर्माण व्हावा ही अपेक्षा असते.
सद्य:स्थितीत शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. त्यांनी लावलेल्या रोपट्याला चांगली फळे आलेली दिसून येतील. बालमनावर केल्या जाणाऱ्या सुसंस्कारामुळे वाईटापासून मुलांचे रक्षण होईल. मूल्यवर्धनच्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीने सुसंस्कारीत भावी पिढी निर्माण होईल हा विश्वास वाटतो. शांतिलाल मुथ्था फाउंडेशननेच्या संकल्पपूर्तीस व भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा.
-शअब्दुलहमीद तांबोळी
अनुभव कथन
-शअब्दुलहमीद तांबोळी
प्रेमाने बदल झाला
मूल्यवर्धनच्या आयोजनामुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल पाहावयास मिळाला. पुस्तिकेतून हसतखेळत मूल्यशिक्षण रुजवण्यावर भर देण्यात आला. मूल्यवर्धन तासिकांचा परिणाम मुलांच्या चांगल्या व वाईट गोष्टींवर होऊन ते प्रेमाने वागू लागले.
जि. प. वाहिरा शाळेत मूल्यवर्धनच्या तासिकांमधून मुलांच्या कला-गुणांबरोबरच स्वच्छता, आरोग्य, वक्तशीरपणा, स्वावलंबन, आपल्या शेजाऱ्यांशी कसे वागावे, संकटात मदतीला कोण लवकर येते, शेजारधर्म या संकल्पना मुलांच्या लक्षात येऊ लागल्या. आपल्या कुटुंबातील लोक आपल्यावर किती प्रेम करतात यांची जाणीव मुलांना होऊ लागली.
पैशापेक्षाही कलाकौशल्य महत्त्वाचे असते. घरातील सर्वांनी प्रेम केल्यामुळे सचिन तेंडूलकर महान झाला. सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले.
कोणते गुण आपल्यामध्ये उपजत आहेत याचा शोध मुले स्वतः घेण्याचा प्रयत्न करू लागली. घरात, घराबाहेर आपल्याला कोणकोण मदत करतात यांची जाणीव मुलांना होऊ लागली. आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो याचाही विचार ते करू लागले. कसे वागावे, कसे वागू नये याबाबत निरीक्षणातून जाणीवजागृती होऊ लागली.
एखादया लहान चुकीमुळेही मोठा अपघात होऊ शकतो, याची कल्पना मुलांना आली. खेळ रस्त्याच्या कडेला न खेळता मैदानात खेळावे हे ते समजू लागले. निसर्गावर प्रेम केले पाहिजे, झाडी, वेली, फळे, फुले यांचे आपल्या जीवनातील महत्त्व मुलांना समजू लागले. निसर्गाबद्दलचे प्रेम त्यातून व्यक्त होते. पुरातन किल्ले, त्यांचे महत्त्व, त्यांची निगा, स्वच्छता, संवर्धन, ऐतिहासिक वस्तूंची गरज याबाबतची जाणीव मुलांमध्ये होऊ लागली. अचानक येणाऱ्या संकटांना कसे तोंड दयावे याबाबत मुलांमध्ये उत्सुकता आहे. आपण कोणाशी संगत करावी याबाबतचे ज्ञान मूल्यवर्धन तासिकेतून मिळते.
-सतिश काळे
प्रेमाने बदल झाला
-सतिश काळे
मूल्यवर्धन आणि विद्यार्थी
मूल्यवर्धनचे अनेक फायदे मुलांना झाल्याचे दिसून येतात. स्वयंशिस्त मोठ्या प्रमाणात वाढीस लागत आहे. मुलांच्या दैनंदिनीत खूप बदल होत आहेत. मूल्यवर्धन पुस्तिकांच्या वापरामुळे मुले खूप आनंदी व उत्साही बनली आहेत. एकमेकांबद्दल सहकार्याची भावना वाढीस लागली आहे. इतर मुलांनाही योग्य ती मदत करतात.
मूल्यवर्धन पुस्तिकांच्या वापरामुळे मुले खूप आनंदी व उत्साही बनली आहेत. एकमेकांबद्दल सहकार्याची भावना वाढीस लागली आहे. इतर मुलांना योग्य ती मदत करतात. तसेच शाळेतील वातावरण आनंदी बनले आहे. मुलांमध्ये वक्तशीरपणा वाढीस लागला आहे. जी मुले खोड्या करत होती, त्यांच्यामध्ये आता बराच बदल झाला आहे.
-उत्तरेश्वर खाडे
मूल्यवर्धन आणि विद्यार्थी
-उत्तरेश्वर खाडे
मूल्यवर्धन : मूल्यशिक्षणाची संजीवनी
आजच्या संगणकाच्या युगात तंत्रज्ञानाची रेलचेल असताना, मूल्यांचा ऱ्हास होतानाचे चित्र विविध प्रसंगातून वारंवार नजरेसमोर येत आहे. ज्या प्रसंगाची कल्पना करणे अशक्य होते, अशा अशक्यप्राय भयावह कल्पना वास्तवात उतरत आहेत. समाजात अराजकतेचे भीषण वास्तव समोर येत आहे. अशावेळी आपल्या मुलांचे भविष्य आपल्या हातात आहे. ते संस्कारक्षम बनवण्यासाठी स्वत: विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाज यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावयास हवेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य तथा शांतिलाल मुथ्था फाउंडेशन मार्फत राबवण्यात येत असलेला मूल्यवर्धन कार्यक्रम मूल्यशिक्षणाची संजीवनी ठरत आहे.
मी कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही एकविसाव्या शतकाचे वारे अर्थातच फिरलेलेच होते. त्यात ज्ञानार्जनासाठी आलेली पिढी अपवाद कशी ठरेल? आर्थिक सुबत्तेमुळे पालक मुलांना आवश्यक गरजांपेक्षा जास्तीचा पुरवठा करत आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे महत्त्व विद्यार्थ्यांना मुळीच पटत नव्हते. हट्टी स्वभाव, अहंभाव, तऱ्हेवाईकपणा, स्वार्थी स्वभाव, एकमेकांप्रती अनादर, कामचुकारपणा, खोटं बोलणं, दुसऱ्याच्या आवडत्या वस्तू लपवून ठेवणं अशा नानाविध कृती विद्यार्थ्यांच्या वागण्यातून निदर्शनात येत होत्या. याची अनेक कारणे आहेत. मुळात पालकातच मूल्यांचा ऱ्हास असणं, टी.व्ही.चा अतिवापर, त्यातही मूल्यधिष्ठीत शिक्षण कमीच.
मला ‘मूल्यवर्धक प्रेरक’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मला भेडसावणाऱ्या विद्यार्थी समस्येवरची उत्तरे हळूहळू मूल्यवर्धनमधून मिळू लागली. मूल्यवर्धनचे छोटेछोटे उपक्रम विद्यार्थ्यांच्या चांगलेच स्मरणात राहिलेत. कार्यक्रमाची कार्यप्रणालीही अतिशय परिणामकारक असून त्यातून मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांच्या अंतर्मनापर्यंत पोहचत आहे. विद्यार्थ्यांच्या वागण्यात सकारात्मकता दिसून येत आहे. उमक्रमांच्या अंमलबजावणीने विद्यार्थ्यांत बंधुता, न्याय, समता आणि वक्तशीरपणा अशी अनेक वैयक्तिक आणि सामाजिक मूल्यांचा अर्थ आणि वापर विद्यार्थी वर्तनातून दिसत आहे.
आज वर्गातील मुले वर्गनियमांचे पालन करतात, दुसऱ्यांनाही करायला लावतात. त्यामुळे एकप्रकारची शिस्तबद्धता आली आहे. विद्यार्थी गटचर्चा करतात. दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेतात. यातून त्यांचे संवाद कौशल्य विकसित झाले आहे. विद्यार्थ्यांमधील रागाचे प्रमाण कमी झाले आहे. राग किती भयानक असतो, हे चौथीचा चैतन्य दुसरीच्या श्रावणीला समजावून सांगत होता. मग त्याने तिला राजाची गोष्ट सांगितली. रागाचे दुष्परिणामही सांगितले. राग क्षणिक असतो, नातेसंबंध हे विश्वासाने आणि प्रेमाने जपायला हवेत हे आता श्रावणी समजू लागली. अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींतून विद्यार्थ्यांच्या वर्तनातून बदल दिसत आहे. म्हणूनच मूल्यवर्धन ही मूल्यशिक्षणाची संजीवनीच आहे असे वाटते.
– पूनम माने
मूल्यवर्धन : मूल्यशिक्षणाची संजीवनी
– पूनम माने
मूल्यवर्धन प्रशिक्षण
मूल्यवर्धन हे खूप गरजेचे आहे.
मूल्यवर्धन प्रशिक्षण सलग तीन दिवस दिनांक 23/09/2019 ते दिनांक 25/09/2019 या कालावधीत मौजे मातोरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पार पडले. प्रशिक्षण सर्वांनी खूप आनंदाने पूर्ण केले. सर्व शिक्षक कृती करत आपला सहभाग नोंदवून प्रशिक्षण घेत होते. हे मूल्यवर्धन प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देताना उपयोगी पडेल यात काहीच शंका नाही. मुलांची सर्वांगीण प्रगती करण्यासाठी मूल्यांची रूजवणूक होणे गरजेचे आहे.
-रामदास पाखरे
मूल्यवर्धन प्रशिक्षण
-रामदास पाखरे
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
मूल्यवर्धन पुस्तकांच्या वापरामुळे मुले खूप आनंदी व उत्साही बनली आहेत. एकमेकांबद्दल सहकार्याची भावना वाढीस लागली आहे. इतर मुलांना योग्य ती मदत करत असतात. शाळेचे वातावरण आनंदी बनले आहे. मुलांमध्ये वक्तशीरपणा आला आहे. जी मुले खोडकर आहेत त्यांच्यामध्ये बराच बदल झाला आहे. वर्गात असणाऱ्या प्रत्येक मुलाला समतेची वागणूक मिळत आहे.
एकमेकांबद्दल सहकार्याची भावना वाढीस लागली आहे. दुसऱ्या मुलांना योग्य ती मदत करत असतात तसेच येथील वातावरण आनंदी बनले आहे. मुलांमध्ये वक्तशीरपणा आला आहे. जी मुले खोडकर आहेत त्यांच्यामध्ये बराच बदल झाला आहे.
-सोनाली कल्याणी
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह
-सोनाली कल्याणी