मूल्यवर्धनमधून मूल्यांची रूजवणूक
मुलांसोबत मूल्यवर्धन उपक्रम राबवित असतानाचे अनुभव
मूल्यांची रूजवणूक : मागच्या वर्षी मी पं. स. बल्लारपूर येथे बदलून आले. शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच जुलै महिन्यात मूल्यवर्धनचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण झाले. पूर्वीचा क्षमताधिष्ठित अभ्यासक्रम, कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आणि आताचा अध्ययन निष्पत्तींवर आधारित अभ्यासक्रम या सर्वांची परस्पर सांगड घालणारा व एकमेकांशी समन्वय साधणारा कार्यक्रम म्हणजे मूल्यवर्धन असे मला वाटते. पाठ्यपुस्तकाला पूरक असे वाचन, लेखन, चित्रकला, अभिव्यक्त होण्यास वाव असलेली कार्यपुस्तिका, त्यात मुलांना आवडतील अशा गोष्टी, सुंदर चित्रे, त्यातील अध्ययन अनुभव, त्यामुळे ते मुलांना खूपच आवडले.
आपल्या दैनंदिन अभ्यासक्रमातील धडयांशी सांगड घालून आपल्या प्रत्येक विषयाशी सांगड घालून हा कार्यक्रम मागच्या वर्षापासून मी राबवित आहे. मूल्यवर्धन उपक्रमात स्वतःपासून सुरुवात करून जगाशी ओळख करायची आहे. मागच्या वर्षी माझ्याकडे तिसराचा वर्ग होता. मुले, मुली एकमेकांशी मिसळून खेळत नव्हती. गोलाकार उभे केले तर मुली, मुले एकमेकांचा हात धरून उभी राहायला तयार नव्हती. पण मूल्यवर्धन उपक्रमांमुळे ती एकमेकांत मिसळू लागली. मुलगा-मुलगी असा लिंगभेद खेळताना राहिला नाही.
वर्गनियम बनविताना मुलगा-मुलगी मिळून खेळायचे, असा नियम त्यांनीच बनविला. एकदा वर्गातील मुलींना भागाकाराची क्रिया लवकर समजली. मुले थोडी मागे पडली, तेव्हा सहयोगी अध्यापन पद्धतीने त्यांनी एकमेकांना भागाकाराची क्रिया समजावून सांगितली. मोठ्यांचा आदर, वर्ग स्वच्छता, पाण्याची बचत, स्वावलंबन , श्रमप्रतिष्ठा, सर्वसमावेशीत शिक्षण, वृक्षारोपण व वृक्षसंगोपन इ. व्यक्तिमत्त्व विकास करणारे गुण त्यांच्या कृतीतून दैनंदिन व्यवहारात दिसून येतात. उदा. शाळेतील नळाचे पाणी ते उगीच वाया घालत नाहीत. आपल्या बॉटलमधील पाणी घरी जाताना बागेतील झाडाला घालतात. वर्गातील साहित्य नीटनेटके ठेवतात. मुले स्वतः नीटनेटके राहतात.
माझ्या वर्गात नितीन गोंधळी हा दिव्यांग मुलगा आहे. तो आधी शाळेत गैरहजर रहायचा. त्याला वर्गातील इतर मुले मिसळून घेत नव्हती. पण माझ्याकडे वर्ग आल्यावर मूल्यवर्धन उपक्रमांमुळे, सहयोगी खेळ, जोडी पद्धतीने अध्ययन यामुळे त्यांच्यात कमालीचा बदल झालेला आहे. आता नितिन माझ्या प्रत्येक प्रश्नाला प्रतिसाद देतो. त्याचे वर्गमित्र त्याला सोबत खेळायला घेतात. त्याला व्यवस्थित जेवायला मदत करतात. त्याला चिडवित नाहीत. प्रसंगी त्याने खोडी केली तरी समजून घेतात. म्हणजे माझ्या मुलांत मनाचा मोठेपणा आला आहे. नितीनमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्याला शाळा आवडू लागली आहे.
मूल्ये राबवायची नाहीत तर रूजवायची असतात. आपण मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून एक नाही तर असंख्य जीवनकौशल्ये हस्तगत करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी लागणारी पात्रता मुलांमध्ये पर्यायाने भारताच्या भावी पिढीमध्ये रूजवित आहोत. मूल्यांचे संवर्धन करीत आहोत, असे मला वाटते.
-प्रितीबाला तुळशीराम रामटेके
मूल्यवर्धनमधून मूल्यांची रूजवणूक
-प्रितीबाला तुळशीराम रामटेके
वर्गव्यवस्थापन
मुलांच्या सहभागाने वर्गव्यवस्थापन
मी विद्यार्थ्यांच्या मदतीने गट तयार करण्यासंबंधाने चर्चेत सहभागी झाले. वर्गात काही समस्या एकमेकांच्या मदतीने मुले सोडवू शकतात. त्यासोबतच परस्परांमध्ये चर्चाही करतात. यात विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रिया घडते. हाच दृष्टिकोन ठेवून वर्गाचे नियम केले तर अध्ययन प्रक्रिया सुलभ व प्रभावी होते.विद्यार्थीसुद्धा जबाबदारी पार पाडण्यात उत्सुक असतात. त्यात त्यांना वेगळे काही केल्याचा आनंदसुद्धा मिळतो. म्हणून समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय ही मूल्ये विकसित होऊ शकतात.
-मंगला अनमुलवार
वर्गव्यवस्थापन
-मंगला अनमुलवार
मूल्यवर्धन
कृतियुक्त असा परिचय देणा-या पुस्तिका समजण्यास सोप्या आणि कृतीतून शिक्षण देणाऱ्या
माझा अनुभव या पुस्तिकेचा फार चांगला होता. खूप काही नवीन वाचायला आणि शिकायला मिळाले. बऱ्याच नवीन गोष्टी अनुभवायला मिळाल्या. मुलांना सोप्या आणि साध्या भाषेत समजावून सांगण्यास या पुस्तिकेची खूप मदत होईल. मुलांना कृतीतून आणि नवीन उपक्रम घेण्यास पण या पुस्तिकेचा खूप फायदा होईल.
-वंदना गोवर्धन
मूल्यवर्धन
-वंदना गोवर्धन
मूल्यवर्धन संकल्पना
विविध उपक्रमांतून मूल्यवर्धन करणे
विविध उपक्रमांतून कृतियुक्त सदरीकरण केल्याने विद्यार्थी छोट्या छोट्या उपक्रमांतून मूल्य शिकतात.
विविध उपक्रमांतून विद्यार्थी मूल्यवर्धन करतील व त्याप्रमाणे कृतियुक्त सादरीकरण करतील. त्यांचा उपयोग करतील. त्याप्रमाणे वागतील. विद्यार्थी वर्गनियम तयार करून त्याप्रमाणे वागतील. विविध छोट्या छोट्या खेळांतून मूल्यवर्धन करतील.
-किशोर ठाक
किशोर ठाक
-दिवाकर पेंडम
भावनिक विकास
भावनिक विकास
• मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होतो.
• मूल्यवर्धन पुस्तकांमुळे विचारांना चालना मिळते.
• मूल्यवर्धन पुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देणारे पाठ समाविष्ट असल्याने विद्यार्थी आवडीने ती हातात घेताना दिसतात. तसेच पाठात समरस होतात. वाचनात मग्न होतात. पाठातील भावनांशी समरस होतात. प्रत्येक पाठात चित्र असल्याने ते पाठ त्यांना आवडतात.
-बंडू नन्नावरे
भावनिक विकास
-बंडू नन्नावरे
आनंदादायी शिक्षण
मूल्यवर्धन कार्यक्रमात छान उपक्रम आहेत. त्यामुळे मुले जास्त वेळ शाळेत रमतात. आनंदादायी गाणी व खेळ या मधून मुले खेळतात व शिकतात.
मूल्यसंवर्धन कार्यक्रमातून मुले चांगल्या प्रकारे शिक्षण घेतात, असा अनुभव येतो. मुलांना खेळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट होतात. सहकार्य, शिस्त असे वेगवेगळे गुण मुलांमध्ये रूजविले जातात.
-बाळू टिपले
आनंदादायी शिक्षण
-बाळू टिपले
मूल्यवर्धन पुस्तिका
आशयाची विभागणी, विविध वर्गवार उपक्रम, मूल्यांची गरज, अध्यापन पद्धती
विद्यार्थ्यांच्या वर्तनात योग्य तो बदल होतो. शांतता संकेताचा उपयोग, शालेय अंमलबजावणी, साहित्याचा वापर आणि सुरक्षितता, विद्यार्थ्यांना आनंद, प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळते. .
-संगीता घोडे
मूल्यवर्धन पुस्तिका
-संगीता घोडे
शांतता संकेत
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या मूल्यांची जपणूक करण्यासाठी विद्यार्थी शाळेत विविध प्रकारचे खेळ खेळतात.
1) न्याय – उदाहरण, हत्ती, मासा, कुत्रा, पक्षी यांपैकी झाडावर कोण आधी चढणार? अशाप्रकारे स्पर्धा लावल्यास सर्वांसोबत योग्य न्याय होणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांची कुवत व क्षमता लक्षात घेऊन त्यात योग्य तो बदल करण्याची जबाबदारी स्वीकारून स्वतः शिक्षकाने तसे उपक्रम यशस्वी राबवावेत.
2) स्वातंत्र्य – शाळेत शिकत असताना मुलांनी स्वातंत्र्य हा दृष्टिकोन वृद्धींगत करण्यासाठी सर्व प्रकारच्या भूमिका, मत व्यक्त केल्याने, मतांचा आदर केला जात आहे.
-गजानन पाचभाई
शांतता संकेत
-गजानन पाचभाई
विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे महत्त्वाचे आहे.
शालेय शिक्षणात आणि त्यातही खास करुन प्राथमिक स्तरावर मूल्यशिक्षण अतिशय महत्त्वाचे आहे. कारण आपल्या देशाचा नागरिक हा केवळ शिक्षित होऊन चालणार नाही, तर तो सुसंस्कृत झाला पाहिजे. त्यासाठी अगदी प्राथमिक शिक्षणापासून मूल्यशिक्षण मुलांमध्ये रूजले पाहिजे. या कार्याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरण आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्याद्वारे सुरू करण्यात आलेला मूल्यवर्धन कार्यक्रम खरंच खूपच चांगला वाटला.
सन 2018-19 मध्ये आमच्या जिल्हा परिषद प्रा. शाळा पायली, केंद्र- पद्मापुर पंचायत समिती तथा जिल्हा परिषद चंद्रपूरमधील आम्हा दोन्ही शिक्षकांचे मूल्यवर्धन प्रशिक्षण ऊपरोक्त संस्थेद्वारे झाले. प्रशिक्षणांतर्गत माहीत झालेल्या विविध उपक्रमांचे आयोजन केले. त्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल झाला, असे जाणवले. जसे विविध खेळांतून मी कोण? माझी (घरी व शाळेत) जबाबदारी काय आहे? याची जाणीव निर्माण करता आली. इतरांना मदत करणे, शाळेच्या नियमांचे पालन करणे, स्वयंशिस्त पाळणे, वर्ग व शाळेचे नियम स्वतः तयार करणे व त्यांचे पालन करणे इत्यादी बाबतीत बदल घडून आले. वृक्षारोपण कार्यक्रमासोबत वृक्षांचे आपल्या जीवनातील महत्त्व पटावे याकरिता रक्षाबंधन या सनाच्या औचित्याने वृक्षांना राखी बांधून त्यांच्याप्रति आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.
शाळा ही माझी आहे. तिची साफसफाई, तिचे सुशोभन हे माझेही तेवढेच कर्तव्य आहे, त्याची जाणीव निर्माण व्हावी याकरिता शाळेचे मुख्याध्यापक यांच्या संकल्पनेतून शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी शालेय परिसर सुशोभनाकरीता शालेय संरक्षण भिंत रंगरंगोटी (वाँल पेटिंग) या उपक्रमातून श्रमप्रतिष्ठा हे मूल्य रूजविण्याचा प्रयत्न केला. विविध उपक्रमांतून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव, स्त्री पुरूष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन, संवेदनशिलता, सौजन्यता, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा इत्यादी मूल्ये रूजविण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे.
एकंदरीत महाराष्ट्र विद्या प्राधिकरण आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या मूल्यवर्धन कार्यक्रमाअंतर्गत उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्ये रुजवण्यासाठी खूपच उपयोगी ठरत आहेत.
-अंजलीना हेमंत साळवे
विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती
-अंजलीना हेमंत साळवे
स्वअनुभव
मूल्यवर्धन कार्यक्रमांतून आलेले अनुभव
मूल्यवर्धनात्मक माझी शाळा
मूल्यांची संकल्पना लहानपणापासून माझ्या शिक्षकांनी मला सांगितली आहे. मूल्य म्हणजे काय? त्यांचा समाजासाठी काय उपयोग होतो? मूल्यांचे आपल्या वैयक्तिक जीवनात काय उपयोग आहेत? मूल्य कसे जोपासावे? या सर्व प्रश्नांविषयी माझ्या लहानपणापासून काही ना काही माहिती होती.
जेव्हा मी शिक्षक म्हणून रुजू झालो, तेव्हा मूल्य जोपासण्याचे काम माझ्या विद्यार्थ्यांसाठी करावयाचे होते. अगोदरच्या काळात मूल्ये रुजविणे सोपे होते. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मूल्ये जोपासणे व रुजविणे तेवढेच कठीण झाले आहे. आता याच कार्यास मला शांतिलाल मुथ्था फाउंडेशनची फार मोठी मदत मिळत आहे.
सुरुवातीला जेव्हा माझी केंद्रामधून प्रेरक म्हणून निवड झाली, तेव्हा मी स्वतः मूल्यांशी जुळून प्रशिक्षण घेतले. तेव्हा कळालं की, हे फार महत्त्वाचे आणि काळाला अनुसरूनच आहे. आज मी माझ्या शाळेविषयी मूल्यवर्धनबाबत बोलतो, आपणही एका चांगल्या कार्याचा भाग झालो आहोत याचा मला अभिमान वाटतो. आज माझ्या शाळेतील मुले स्वतःचे नियम स्वतः तयार करतात. तयार केलेले नियम पाळतातही. दाराजवळच्या चपलासुद्धा मूल्यवर्धनमुळे शिस्तीत, एका रांगेत दिसू लागल्या आहेत.
विद्यार्थी- शिक्षक, विद्यार्थी- पालक , विद्यार्थी -विद्यार्थी यांच्यात आपुलकी व आदरभाव व्यक्त होऊ लागला. विद्यार्थी शांतता संकेताचा वापर करू लागलेत. मूल्यवर्धन पुस्तिकेतील वेगवेगळ्या उपक्रमांमुळे चांगला व वाईट यातील भेद त्यांना कळू लागला. आरोग्याविषयी चांगल्या सवयी, चांगले वर्तन इत्यादी बाबी त्यांना कळू लागल्या. आज सर्व बाबींचा विचार करता माझा विद्यार्थी आज खऱ्या अर्थाने मूल्यांचा संवर्धक बनला आहे.
असे म्हणतात की, मूल्ये शिकवली जात नाहीत तर ती रुजवली जातात. ही बाब आज खऱ्या अर्थाने स्पष्ट झाली. मूल्यवर्धन कार्यशाळेतून मला अध्ययन-अध्यापनास अनेक चांगल्या बाबींचा जवळून व प्रात्यक्षिकांद्वारे अनुभव आला. आज वर्गव्यवस्थापन असो की, सहयोगी अध्ययन पद्धती, राज्यघटनेतील मूल्ये असोत की, अध्ययन निष्पत्ती यासर्व बाबी मला एक उत्कृष्ट शिक्षक तथा मार्गदर्शक होण्याकरिता फार महत्त्वाच्या ठरल्या आहेत. या सर्व गोष्टी मूल्यवर्धन कार्यक्रमातून माझ्या अंगी निश्चितच उतरल्या आहेत.
शेवटी एवढेच म्हणेल, जी नैतिक मूल्ये आपल्याला आयुष्यात चांगले जीवन जगण्यासाठी अंगिकारायची आहेत ती शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी राबविलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच पूर्णत्त्वास येईल. एक चांगला समाज घडविण्यास यातून नक्की मदत होईल.
-श्री. पिंकू विलास उपरे
स्वअनुभव
-श्री. पिंकू विलास उपरे