वर्ग व्यवस्थापन
शांतता संकेतामुळे वर्गव्यवस्थापन सोपे होते.
अचानक मला माझ्या शाळेतून दुसऱ्या शाळेत पदस्थापना देण्यात आली. तशी माझी शाळा अत्यंत कमी पटाची. त्यामुळे तिथे वर्गनियंत्रण करणे फार कठीण काम नाही. पण अचानक मोठ्या पटाच्या शाळेत मुलांना कसं शांत करायचं ? या विचारातच वर्गात गेलो. मुलांची आपापसात कुजबुज चालूच होती. मी विचारलं, “काय चाललंय?’’ परंतु शेवटच्या विद्यार्थ्यांचा मला पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. हे पाहून अचानक समोरचा एक मुलगा पटकन उभा राहिला आणि त्याने आपला उजवा हात वर केला. काय जादू सर्व मुलांनी हात वर केला. वर्ग एकदम शांत झाला.
ही जादू होती ती शांतता संकेतांची. त्याच वेळी वाटलं की मूल्यवर्धन कार्यक्रम हा आम्हा शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाचा व उपयुक्त असा आहे, यात कुठलीही शंका नाही. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाने मूल्यवर्धनच्या माध्यमातून वर्गव्यवस्थापनाचे मोलाचे हत्यार शिक्षकांना भेट दिलेले आहे. याचा फायदा शिक्षकांना नक्कीच मिळतो आहे.
-श्री. अमरदीप ऋषी भुरले
वर्ग व्यवस्थापन
-श्री. अमरदीप ऋषी भुरले ले
वर्गप्रमुख
एका विद्यार्थ्याला वर्गप्रमुख करणे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा अमिर्झा हा चौथीमधील एक विद्यार्थी. तो अतिशय खोडकर वृत्तीचा होता. त्याला प्रेमाने समजावून सांगितले. चांगल्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि आपल्या वर्गातील मित्र मैत्रिणीसोबत आदराने आणि प्रेमाने वागायचं, त्यांच्यासोबत भांडण-तंटे करायचे नाही, असं समजावून सांगितलं. त्यानंतर त्याला वर्गातील काही जबाबदाऱ्या सोपविल्या. वर्गाचा प्रमुख केले. त्यामुळे सरांनी आपल्याला काहीतरी जबाबदारी दिलेली आहे, हे तो समजून घेऊ लागला. तो वर्गामध्ये नियंत्रण ठेवू लागला. वर्गावर नियंत्रण ठेवता ठेवता शाळेतील विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवू लागला व स्वतः मध्ये हळूहळू बदल दिसून येऊ लागला. बदल असा की तो जितका खोडकरपणा करायचा, त्याच्या त्या खोड्या हळूहळू कमी होऊ लागल्या. हा जो बदल आहे, तो मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे, असं मला जाणवते.
-सचिन कापकर
वर्गप्रमुख
-सचिन कापकर
माझी शाळा मूल्यवर्धन शाळा
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व, सामाजिक, शारीरिक विकासासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम व यातील उपक्रम उपयुक्त असून शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेला हा कार्यक्रम उपयुक्त ठरत आहे.
मागील वर्षी स्थानांतर होऊन नवीन शाळेत रुजू झालेला मी मूल्यवर्धन कार्यक्रमासाठी फक्त नावापुरता परिचित होतो. प्रत्यक्ष शाळेत रुजू होण्यापूर्वी मा. केंद्रप्रमुख व गावकऱ्यांच्या बोलण्यातून शाळेची प्रतिमा स्पष्ट झाली. गडचिरोली जिल्ह्यातील मूल्यवर्धन कार्यक्रम राबवणारी व सध्या मूल्यवर्धनची पायलट शाळा असलेली माझी शाळा जि. प. प्राथ. शाळा खोरदा येथे शाळेच्या पहिल्या दिवशीच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेची प्रचिती देत होती. विद्यार्थ्यांमधील अमुलाग्र बदल वाखाणण्यासारखा होता. वर्गाचे नियम काटेकोरपणे पाळणारे विद्यार्थी जुते, चप्पल घालून वर्गात आलेल्या कोणालाही बाहेर काढायला सांगत होते. शिक्षकांच्या अनुपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांप्रमाणे प्रेमाने सांभाळणारी वरच्या वर्गातील विद्यार्थिनी, वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना ताई आणि भाऊ बोलणारे विद्यार्थी, वर्ग, शाळा व शालेय परिसर स्वच्छतेत स्वतःहून सहभाग सर्वच मनाला दिलासा देणारे होते.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बदल हा केवळ शाळेपुरताच मर्यादित नसून घरच्या दैनंदिन व्यवहारातही ते त्याचप्रमाणे वागत असल्याचे दिसत होते. खर्रा, गुटखा न खाणे किंवा कोणालाही पान टपरीवर न जाऊ देणे असो की, पालकांना दारू, खर्रा, गुटखा यासाठी मनाई करणे असो किंवा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी सहाध्यायी अध्यापन पद्धती असो, प्रत्येक बाबतीत विद्यार्थी आजही त्याचा अवलंब करीत आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम व हा कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला ते तळोधी केंद्राचे केंद्रप्रमुख तथा शाळेचे शिक्षक यांचे करावे तेवढे कौतुक कमीच.
-राजू सोनटक्के
माझी शाळा मूल्यवर्धन शाळा
-राजू सोनटक्के
मी आणि मूल्यवर्धन
सन 2018 -19 या शैक्षणिक सत्रापासून सुरू झालेल्या मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांत व शाळेत झालेले सकारात्मक बदल
प्रथमतः मी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन तथा महाराष्ट्र शासन यांचे आभार मानतो की, आम्ही घडवीत असलेल्या भावी सुजाण नागरिकांसाठी सकारात्मक बदल व्हावे यासाठी मूल्यवर्धन सारखा प्रभावी आणि वेळापत्रकावर कुठलाही ताण न देता जि. प. शाळांमध्ये राबवित आहे. मूल्यवर्धनच्या अगोदर आमच्या शाळेत मूल्यशिक्षण आम्ही घेत होतो. परंतु पाहिजे तेवढा बदल तथा शिस्त नव्हती. एकंदरीत मूल्यवर्धनच्या पूर्वी माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल घडविण्याचे प्रयत्न अपुरे पडत होते.
मूल्यवर्धनातील उपक्रमातून विद्यार्थी लोकशाही पद्धतीने वर्गनियम तथा शाळेचे नियम बनवून ते पालन करण्याची जबाबदारीसुद्धा त्यांचीच असल्याने शाळेला शिस्त लागली. शांतता संकेत शिक्षकांवरील ताण कमी करण्याचा रामबाण उपाय ठरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागून विद्यार्थी शांतता संकेताचा वापर करीत आहेत. मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल होताना दिसून येत आहेत. काही वाईट सवयी होत्या, त्या कमी होताना दिसून येत आहे. मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही पालक सभा घेऊन मूल्यवर्धन कार्यक्रमाची पार्श्वभूमी तथा या उपक्रमाचे फायदे त्यांना सांगितले, तेव्हा पालकसुद्धा यामध्ये सहभाग घेऊन पालक सभेत आढावा घेत असतात.
-पुंडलिक देशमुख
मी आणि मूल्यवर्धन
-पुंडलिक देशमुख
भविष्यातील एक आदर्श शाळा
सद्यस्थितीत मानवाच्या जीवन जगण्याच्या शैलीत खूप मोठी स्वार्थी, लोभी व अडाणीपणाची भावना निर्माण झाली आहे. यामुळे आज अराजकता व बेबंदशाही माजली आहे. या अपराधिक गोष्टी नष्ट करण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठीचे एकमेव ठिकाण म्हणजे शाळा. भविष्यातील सर्व जबाबदार नागरिक याच ठिकाणी घडू शकतात. चला तर मग एक आदर्श शाळा घडवूया.
गत शैक्षणिक सत्रामध्ये माझ्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रमाची उत्साही सुरूवात केली. मूल्यवर्धनातील विविध प्रकारच्या संकल्पनांची इत्यंभूत माहिती प्रशिक्षणातून मिळाली. त्यांचा प्रत्यक्षात प्रभावी वापर केला. मूल्यवर्धनातील जी नवीन तंत्रे आहेत, त्यांचा शाळेत चांगला उपयोग करून शाळेचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यात आले. शालेय परिपाठात सुध्दा मूल्यवर्धनातील मूल्यांची जाणीव दररोज त्यातील वेगवेगळ्या घटकांतून करण्यात येते.
शालेय पाठ्यक्रम शिकवताना सहयोगी अध्ययन पध्दतीचा अवलंब केला जातो. प्रत्येक वर्गाचे वर्गनियम विद्यार्थ्यांच्या सहभागातून बनवले गेले असल्याने नियमांचे पालन होऊन मुलांमध्ये एक चांगली स्वयंशिस्त रूजली. मुले जबाबदारीने वर्तणुक करू लागली. मुले कठीण प्रसंगी चांगले काय नि वाईट काय याबाबत विचार करू लागली.
शांतता संकेत शाळेत चांगल्या प्रकारे वापरण्यात येतो. एखाद्या कार्यक्रमात, परिपाठात, चर्चेत त्याचा वापर होऊ लागला. यामुळे नियंत्रण किंवा वर्गनियंत्रण करणे शक्य झाले. जोडीचर्चा, गटचर्चा, सामुदायिक वर्तुळ यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला सर्व कृतीत सहभागी होण्याची वारंवार संधी मिळाली. मुले आपली मते, विचार, भावना मनमोकळेपणे व्यक्त करू लागली. मुलांमध्ये आता मात्र कोणत्याही प्रकारची भीती राहिली नाही.
शाळेचे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम हे आता सुत्रबध्द होऊ लागले. अशा प्रकारच्या कार्यक्रमात पालकांना मूल्यवर्धन उपक्रमांची माहिती देण्यात येऊ लागली. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे शाळेचे योग्य व्यवस्थापन करणे, सहयोगी अध्ययन पध्दतीचा अध्यापनात वापर व शिक्षकांमध्ये आवश्यक कौशल्ये व तंत्रे वापरण्याची एक वेगळी क्षमता निर्माण झाली. एकंदरीत गावात शाळेत चाललेल्या या मूल्यवर्धन कार्यक्रमाची ओळख मुलांकडून होऊ लागली व त्यामुळे पालकांना शाळेविषयी आपुलकी वाटू लागली.
-गणेश चौधरी
भविष्यातील एक आदर्श शाळा
-गणेश चौधरी
बदल भावी पिढीचा
मला आनंद होतो की, मी पण मूल्यवर्धनचा एक भाग आहे.
मी मूल्यवर्धन प्रकल्पाशी निगडित सर्व मान्यवरांना सर्व प्रथम वंदन करतो. विशेष करुन शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक, सर्व कर्मचारी तथा प्रत्यक्ष अंमलात आणणारे सर्व गट समन्वयक, सर्व प्रेरक तथा प्राथमिक शिक्षक यांना माझे कोटी कोटी प्रणाम.
शांतिलाल फाउंडेशनच्या विचारांचा मी आदर करतो आणि आदर्श मानतो. देशाच्या भावी पिढीमध्ये संविधानाची मूल्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण आज समाजामध्ये अंधाधुंदी सुरु आहे.
आम्ही बहुवर्ग अध्यापन पद्धती स्वीकारली आहे. आम्हांला वर्गनियंत्रण करायला कठीण जात होते. आता मूल्यवर्धनमुळे सोपे जाते. मुलांमध्ये अमूल्य परिवर्तन सुरु झालेले आहे. मुले स्वत: होऊन आई, वडिलांना घर कामात मदत करू लागले. शाळेत येण्यापुर्वी मोठ्या मंडळींना प्रणाम करुन शाळेत येत आहेत.
एका विद्यार्थिनीने कमालच केली. तिने खाऊचे पैसे जमा करुन आजीला चश्मा तयार करुन दिला. आपला लहान भाऊ, बहिणींची काळजी घेऊ लागले. पाळीव प्राण्यांची काळजी घेऊ लागले. मुलांमध्ये स्व:जाणीवेची भावना निर्माण होत आहे. आम्ही जर मुलांमध्ये संविधानिक मूल्ये यशस्वीपणे रुजवू शकलो, तरच या देशाची भावी पिढी सुजाण नागरिक होईल.
-मंगल बिस्वास
बदल भावी पिढीचा
-मंगल बिस्वास
मूल्यवर्धन
मी आणि मूल्यवर्धन या विषयी माझे मत.
सन 2018-19 मध्ये मूल्यवर्धन नावाचे अनमोल साधन माझ्या हाती मिळाले. मी माझ्यात बदल करीत माझ्या इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांमध्ये बदल होताना पहिले.
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे माझ्या वैयक्तिक व शालेय जीवनात नवीन प्रवाह सुरु झाला. कार्यशाळेतून M. T मार्फत मिळालेले ज्ञान, अध्ययन-अध्यापन साहित्य यातून मला अधिकच बलशाली झाल्याचे दिसून आले. एका नवीन युगाच्या निर्मितीसाठी मी माझी वाटचाल सुरु केली. मूल्यवर्धन कार्यक्रम हा मला मिळालेला जादूचा दिवा आहे असे म्हणालो, तरी वावगे ठरणार नाही.
मूल्यवर्धन कार्यक्रम ज्यावेळेस मी प्रत्यक्ष शाळेत सुरु केला त्यावेळेस माझ्यात झालेला सकारात्मक बदल साक्षी होता. त्याच नवीन आत्मविश्वासाने मी माझ्या कार्याला सकारात्मकदृष्टया सुरुवात केली.
अगदी दोन वर्षे झाली होती मला शाळेत रुजू होऊन. सर्व मुलांना जेमतेम ओळखायला सुरुवात झाली होती. अशातच मला मूल्यवर्धन नावाचे नवीन साधन मिळाले. प्रत्यक्ष उपक्रमाला सुरुवात करतो ना करतो तोच मला नवनवे अनुभव येऊ लागले. वर्गात वर्गनियम, शाळेचे नियम तयार करताना मुलांचा जो उत्साह बघितला, तो अगदी आश्चर्यकारक होता. सगळी मुले उपक्रमात सक्रिय तर झालीच शिवाय दुसऱ्या दिवशी परिपाठामध्येच ‘सर, मी घरचे नियम बनविले’ असा एकच सूर काढला. पुन्हा मला माझा आत्मविश्वास वाढण्यास आशेचा किरण दिसला, तो मुलांमधील बदल व नवचैतन्य बघून.
शांततेचा संकेत मुलांमध्ये बिंबवायला मला फारच कमी कालावधी लागला. मी जरी वर्गात मुलांना वर्गकार्य देऊन दुसऱ्या कामात गुंग असलो, तरी वर्गातील नायक शांतता संकेताचा वापर करू लागला. मुलांचे दिलेले कार्य अगदी सुरळीत पूर्ण होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. आई, वडिलांच्या पाया पडून विद्यार्थी शाळेत येऊ लागले, तेही शाळेच्या मुख्य दरवाज्याला प्रणाम करूनच.
पालक शाळेत येऊन “गुरुजी शाळेत काय सुरु आहे?” असा प्रश्न विचारू लागले. मुलांमध्ये होत असलेला सकारात्मक बदल, स्वयंशिस्त याची पालकच साक्ष देऊ लागले. वर्गातील उपक्रमामुळे सर्वच विद्यार्थी बोलके झाली. मुलांमध्ये आत्मविश्वास वाढताना दिसून येऊ लागला. चिकित्सक व सर्जनशील विचार आणि जबाबदारीची भावनासुद्धा दिसून येत होती. वर्गातील अगदी शेवटच्या मुलाला सन्मान मिळताना मी पहिले. याला काहीच येत नाही असा ठप्पा मिळालेल्या मुलांना इतर मुलांकडून सन्मान मिळू लागला, तो त्याच्यातील सुप्त गुण बाहेर आल्यामुळेच.
एवढा चमत्कार मूल्यवर्धन कार्यक्रमाचाच हे आत्मविश्वासाने सांगताना मला अभिमान वाटतो. शेवटी एवढंच म्हणेन की –
अंधारलेल्या माणसाला काजव्याची साथ,
सुजाण नागरिक घडविण्यास मूल्यवर्धनचा मोलाचा हात.
-प्रविण पतिराम सहारे
मूल्यवर्धन
-प्रविण पतिराम सहारे
मूल्यवर्धन कार्यक्रम
मूल्यवर्धन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय सेवावृत्तीचे मूल्य रुजायला पाहिजे.
शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवून, विद्यार्थ्यांमध्ये जीवनावश्यक मूल्य रुजले पाहिजेत असे उपक्रम नियमित राबविण्यात यावेत आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल. मुलांना शिक्षणाची आवड निर्माण होईल असे उपक्रम राबविले गेले पाहिजेत.
-ईश्वर मोहुर्ले
मूल्यवर्धन कार्यक्रम
-ईश्वर मोहुर्ले
वर्गनियम
दैनंदिन अध्यापन करत असताना वर्गव्यवस्थापन खूप आवश्यक असते. वर्गव्यवस्थापन जर योग्य असेल, तर अध्यापन प्रभावी होते. त्यासाठी वर्गनियम खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
मूल्यवर्धन प्रशिक्षण घेण्यापूर्वी वर्गात नियम होते, पण ते एकतर्फी लादलेले होते. मुलांना ते नियम जाचक वाटत होते. शिक्षक सांगतील ते ऐकायचं अशी मानसिकता होती. त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग नव्हता. ते का पाळायचे याची जाणीव नव्हती. मूल्यवर्धन अंतर्गत नियम तयार केल्यानंतर त्यात मुलांचा सहभाग होता, जबाबदारीची जाणीव होती. स्वतः नियम तयार केल्यामुळे ते पाळण्याची कर्तव्याची जाणीव होती. नियमांची गरज कशासाठी असते? नियम का पाळायचे? नाही पाळले तर काय घडू शकते? नियम पाळण्यात येणाऱ्या अडचणी या सर्वांची मुलांना पुरेपूर जाणीव झाली. मुले स्वतः वर्ग चांगला राहण्यासाठी प्रयत्न करु लागली.
शिक्षिका वर्गात येण्याआधी वर्ग नीटनेटका ठेऊ लागली. टेबलावरती फुलांची सजावट करु लागली. वर्गात सर्व हजर राहतील. यासाठी प्रयत्न करु लागली. शिक्षिका वर्गात नसताना गट करुन स्वयंअध्ययन करु लागली. त्याचे सादरीकरण करायला लागली. एकंदरीत वर्ग विद्यार्थीकेंद्रित झाला.
एक शिक्षिका या नात्याने मुलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला. प्रेमाने जग जिंकता येते ही ऊक्ती खरी वाटायला लागली. मुलांच्या भावविश्वात मिसळायची संधी मिळाली. शाळेतच नव्हे तर समाजात वावरताना देखील एक नवी दृष्टी मिळाली. घरीसुद्धा नियम तयार केले. सर्वांना ही कल्पना आवडली. एकंदरित वर्गनियम फक्त शाळेतच नाही तर घरीसुध्दा कामी आले. पालक शाळेत भेटी देऊन मुलांत झालेला बदल सांगू लागले. अशाच चांगल्या गोष्टीसाठी शुभेच्छा देऊ लागले.
-सुषमा चिंतामण रामटेके
वर्गनियम
-सुषमा चिंतामण रामटेके