संकल्पपूर्ती : मूल्यवर्धन
मूल्यवर्धन उपक्रम विषयक माझे मत व्यक्त करीत आहे.
लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनविण्याचे काम शाळा शाळांतून शिक्षक करीत असतात. आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते सतत विविध उपक्रम घेऊन मुलांमध्ये विविध मूल्ये रुजवित असतातच. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांस योग्य दिशा मिळत आहे.
विद्यार्थी उपक्रम पुस्तिकांमधून आनंददायी वातावरणात मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे चांगले संस्कार विद्यार्थी मनावर घडत आहेत. मनाचा व मूल्यांचा फार जवळचा संबंध आहे. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे मुलांना मूल्यांचे आणि कौशल्यांचे शिक्षण मिळत आहे. घटनात्मक मूल्यांतून विद्यार्थ्यांत चांगले गुण रूजत आहेत.
या उपक्रमांमुळे वर्गात खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थी कृतीतून शिकत आहेत. चर्चेतून व्यक्त होत आहेत. स्वतःचे मत मांडताना मुले बोलती झाली आहेत. स्वयंशिस्त अंगी रुजत आहे. मूल्य संस्कारित बालक शाळाशाळांतून घडत आहे.
अभ्यासाची सांगड घालून विद्यार्थ्यांस विविध संधी या उपक्रमातून उपलब्ध करून दिल्या आहेत.
शांतता संकेत, वर्गनियमांचे पालन मुले करीत आहेत. सहयोगी खेळांमध्ये उत्साहाने भाग घेत आहेत. यामुळे शालेय वातावरणही उत्साही दिसत आहे.
भविष्यात कर्तव्याचे पालन करणारे सुजाण नागरिक आणि स्वतःचा व देशाचा विकास घडवणारे नागरिक आज शाळाशाळांतून तयार होत आहेत. या पुढेही होत राहतील. या सर्वांमध्ये मूल्यवर्धनचा मोठा वाटा असेल. त्यामुळेच मी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे आभार मानते.
-सौ. कविता बांबळे
संकल्पपूर्ती : मूल्यवर्धन
-सौ. कविता बांबळे
मूल्यवर्धन
मी २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले. प्रेरक म्हणून माझ्या केंद्रातील इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व शिक्षकांना मूल्यवर्धनचे प्रशिक्षण दिले.
सुरुवातीला शासनाच्या इतर सर्व प्रशिक्षणांप्रमाणे हेही प्रशिक्षण असेल असे वाटले. मूल्यवर्धनचे हे प्रशिक्षण मात्र इतर प्रशिक्षणांपेक्षा निश्चितच वेगळे होते. या प्रशिक्षणाच्या काही दिवस अगोदर माझी एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे या प्रशिक्षणातून माझे नाव वगळण्यासाठी तालुका समन्वयक आदरणीय रवी राठोड सरांना विनंतीही केली होती. पण राठोड सरांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे मुरगूड येथील ४ दिवसांचे प्रशिक्षण मी आनंदाने पार पाडू शकलो. या प्रशिक्षणातील उपक्रमांतून मला माझे शाळेतील दिवस अनुभवता आले. तसेच या प्रशिक्षणाचा प्रेरक म्हणूनही मला वेगळा अनुभव घेता आला. हा कार्यक्रम शाळेत राबविताना माझ्या पहिलीच्या विद्यार्थ्यांमध्ये मला अमुलाग्र बदल घडविण्याची संधी मिळाली. माझ्या वर्गातील मुलांमध्ये संवेदनशीलता, आदरभाव, सभाधीटपणा, हस्तकौशल्याचा विकास, भाषिक विकास, जाणीवजागृती, समता, बंधुता यासारखी अनेक मूल्ये संस्कारक्षम वयातच रुजण्यास मदत झाली. वर्गातील सर्व मुलांनी पुस्तिकेतील सर्व उपक्रम आनंदाने व सक्रीय सहभाग घेऊन पूर्ण केले. याचा फायदा मला मुलांच्या मूलभूत क्षमता जसे की, वाचन, लेखन, गणितीक्रिया सुधारण्यासाठी झाला. सभोवताली प्रदूषित सामाजिक वातावरण असताना मुलांच्या कोवळ्या मनावर योग्य संस्कारांची रुजवणूक करताना मला या उपक्रमाचा खूप फायदा झाला.
-शरदचंद्र शिवाजी मोरे
मूल्यवर्धन
-शरदचंद्र शिवाजी मोरे
मूल्यवर्धन
मूल्यवर्धन हा खूप छान कार्यक्रम असून यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगले व सकारात्मक बदल घडून आलेले आहेत. मूल्यवर्धन कार्यक्रम राबवित असताना विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यामध्ये संवाद वाढला. विद्यार्थ्यांनीच वर्गनियम केल्यामुळे ते नियम पाळू लागले. नियमित व वेळेत शाळेत येऊ लागले. वर्ग स्वच्छता खूप चांगल्या प्रकारे करू लागले. विद्यार्थी स्वतः स्वच्छ व टापटीपपणे शाळेला येऊ लागले. मूल्यवर्धन उपक्रम वर्गात घेत असताना मुले आनंदी वाटू लागली. इतर विषयांचाही अभ्यास मनापासून आणि आवडीने करू लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढताना दिसून येत आहे. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे जी मुले अबोल, लाजाळू होती, ती वर्गासमोर येऊन आत्मविश्वासाने बोलू लागली. उदाहरणार्थ इयत्ता पहिलीतील विद्यार्थी प्रणित हा खूप घाबरायचा. बोलताना त्याला भीती वाटायची. तोच विद्यार्थी आता स्वतःचे मत आत्मविश्वासाने, धाडसाने सर्वांसमोर मांडू शकतो. वर्गातील सगळेच विद्यार्थी एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने, सहकारीवृत्तीने वागू लागली. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण झाली. शिक्षकांशी मनमोकळेपणाने बोलू लागली. ‘शांतता संकेत’ या उपक्रमामुळे वर्गामध्ये शांतता राहू लागली. गोंधळ करणारी मुले आता या अभ्यासात जास्त रमून जातात. मुलांना देशाविषयी आदर, प्रेम वाटू लागले. विद्यार्थी आपल्या घरामध्ये इतरांशी आदराने वागताना दिसून येतात. पालकांनीही या कार्यक्रमाचे स्वागत केले असून मुलांमध्ये होत असलेले वर्तनबदल शाळेत येऊन सांगत आहेत. पाण्याच्या वापर जपून कसा करावा हे त्यांच्या वर्तनातून दिसून आले. मूल्यवर्धन उपक्रम आवडू लागल्याने वर्गातील उपस्थितीचे प्रमाण वाढले आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यातील आंतरक्रिया वाढल्या आहेत. त्यांच्यामध्ये मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे. विद्यार्थी मूल्यवर्धनचा तास कधी येणार असे शिक्षकांना विचारू लागले. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात बदल झालेले दिसून आले. मुलांमध्ये नेतृत्व गुण वाढीस लागण्यास या कार्यक्रमाचा खूप मोठा फायदा होत आहे. मुले घरामध्ये स्वतःची कामे स्वतः करत आहेत. चांगले, वाईट काय आहे हे समजून घेतात. माझ्या जबाबदाऱ्या कोणत्या हे उपक्रमातून शिकतात. शालेय वस्तूंची काळजी घेताना दिसून येतात. प्राणी, पक्षी, झाडे यांची काळजी कशी घ्यावी, त्यांची निगा कशी राखावी हे बोलण्यातून, वागण्यातून दिसून येत आहे. या उपक्रमांमुळे मुलांना नातेसंबंध कसे जपावे ते समजत आहे. आपल्या गरजा काय आहेत, त्या कशा प्रकारे पूर्ण होतात याचा विचारही करताना दिसतात. घरामध्येसुद्धा पालकांशी मनमोकळेपणाने बोलत आहेत. मूल्यवर्धन उपक्रम राबवित असताना विद्यार्थी प्रतिसाद खूपच छान मिळतो. त्यामुळे हे उपक्रम घेताना मनस्वी आनंद होत आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे शाळेचा दर्जा उंचावला आहे. शाळेतील पटसंख्या वाढण्यास आम्हांला मोलाची मदत होत आहे. या उपक्रमांमुळे मला माझ्या वर्गातील मुलांची गुणवत्ता वाढलेली दिसून येत आहे. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये झालेले सकारात्मक बदलही प्रकर्षाने दिसून येतात. मुले धाडसी व उत्साही दिसून येतात. मला माझ्या वर्गात, शाळेत हा कार्यक्रम राबवून खूप चांगला फायदा होत आहे. मलाही उपक्रम राबवताना आनंद वाटतो. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे खूपखूप धन्यवाद. मूल्यवर्धन उपक्रम आमच्या शाळेत राबवून आमच्या शाळांना नवसंजीवनी दिली आहे.
-सुगंधा सिताराम डामसे
मूल्यवर्धन
-सुगंधा सिताराम डामसे
मूल्यवर्धन व विद्यार्थी
संस्कार ही काळाची गरज आहे. संस्कार निर्मितीची संकल्पना या विषयातून होत आहे. प्रत्यक्ष या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये अपेक्षित वर्तन बदल होत आहेत.
मूल्यवर्धनच्या उपक्रमांतून एक चांगली संस्काराची जडणघडण होत आहे. विद्यार्थ्यांचे घरातील व शाळेतील वर्तनबदल सकारात्मक आहेत. मुले मोठ्या माणसांचा आदर राखतात. शाळेत नियमित उपस्थित असतात. भाषणे, इतर कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात. ही शाळा माझी आहे अशी भावना मुलांमध्ये निर्माण झाली आहे. मुले शालेय मालमत्तेची काळजी घेतात. वैयक्तिक स्वच्छता राखतात, सामूहिक स्वच्छतेमध्ये भाग घेतात. प्रार्थना, श्लोक मनोभावे म्हणतात. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये अपेक्षित वर्तनबदल दिसून येत आहे.
-चोपडे रावसाहेब धोंडीराम
मूल्यवर्धन व विद्यार्थी
-चोपडे रावसाहेब धोंडीराम
मूल्यवर्धन उपक्रमांतून घडले माझे विद्यार्थी
विद्यार्थांना जबाबदार, संवेदनशील, कर्तव्यदक्ष नागरिक घडविण्याची आपल्याला मूल्यवर्धनच्या माध्यमातून संधी आहे. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून सर्व मूल्ये त्यांच्या अंगी रुजविणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना बोलते करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करावे लागतात. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. ते स्वतःचे विचार आत्मविश्वासाने मांडू लागतात. कला, हस्तकला. भूमिका अभिनय यांमधून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला उत्तेजन मिळते. माझ्याकडे इयत्ता पहिलीचा वर्ग होता. इयत्तेनुसार विद्यार्थ्यांच्या अंगी प्रामाणिकपणा, नम्रता हे गुण चांगल्यारितीने रुजले आहेत.
-स्नेहल पाटील
मूल्यवर्धन उपक्रमांतून घडले माझे विद्यार्थी
-स्नेहल पाटील
मूल्यवर्धन व मुलांचा विकास
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनतर्फे राबविला जाणारा हा कार्यक्रम अतिशय प्रभावशाली आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी विकासाला हातभार लागला आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रमामध्ये विद्यार्थी कृतीला चालना मिळाली आहे. विद्यार्थी आवडीने उपक्रमात सहभागी होतात. त्यातील चित्रे काढणे, रंगविणे, कथा वाचणे, ऐकणे आवडते. त्यातील कृती आवडीने करतात. नियम तयार करतात. छंद जोपासतात. मूल्यवर्धन कार्यक्रमातून विद्यार्थ्यांवर संस्कार होतात. विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला आई, वडिलांना वेळ नाही. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण शाळेत संस्कार करू शकतो.
-अरुंधती पाटील
मूल्यवर्धन व मुलांचा विकास
-अरुंधती पाटील
मूल्यवर्धन : भविष्यकाळाची गरज
शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने कोल्हापूर शहरातील सर्व मनपा शाळांसाठी मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यासाठी सर्व शिक्षकांना प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाची प्रत्येक शाळेत अंमलबजावणी सुरू झाली. माझ्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेतही आम्ही हा कार्यक्रम राबविला. त्याचे चांगले परिणाम विद्यार्थी, शिक्षक व शाळेवर कसे झाले हे मी कथन करीत आहे.
वर्तमानपत्राची पाने उलटून पाहिली की, त्यात खून, मारामारी, चोरी, बलात्कार, फसवणूक, शोषण, जातीय दंगली, त्यातून होणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अशाच बातम्या जास्त वाचायला मिळतात. हे करणारा वयोगट कोणता तर 16 ते 25 आहे. मग अशावेळी माझ्यासारख्या संवेदनशील शिक्षकाला प्रश्न पडतो की, मी शाळेत मुलांना असे काही हिंसक वळण लावले नाही, सर्व पाठयक्रम शिकवला, चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न केला. मग ही तरुण पिढी अशी का बनली असावी? याचे उत्तर शोधताना काही पर्याय समोर आले. एक म्हणजे या मुलांवर शालेय वयातच मूल्यांचे संस्कार रुजविण्यासाठी आमचे अध्ययन अनुभव कमी पडले असावेत किंवा पाठयक्रम तसा नसावा. समाजातील वाईट प्रवृत्तीचा व संगतीचा परिणाम त्याच्यावर अधिक झाला असावा. ही परिस्थिती अशीच राहिली तर तरुण पिढी बरबाद होऊन समाजाचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. सध्या तरी या समाजाला अंधकारातून बाहेर काढण्यासाठी व तरुण पिढीला संस्कारित करण्यासाठी शांतिलाल मुथ्था मूल्यवर्धन कार्यक्रम हा मला आशेचा किरण वाटतो आहे. माझ्या शाळेत मी चौथीच्या वर्गात मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेतील सर्व उपक्रम राबविले आणि त्याचा विद्यार्थ्यांवर खूपच चांगला परिणाम दिसून आला. त्यातील काही अनुभव पुढीलप्रमाणे-
1) ‘राजूचा दिवस’ व ‘माझे दैनंदिन वेळापत्रक’ हे पाठ शिकविल्यानंतर मुले लवकर उठून, स्वतःची कामे स्वतः करू लागली. आरोग्याच्यादृष्टीने वाईट सवयी बदलून स्वतःचे वेळापत्रक तयार केले. मुले शाळेत वेळेवर येऊ लागली, मित्र-मैत्रिणी यांना सोबत घेऊन येऊ लागली. चौथीच्या वर्गात हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांच्या मदतीने संपूर्ण शाळेत ‘वेळेवर शाळेला चाललो आम्ही’ हा नियम तयार केला. कारण शाळेत येणाऱ्या मुलांचा परिसर झोपडपट्टीचा होता. मुलांचे वडील मजूरी व आई धुणी भांडी करायला सकाळी लवकर 8 ते 9 वाजता निघून जायचे. त्यामुळे मुलांना वेळेत शाळेला पाठवायला कुणीच नसायचे. मुलेही बऱ्याच वेळा शाळेला दांड्या मारायची. ब-याचवेळा उशीराने यायची. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे शाळेचे वातावरणच बदलले. मुलांमध्ये आमूलाग्र बदल झाला. मुले स्वतःचे आवरून परिसरातील मुलांना, भावंडाना सोबत घेऊन 10 ते10.15 पर्यंत शाळेत येतात. शाळेत येऊन उर्वरीत अभ्यास पूर्ण करतात. वाचनालयात जाऊन पुस्तके वाचतात. अप्रगत मुले, शिष्यवृत्ती, व प्रज्ञाशोध वर्गाची मुले तासाला बसून शिकतात.
2) ‘थांबा, बघा, जा, रस्ता ओलांडताना पाळावयाचे वाहतुकीचे नियम’ हा घटक व त्याचे प्रात्यक्षिक एवढे प्रभावी झाले की, मुलांमध्ये व पालकांमध्ये झालेले बदल त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लावून गेले. लाल सिग्नलला थांबणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे, चालताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे, अपघात झाल्यास 108 नंबर डायल करणे याचा वापर प्रत्यक्ष जीवनात करीत आहेत. हे या उपक्रमांचे मोठे यश आहे. म्हणजेच मूल्यवर्धन कार्यक्रम केवळ मूल्यशिक्षण देत नसून जीवन शिक्षण देत आहे असे मला वाटते.
-विठ्ठल देवणे
मूल्यवर्धन : भविष्यकाळाची गरज
-विठ्ठल देवणे
मूल्यांची रूजवण
मूल्यवर्धन पुस्तिकेच्या वापरामुळे मुलांमध्ये निश्चितच समर्पक बदल घडून येतो
मूल्यवर्धन पुस्तिकेमुळे मुलांमध्ये एक आदर्श नागरीक घडेल असा बदल दिसून आला. छोटया कृतीतून अनेक मूल्यांची बीजे रोवली गेली. ती निश्चितच चिरकाल टिकतील. भविष्यात त्याचा मुलांना खूपच फायदा होईल.
-संपदा सुर्यवंशी
मूल्यांची रूजवण
-संपदा सुर्यवंशी
मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेतील उपक्रमांतून बोध घेऊन मुलांनी स्वतःमध्ये काही बदल केले
मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिडवणे, मारामारीचे प्रसंग कमी झाले आहेत. विद्यार्थी शाळेत अधिक उत्साहाने येऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांच्या घरातील वर्तनातदेखील सकारात्मक बदल झाले आहेत
मूल्यवर्धन उपक्रमात असलेल्या विविधतेमुळे विद्यार्थ्यांची अभिरुची वाढत आहे. मूल्यवर्धन उपक्रम घेण्यास सुरुवात केल्यापासून विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगले बदल झालेले आढळले. विद्यार्थी चांगले छंद जोपासू लागले. त्यांच्या सामाजिक वर्तनात बदल दिसू लागले. वर्गनियमांमुळे वर्ग शांत राहू लागला. सहयोगी अध्ययन पद्धतीमुळे सर्व मुले एका टप्प्यावर आलेली दिसतात. वर्गात कचरा करत नाहीत. शिव्या देण्याचे प्रमाणही कमी होऊ लागले आहे. दुसऱ्याचे मत ते ऐकून घेऊ लागले आहेत. घरात आईला मदत, आजी आजोबांची कामे करतात. एकंदरीत, मूल्यवर्धन उपक्रमांमुळे वर्गातील वातावरण हसतखेळत झाले आहे. विद्यार्थ्यांना स्वतःच्या जबाबदारीचे भान येऊ लागले आहे.
-स्नेहल पाटील
मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेतील उपक्रमांतून बोध घेऊन मुलांनी स्वतःमध्ये काही बदल केले
-स्नेहल पाटील
मी व माझ्या शाळेत झालेला बदल
शालेय शिक्षणाबरोबरच काळाची गरज असलेला अत्यंत महत्त्वाचा विषय मूल्यवर्धन सुरु झाला. गेली तीन वर्षे मी दोन शाळांमध्ये हा कार्यक्रम मनापासून राबवित आहे. एखादा चांगला कार्यक्रम मनापासून राबविला की, त्याचा सकारात्मक प्रभाव स्वत:वर व शाळेसहीत समाजावर पडतो याचा मी गेले तीन वर्षे अनुभव घेत आहे. याच संदर्भाने मी माझा अनुभव आपणापर्यंत पोहचवत आहे.
“यदा यदा ही धर्मस्य ..” या श्लोकाप्रमाणे शांतिलाल मुथ्था यांचा जन्म नावाप्रमाणेच या विश्वात शांतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी झाला आहे असे वाटते. आजच्या भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या जगास समाजसेवा, नितीमूल्ये यांचे महत्त्व सांगून ती मूल्ये विद्यार्थीदशेपासूनच रुजावीत म्हणून आपण केलेले कार्य खरोखरच महान व आम्हा शिक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमामुळे माझ्या शाळेमध्ये अमुलाग्र असे बदल झाले. शाळेच्या पटात वाढ झाली. उपस्थिती व सर्वांगीण गुणवत्ता यामध्ये लक्षणीय वाढ झाली. शिक्षक व समाज यांच्यातील सुसंवाद वाढीला लागला. शाळेच्या भौतिक सुविधा, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य समाजाने दिले. शाळेच्या सर्व उपक्रमांमध्ये समाजाचा सहभाग वाढला. शालेय स्टेशनरी व वह्या, पेन, पाट्या असे हजारो रुपयांचे सहाय्य वस्तूरूपाने मिळाले. प्रत्यक्ष शाळेत येऊन मूल्यवर्धन कार्यक्रमाची समाजातील प्रतिष्ठित लोकांनी प्रशंसा केली व माहिती घेतली. पूर्वी गैरहजर मुलांना काहीवेळा घरी बोलवायला जायला लागायचे. आता या उपक्रमामुळे मुले वेळेत शाळेला येऊन आम्हांला विचारतात, “सर, मूल्यवर्धन तास कधी आहे?” इतका सकारात्मक व दृश्य बदल शाळेमध्ये झाला आहे. आदरणीय मुथ्था साहेब माझी एक विनंती आहे की, हा कार्यक्रम इतका चांगला व परिणामकारक आहे की त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये राबवायला हवा. यासाठी आपण मुख्यमंत्री साहेबांना याचे महत्त्व सांगून प्रयत्न करावेत. माझी बदली झाल्यामुळे दोन्ही शाळांमध्ये सकारात्मक बदल करण्याची संधी मला या उपक्रमामुळे मिळाली. सहकारी शिक्षकांतही सकारात्मक बदल दिसून येत आहेत. एकूणच हा उपक्रम कायमस्वरूपी रहावा व आम्हांला तो राबवण्याचे भाग्य मिळावे हीच इच्छा.
-तानाजी पोवार
मी व माझ्या शाळेत झालेला बदल
-तानाजी पोवार
मूल्यवर्धनमुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंत बदल
मूल्यवर्धनमुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंत बदल झाले आहेत.
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांच्या आचार-विचारांमध्ये बदल झाला आहे. एकमेकांचा आदर करणे, प्रेमाने वागणे, मदत करणे, जोडीचर्चा, समानता या बाबी मुलांमध्ये रुजल्या आहेत. मूल्यवर्धनमुळे संविधानिक मूल्ये रुजविण्यास मदत होते. एकमेकांशी कसे वागावे, त्यांचा आदर कसा करावा या बाबी मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी मूल्यवर्धन मदत करते. त्याचबरोबर शिक्षकांमध्येही मूल्यवर्धनमुळे बदल झाला आहे. यामध्ये जोडीचर्चा, गटचर्चा, आनंददायी शिक्षण मुलांना मदत करत आहे.
-जहूर अहमद मुल्ला
मूल्यवर्धनमुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोहोंत बदल
-जहूर अहमद मुल्ला
मूल्यवर्धन व विद्यार्थी
या आधुनिक जगात फक्त बौद्धिक विकास झाला म्हणजे विद्यार्थी हुशार आहे. पण बौद्धिक विकासाबरोबर भावनिक विकाससुद्धा फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी मूल्यवर्धन काळाची गरज आहे.
मूल्यवर्धन पुस्तिकेमुळे शिक्षणात कृतीलासुद्धा वाव मिळाला आहे. विद्यार्थ्यांना यामध्ये आवड आहे. त्याचबरोबर या पुस्तिकेची अभ्यासक्रामाशी सांगडसुद्धा घातली गेली आहे.
-श्रीकांत पाटील
मूल्यवर्धन व विद्यार्थी
-श्रीकांत पाटील