मूल्यवर्धन हाच जीवनाचा पाया
जीवनाची जडणघडण होण्यासाठी शिक्षण मूल्यांचे अंगिकारणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थी घडावा याकडे जातीने लक्ष देणे शिक्षक म्हणून नेहमीच आद्यकर्तव्य वाटत होते. प्रत्यक्ष शिक्षकीपेक्षात तेरा वर्ष कार्यरत आहे. ग्रामीण भागात शिकविताना विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्याचा प्रयत्न करून त्यांच्यात प्रामाणिकपणा रूजवण्यात यश आलं.
आमच्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रमाची मागील वर्षी सुरुवात झाली. याबाबत शासनाने पुढाकार घेतला हे अभिनंदनीय आहे. आता बदली झाली. नवीन शाळेत रूजू झाल्यावर प्रकर्षाने जाणवले की ही मुले पूर्णत: वेगळी आहेत. अगदी निडर, धाडसी आणि कोणाचीही तमा न बाळगणारी आहेत. आता खरी कसोटी होती. जून २०१९ पासून आलेली मुले मूल्यवर्धन पुस्तकातील उपक्रमांत चांगला सहभाग घेताना दिसली. त्यांच्या मनात आरपार जायचं म्हणून कायकाय करता येईल याचा विचार केला. यासाठी पुस्तिकांचे नीट वाचन करून घेतले. खूपच चांगल्या पद्धतीने मूल्यवर्धन उपक्रम निवडले गेले आहेत. त्यांचा पुरेपूर फायदा करून घ्यायचे ठरवले. मुलांना उपक्रमांत सहभागी होताना आनंद वाटतो. अभ्यास म्हणून न पाहता आनंददायी, खेळीमेळीचे वातावरण निर्माण होते. मूल्यसंस्कारक्षम कथा ऐकवणे, त्यावर गटचर्चा, संवेदनक्षम मनाची जडणघडण करण्याचे विविध प्रयत्न झाले.
इयत्ता दुसरीत नवीन प्रवेश घेऊन दाखल झालेला देवांश शाळेत खूप मस्ती करतो. कुणालाही न सांगता बंदरावर पोहायला निघून जातो. संपूर्ण गावात त्याची ख्याती होती. कुणाला दगड मारणे याचे त्याला काहीच वाटत नाही. प्रथम त्याला अती चंचलतेपासून शांत करायचे होते. संस्कार रूजवायला मदत करील अशी गोष्ट रोज वर्गात सांगायला सुरूवात केली. त्यातील उदाहरण दाखले देताना देवांशचे नाव चांगला मुलगा असे घेतले. त्याला छान वाटते. त्याच्यात वैयक्तिक स्वच्छतेचाही अभाव आढळून आला. त्याची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून कारणमीमांसा शोधून वाईट वाटले. पूर्णतः दुर्लक्षित केल्यामुळे कुटुंब, शाळा, समाज याचे त्याला काहीही वाटत नव्हते. पण दोनच महिन्यांत मूल्यवर्धन पुस्तिकेच्या आधाराने त्याच्यात थोड्याशा संवेदना जागवण्यात थोडेसे यश आले आहे. एक दिवस एका मुलाला दगड मारला म्हणून त्याला खूप ओरडले गेले. मग मलाच वाईट वाटले. मी सर्व मुलांसमोर त्याला सांगितले की, असे वागतो म्हणून तुला रागावले. मलाच कसेतरी होत आहे. हे ऐकून त्यालाही वाईट वाटले. संवेदना रूजली. आता त्याची मस्ती थोडीशी कमी होत आहे. आशा करूया वर्षाअखेर देवांश गुणी विद्यार्थी झालेला पाहायला मिळेल. त्याला आजवर कुणी मायेची फुंकर दिलीच नाही हे उमगले. हट्टी असल्यामुळे रूमाल वापरणार नाही हे सांगून मोकळा झालेला देवांश मी तुला रूमाल दिला तर चालेल का असे म्हटले. तो खुदकन हसला. नेहमीच काय दटावू? कधीतरी धीरही देऊया असे वाटले. शाळेच्या आवारात मूल्येच रूजवू.
मूल्यांची आवश्यकता : मूल्यांची जोपासना विद्यार्थीदशेतच होत असते. विविध संस्कारबीज लावले तरच मूल्याधिष्ठीत पिढी हाती येईल. अन्यथा बदलत चाललेल्या जगात हरवलेली नितीमूल्ये आणि कुसंस्कार दिसतील.
अभ्यास ही खरं तर शिक्षणातील दुसरी पायरी गृहीत धरावी. कारण नितीमूल्यांचा पायाच भक्कम नसेल तर घेतलेले शिक्षण भविष्याचा भार पेलवू शकणार नाही.
-शितल संखे
मूल्यवर्धन हाच जीवनाचा पाया
-शितल संखे
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमधील बदल
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे अतिशय सकारात्मक व वेगाने बदल दिसून येत असून ते प्रत्यक्ष मुलांच्या कृतीतून दिसून येत आहे. विद्यार्थी दररोज शाळेत येतात. स्वतःची कामे स्वतः नियमित करतात. स्वच्छता, नीटनिटकेपणा, स्वयंशिस्त, अशाप्रकारचे विविध बदल दिसून येत आहेत.
आजकाल संस्कृती संक्रमण चालू आहे. मूल्यवान जीवनपद्धती ऱ्हास होत आहे. येथे शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. सागराचे सारेच पाणी पिण्यायोग्य नाही. मात्र तेच ढगामार्फत आले की पिण्यायोग्य बनते. असेच असतात गुरू. म्हणूनच मूल्यवर्धंन यशस्वीतेसाठी माझी भूमिका महत्त्वाची आहे. मी माझ्या शाळेत प्रत्येक कृतीतून मूल्यवर्धनचा प्रयत्न करते. 10 ते 5 प्रत्यक्ष आणि 5 ते 10 अप्रत्यक्ष. सकाळी स्वच्छता, परिसर सफाईला मी माझ्या शिक्षिकांसह स्वत: लक्षपूर्वक उपस्थित असते. आपली स्वत:ची प्रत्येक कृती संयमित असते. परिपाठातून राष्ट्रगीत, राष्ट्रीयगीत, प्रार्थना यांच्या शुद्ध उच्चाराने सुरुवात होते. वातावरण अतिशय प्रफुल्लित असते. स्वच्छता आणि उदबत्तीचा दरवळ. मन करा रे प्रसन्न … याची आठवण होते. परिपाठात बालकांच्या वैयक्तिक सवयीचा परामर्श घेतला जातो. जवळ पैसे बाळगणे, चोरी, भांडणे यावर सामुदाहिक समुपदेशन करतात, जेणेकरुन संस्कार सहज पेरले जावेत. दुकानात जाऊन मुले पेन्सिल, पेन न घेता सोडत आणि जुगाराच्या पैशांना बळी पडतात. यावर चर्चा घेतली जाते. हात धुण्याच्या सवयी मुलाना लावल्या जात आहेत. स्वयंशीस्तही लावली जाते. पोषण आहाराच्या वेळी माझा कचरा माझ्याकडे उपक्रमाचे लगेचच नियोजन केले जाते. जेवतेवेळी भोजनमंत्र लाऊनच आहार दिला जातो. गटरचना करून सर्व मुले बसतात. मुले आपापाल्या इयत्तेप्रमाणे बसतात. रांगेत येणे-जाणे याबाबत सूचना केली जाते. झाडांना पाणी घालणे, वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबविले जातात. पहिली ते पाचवीच्या पाठ्यपुस्तकांतील कथा, प्रसंग सांगितले जातात. उपक्रम पूर्ण केले जातात. असा मूल्यवर्धनचा सुंदर कार्यक्रम नियोजनानुसार राबविला जातो. तासिका नियोजन केले आहे. आपले ताट घासून, पुसून ठेवणे या सवयी लावल्या जातात. रस्त्याचे नियम, आपण कसे वागायला हवे, यासारखे उपक्रम राबविले जातात. शाळेत येताच आणि जातानाही शिक्षकांना शुभेच्छा देणे, आपले काम आपण करणे ही कामे मुले करतात. वैयक्तिक स्वच्छता पाळली जाते. स्वत:ची कामे मुले स्वत: करतात. म्हणून मला वाटते की मूल्य आणि शिक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या तशाच स्विकारायला हव्यात. आपल्या शिक्षण पद्धतीत मूल्यांची गुरुकुल परंपरा आहे ती जपली जायला हवी.
-नम्रता नरेंद्र संखे
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमधील बदल
-नम्रता नरेंद्र संखे
मूल्यवर्धन : दिशा मानवतेची.
अखंड भारतीयांच्या कल्याणासाठी राज्यघटनेने दिलेल्या मूल्यांची रुजवणूक मूल्यवर्धन कार्यक्रमातून सहज साध्य होताना दिसते.
मंदाग्नी डोंगराच्या पायथ्याशी वसलेले माझे 100% कातकरी आदिवासी वस्ती असलेले पालघर जिल्ह्यातले वाडा तालुक्यातले नेवाळपाडा हे गाव आहे. या गावच्या शाळेला परिसस्पर्श झाला तो मूल्यवर्धन कार्यक्रमाचा. चार वर्ग, 50 विद्यार्थी, दोन शिक्षक अशी ही शाळा आहे. जबाबदार माणूस घडवायचा असेल तर मूल्यवर्धनच्या माध्यमातून एक चांगली संधी चालून आली आहे. मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांचे स्वागत करतो. आज सर्व मानव जातीला विधायक वृत्तीकडे वळवायचे असेल तर शाळेत आपण करीत असलेल्या प्रयत्नांना मूल्यवर्धन उपक्रमांतून आनंददायी पद्धतीने अभ्यासक्रमाशी सुसंगत, आरटीई 2009, एनसीएफ 2005 नुसार लोकशाहीसाठी स्वातंत्र्य, न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होऊ शकते. याची जाणीव होऊन मूल्यवर्धनने भारावून जाऊन हे काम मनापासून करायचे ठरविले. कारण सर्व विषयांचा सुरेख संगम मूल्यवर्धन कार्यक्रमात घातलेला आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सभेत सर्वांनी त्याचे स्वागत केले. कचराकुंडीचा वापर, रोज एक काम, वृक्षारोपण, मदत, स्वच्छता, अभ्यास या वर्गनियमांचे पालन करू लागले. आठ दिवसांतच विद्यार्थ्यांमध्ये बदल दिसून आला. विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन पुस्तिका वाटप करून आठवड्यातून उपक्रमांच्या दोन तासिका सुरू झाल्या. मुलांना सहयोगी अध्यापनातून, खेळांतून, कृतीतून विद्यार्थ्यांना आनंद वाटू लागला. रंगकाम, कोलाज, कथा, गाणी, कला, नाटक, कोडी मुले आवडीने करताना त्यांच्यातले संस्कारक्षम बदल नोंदवू लागलो. सर्व विषयांची सांगड घातली गेल्याने मुलांचा आनंद वाढला व आमची उद्दिष्टे साध्य होऊन गळती, स्थलांतर रोखले. वाचन, लेखन अध्ययन स्तरात वाढ झाली. शौचालयांचा वापर, स्वच्छता, घरी, शाळेत रोज एक काम, वृक्ष जतन, पाणी, ऊर्जाबचत, शिव्या न देणे, मुक्या प्राण्यांची काळजी घेणे, मुलांचे गावात सहकार्य व मदत इत्यादीमुळे मूल्यवर्धनमुळे बदल दिसू लागला. नकळत पालकांचे सहकार्य वाढले व शाळेला मदत करू लागले. शाळेत येऊन शाळेचा कायापालट या़वर चर्चा करून सहकार्य वाढले व शिक्षकांत बदल होऊन दृष्टिकोन बदलला.
१) वीटभट्टीवर रोजगारासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली व ती टापटीप राहू लागली.
२) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणारे दोन विद्यार्थी आमच्या शाळेत दाखल झाले.
३) पालकांचा शिक्षकांबद्दल आदर वाढला.
४) न बोलणारी मुले बोलू, नाचू, गाऊ लागली.
५) शाळेविषयी भीती दूर झाली. मुळे 100% टक्के उपस्थित राहू लागले.
६)विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता, गुणदोष जबाबदाऱ्या समजल्या.
-जगदीश जाधव
मूल्यवर्धन : दिशा मानवतेची.
-जगदीश जाधव
मूल्यवर्धन- पासवर्ड सुसंवादाचा
मूल्यवर्धन ही संकल्पनाच अशी आहे की, व्यक्तीमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजविणे आणि आचरणात आणणे. आज आपण आपल्या देशात, आपल्या परिसरात अनेक अशी उदाहरणे पाहतो की, राष्ट्राभिमान, सामाजिक जाणीव, स्वची जाणीव या गोष्टी दुर्मिळ झाल्या. जो तो आपल्याच तालात असून दुसऱ्यांशी, आपल्या जवळच्यांशी संवाद साधायला वेळ देत नाही. ज्या ठिकाणी संवाद संपत आला त्या ठिकाणी नातं कमकुवत होत जातं. म्हणून सुसंवाद साधणे काळाची गरज आहे, असे म्हणावेसे वाटते.
मूल्ये रुजविणे आणि आचरणात आणणे म्हणजे मूल्यवर्धन. मग ही मूल्य कोठे आणि कशी रुजवायची, तर याचे प्रभावी माध्यम आहे शाळा. म्हणून मूल्यवर्धन एक पासवर्ड सुसंवादाचा असे मला वाटते. कारण शाळेत बोलते केले जाते, गटकार्यात एकमेकांशी संवाद साधला जातो, एखादया विषयावर चर्चा केली जाते, याबरोबरच इतरांचे मत ऐकून घेतले जाते. सुसंवादामध्ये मत मांडणे व मत ऐकून घेणे या दोन्ही बाजू महत्त्वाच्या आहेत. एकदा शाळेत उपक्रम म्हणून खेळ घेतला. त्याची सांगड मूल्ये रुजविण्याशी घातली. खेळाचा विषय होता ‘लपंडाव’. खेळ सुरू झाला. मुले खेळात रमली. वर्गात शांत गपचूप बसणारी, कमी बोलणारी मुलेच खेळात जास्त उत्साहाने बोलत होती. काहीवेळाने खेळ संपला. वर्गात खेळविषयी चर्चा झाली आणि अशाच स्थानिक खेळाविषयी आजी, आजोबा, आई, बाबा यांच्याशी चर्चा करून माहिती मिळवा व वर्गात कथन करा, असा उपक्रम घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी प्रत्येकांचे कथन ऐकताना सर्व वर्ग गजबजून गेला. काही पालकांची भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितले की, काल आमच्या घरात खेळविषयी चर्चा रंगली होती. फार विचारत होती मुलं, बोलकी झाली पोरं, असे अभिप्राय ऐकून नक्कीच वाटते की मूल्यवर्धन- एक पासवर्ड आहे सुसंवादाचा.
-विलास कोकोडे
मूल्यवर्धन- पासवर्ड सुसंवादाचा
-विलास कोकोडे
मी आणि मूल्यवर्धन
आज मूल्यवर्धनसारख्या शिक्षणक्रमातून संस्काराच्या अंधारात मूल्यांचे किरण दिसत आहेत. हे सकारात्मक मूल्यशिक्षणाचे आदर्शपाठ आहेत. भविष्यातील भावनिक व सामाजिक व्याभिचारावर मूल्यवर्धन संजीवनी म्हणून काम ककरील याचा विश्वास वाटतो.
-श्री. सूर्यवंशी गोपाळ बालाजी
मी आणि मूल्यवर्धन
-श्री. सूर्यवंशी गोपाळ बालाजी
मूल्यवर्धनने विद्यार्थी झाले स्वावलंबी
मूल्यवर्धन कार्यक्रमासाठी माझी प्रेरक म्हणून निवड झाली आणि सारेच चित्र पालटले. सर्वप्रथम मला केंद्रप्रमुख सौ. स्वाती पागधरे यांच्याकडून मूल्यवर्धनसाठी माझी प्रेरक म्हणून निवड झाल्याचे समजले. तेव्हा वाटले आपण हे सारं करू शकू का? जेव्हा कार्यशाळा सुरू झाली, तेव्हा मात्र मी ठरवले की, माझ्या शाळेचे आणि माझ्या वर्गाचे चित्र पलटवायचे. आज ज्या समस्या माझ्यापुढे आहेत त्यावर मूल्यवर्धनच्या साहाय्याने मात करायचीच.
तालुक्यावरून मी मूल्यवर्धन प्रशिक्षण घेऊन आले तेव्हाची गोष्ट. माझ्या विद्यार्थ्यांना मी मूल्यवर्धनाबाबत माहिती दिली. आपण किती छानछान उपक्रम राबवणार आहोत हे सांगितले. त्यांना ते फार आवडले. नंतर मुलांनी वर्गनियम तयार केले. त्यानुसार वागायचे ठरविले. नंतर हळूहळू सर्व उपक्रम घेत असताना मुलं बोलती झाली. कधी वर्गासमोर नीट उभाही न राहणारा विराज विलास घाटाळ हा विद्यार्थी चक्क शाळेत प्रत्येक विषयात लक्ष घालू लागला. प्रत्येक विद्यार्थी आपापली कामे व्यवस्थित करू लागला. एके दिवशी विद्यार्थी खेळत असताना एका मुलाला खेळात घेत नव्हते. तेव्हा मी त्यांना विचारले, “का रे बाळांनो, ह्याला का नाही घेत खेळायला?” तर मुलं बोलली, “मॅडम हा वर्गनियम पाळत नाही. म्हणून आम्ही त्याच्यासोबत खेळत नाही.” मग मी त्याला आणि पूर्ण वर्गाला स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. तो विद्यार्थी म्हणाला, “मॅमॅडम, आई कामाला जाते. यायला उशिर होतो. म्हणून माझा गणवेश खराब असतो.” आता त्याला बोलून काही उपयोग नव्हता. मी एक कार्यशाळा घ्यायचे ठरविले. प्रत्येकाने आपापले गणवेश शाळेत आणायचे. जमलं तर एखादी छोटी बादली सोबत आणायची. साबण शाळेतून दिला. ईश्वर कृपेने पाण्याची काही कमतरता नव्हतीच. सर्वजण जमल्यावर मी स्वतः कपडे कसे धुवायचे ह्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखविले. नंतर त्यांनी आपापले गणवेश धुवायला सुरुवात केली. आपला गणवेश स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी आपलीचं आहे हे त्यांना मी पटवून दिले. मुलांनीही छान प्रतिसाद दिला व ही कार्यशाळा यशस्वी झाली. त्यानंतर एका महिन्यानंतर ही कार्यशाळा पुन्हा घेतली. ह्या महिन्यात विद्यार्थ्यांमध्ये बदल जाणवले. ते दररोज स्वच्छ गणवेशात येऊ लागले. खरोखरचं ती स्वावलंबी बनली.
-माधुरी सोनोने
मूल्यवर्धनने विद्यार्थी झाले स्वावलंबी
-माधुरी सोनोने
मूल्यवर्धनने माणूस बदलतो
मानवाची सर्वांगाने प्रगती झालेली आपण पाहतो. हे जरी सत्य असले तरी आज समाजामधून हे जग बिघडले. संस्कार राहिले नाहीत, मोठ्यांचा आदर राहिला नाही, मूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे अशी मानवी अध:पतनाची गाऱ्हाणी मात्र आपल्याला वारंवार ऐकायला मिळतात. मग ज्याच्यांवर विश्वास ठेवून या देशाची स्वप्ने बघितली जातात. त्यांच्याकडून असे निराशेचे ताशेरे मारले तर संस्कारक्षम एक आदर्शाने समृद्ध असलेला भारत केव्हा निर्माण होणार? निराशेच्या गर्तेत अडकून पडलेल्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी संस्कारक्षम व जबाबदार पिढी घडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून उद्याचा भारत कसा असेल या प्रश्नाला मूल्याचं सिंचन करून पूर्तता करणारे ‘मुथ्था फाउंडेशन पुणे व विद्यापरिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला मूल्यवर्धन कार्यक्रम आज या समस्येवरची संजीवनी ठरत आहे. माझं मूल बिघडावं, त्याने कुटुंबात बेजबाबदारीने वागावं, शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवू नयेत, समाजात नीट वागू नये असे कोणाला वाटेल? भविष्यातील मुले चांगली नागरिक व्हावीत यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम आहे.
भारत माझा देश आहे. हे दररोजच्या परिपाठातून विद्यार्थी बोलत असतात. त्यावेळेस ते त्या वाक्याच्या अर्थाकडे लक्ष देत नाहीत. नवीन दाखल झालेल्या पहिलीच्या मुलाने परिपाठ संपताना मला एक प्रश्न केला की गुरुजी, जसे माझे बाबा, माझी आई, माझे आजोबा असे आपण म्हणतो तसे आपण ‘भारत माझा देश आहे” असे आपण का म्हणतो? आजपर्यंत झालेल्या सेवेत या प्रश्नावर कधी एवढया गांभीर्याने विचार केलाच नव्हता. आदल्या दिवशी ‘माझे कुटुंब’ या उपक्रमातून परिचय करून घेतल्यानंतर हा प्रश्न त्याला पडला असावा हे लक्षात आले. त्या मुलाला कसे समजवावे हे माझ्यासमोर एक आव्हान होते. माझे जेव्हा बोलतो, तेव्हा आपले आणि त्या व्यक्तीचे एक वेगळे नाते असते. आत्मियतेचा संबंध असतो. त्यामुळे तो आपलाच आहे असे समजून त्यांच्याशी वागत असतो. तसे माझा देश आणि मी याच एक वेगळे नाते आहे, अभेद्य संबंध आहे, म्हणूनच ‘देश माझा मी देशाचा’ याची नाळ जोडलेली आहे. त्या मुलाने मान हलवून तर बाकी मुलांनी टाळ्यांच्या साथीने दुजोरा दिला. बालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन धन्य झाले. त्यासाठी त्यांना मदत होईल अशी मूल्ये आणि कौशल्ये या कार्यक्रमातून शिकतात. ती स्वतंत्रपणे विचार करायला शिकतात. जबाबदारीने वागायला, इतरांची काळजी घ्यायला शिकतात. मूल्यवर्धनमुळे त्यांच्या प्रयत्नांना पुष्टी मिळाली. मूल्यवर्धन कार्यक्रमातून मूले या गोष्टी शिकतात. उपक्रमात ती स्वतः विचार करतात. एकमेकांशी मोकळेपणाने चर्चा करतात, एकत्र निर्णय घेतात. कोण चुकीचे वागले तर काय करावे हेही ठरवितात. भारतीय संस्कृतीचा पायाच आहे की, माणूस घडला पाहिजे, उभा राहिला पाहिजे. अहंगंड, न्यूनगंड व भयगंड जीवनातून काढून टाकून ‘Yes, I can do’ हा आत्मविश्वास भरणारी संजीवनी ठरली ती म्हणजे मूल्यवर्धन. अनेकांची स्वप्नपूर्ती, भावनांची कदर करणारा, कौशल्यांना विकसित करणारा, संस्कृतीचे संवर्धन करणारा मूल्यवर्धन महत्त्वपूर्ण ठरत आहे.
-दीपक शानवारे
मूल्यवर्धनने माणूस बदलतो
-दीपक शानवारे
आणि साहिल शहाणा झाला….
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्यापरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एका केंद्रात सदर मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात आला. सदर उपक्रम पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात माननीय केंद्रप्रमुख श्री. नवनाथ जाधव यांच्या प्रेरणेने वेवजी केंद्रात राबवण्यात आला होता. आमच्या जिल्हा परिषद वेवजी काटीलपाडा शाळेत हा मूल्यवर्धन उपक्रम अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आला.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्यापरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम राबविण्यात येत होता. आमच्या पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी केंद्रात जिल्हा परिषद शाळा वेवजी काटील पाडा शाळेत हा उपक्रम इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीपर्यंत राबविण्यात आला. आमच्या शाळेत हा कार्यक्रम राबवत असताना अतिशय उत्तम असे अनुभव आम्हांला घेता आले. आमच्या शाळेतील इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकणारा साहिल रमेश डोलारे हा विद्यार्थी स्वमग्न आहे. हा विद्यार्थी नियमित शाळेत यायचा. शाळेत आल्यानंतर तो शाळेतील इतर विद्यार्थ्यांची दप्तर फेकून देणे, वह्या फाडणे, पुस्तके फाडणे. तसेच इतर विद्यार्थ्यांना मारणे या गोष्टी करीत होता. स्वमग्न असल्यामुळे तो शाळेत कधीही कोणालाही एकही शब्द बोलत नसे. बाकी विद्यार्थीही त्याच्याशी जास्त बोलत नसायचे. कारण साहिल हा अतिशय खोडकर विद्यार्थी होता. घरीही बहीण, आई यांना मारायचा. मूल्यवर्धन कार्यक्रम शाळेत सुरू झाल्यानंतर दिलेल्या मार्गदर्शक पुस्तकांमधील एकेक उपक्रम आम्ही शाळेत घ्यायला लागलो. या पुस्तकातील उपक्रम अतिशय योग्य पद्धतीने मांडलेले आहेत. त्यामुळे उपक्रम घेत असताना विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या आंतरक्रियेत खूप फरक पडला. पुस्तकातील आम्ही शेजारी, आपले नातेवाईक यांसारखे उपक्रम घेत असताना, कधी नव्हे तो आमच्या शाळेतील साहिलला जवळ बोलावून त्यालाही त्याच्या नातेवाईकांविषयी माहिती विचारली. सुरुवातीला शांत असलेला साहिल, आता आपल्या आईविषयी, बहिणीविषयी, बाबांविषयी, त्याच्या भाषेत (वारली) आईवडिलांविषयीच्या गोष्टी सांगू लागला. बोलताना त्याने त्याच्या घरातील सर्व गोष्टी आम्हांला सांगितल्या. आता साहिल वर्गामध्ये शिकविलेल्या कवितेच्या काही ओळी गाऊन दाखवतो. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे आमच्या शाळेतील कधीही न बोलणारा साहिल आता आमच्याशी बोलतो, खोड्या करण्याचे प्रमाणही आता कमी झाले आहे. पुस्तके, वह्या फाडणे असे काहीही तो आता करत नाही. मूल्यवर्धन कार्यक्रमातील अनेक उपक्रम, गाणी, खेळ आजही मुले आनंदाने खेळतात. शिक्षणाबरोबर खेळाचा आनंद घेतात. एकमेकांशी प्रेमाने वागतात, एकमेकांना मदत करतात, आपली जबाबदारी, आपली कर्तव्ये, शाळेविषयीचे प्रेम यांची जोपासना करतात. दरवर्षी स्वतः वर्गाची नियमावली बनवतात व पालन करतात. मूल्यवर्धन उपक्रम शाळेत राबवल्यानंतर आमच्या शाळेतील साहिल खऱ्या अर्थाने शहाणा झाल्याचे दिसते.
-सुदर्शन वांगदरे
आणि साहिल शहाणा झाला….
-सुदर्शन वांगदरे
मी आणि मूल्यवर्धन
शालेय विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्ये लहान वयातच रुजावीत आणि भविष्यातील सुजाण नागरिक घडावा यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. सन २०१८ या वर्षी पालघर तालुक्यात या कार्यक्रमाची सुरुवात झाली. शालेय विषय आणि मूल्यवर्धन कार्यक्रम यातून आदर्शवत जीवनात मूल्याची सांगड घातली जात आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांची जाणीवपूर्वक रुजवणूक उपक्रमातून सहज करण्याचे तंत्र मूल्यवर्धन घेऊन आले आहे. विद्यार्थ्याला स्वची जाणीव घरातील प्रत्येक नातेवाईक, परिसरातील व्यक्ती, घटना आणि जगातील माहिती बालविश्वाला देणारी पद्धत आहे. मुथ्था फाउंडेशन पुणे व विद्यापरिषद, पुणे यांनी विद्यार्थी वय, क्षमता, कौशल्य व अनुभवविश्व यांचा मेळ घालून मूल्य जोपासण्यासाठी अभ्यासक्रम तयार केलेला आहे. शालेय वातावरणात शालेय अध्यापनाची नवी दिशा देणारे दिशादर्शक पाठ्यक्रम तयार केलेला आहे. २१ व्या शतकात तंत्रज्ञानाकडे वळणारा विद्यार्थी मूल्यांपासून वंचित राहू नये, यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम शिक्षकांसाठी संजीवनी ठरणार आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रमामधून मूल्यसंवर्धनाची मोठ्याप्रमाणावर जाणीव झाली. शालेय शिक्षण जरी मूल्यसंस्कारित असले तरी पूर्वीच्या अध्यापन पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे बऱ्याचदा मूल्य रुजवीत आहोत की नाही याची भ्रांत पडते. गेल्या एक वर्षापासून उपक्रम राबविल्यामुळे शाळेतील विद्यार्थी घरातील वरिष्ठ मंडळींची नावे सांगू लागली. बऱ्याचदा पाया मजबूत नसेल तर भिंत उभारून पुन्हा मोडकळीस येण्याची भीती असते. घरातील व्यक्तींची नावे कधीकधी मुलांना माहीत नसतात. आपल्यामध्ये कोणती कला आहे याची माहिती नसते. ‘केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ ही भावना नसल्याने नकारात्मक भावनांचा विकास होतो. या सर्वांना झुगारून त्यात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी मूल्यवर्धन उपयोगी ठरत आहे. मित्राची माहिती सांगणे, स्वतःची मते मांडणे, असे का यावर विचार विनिमय करणे, शाळेतील प्रत्येक मूल माझे मित्र आहे हे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात विविध उपक्रमांतून, सहयोगी खेळातून, गटचर्चेतून, स्वनिर्मित नियमांतून, कलेच्या साहाय्याने, कथाकथनातून, सहयोगी कृतीतून, निरीक्षणातून रुजते आहे.
शिक्षकांनी मूल्यवर्धन स्वीकारून पाठ्यक्रमानुसार कार्यवाही करावी, जेणेकरून आदर्श नागरिक घडविण्यात आपण यशस्वी झाल्याचा आनंद आपल्या आयुष्यातील आनंदापेक्षा नक्कीच खूप मोठा आनंद असेल असेच वाटते.
-श्री. राजन गौतम गरूड (जि. प. शाळा, कर्दळ, केंद्र- सफाळे, ता., जि. पालघर)
मी आणि मूल्यवर्धन
-श्री. राजन गौतम गरूड (जि. प. शाळा, कर्दळ, केंद्र- सफाळे, ता., जि. पालघर)
माझे मूल्यवर्धन बाबतचे अनुभव
खरं म्हणजे अपघाताने मूल्यवर्धन कार्यक्रमाशी मी जोडलो गेलो. सुरुवातीला केवळ इतर प्रशिक्षणाप्रमाणे हे एक प्रशिक्षण पूर्ण करायचे या भावनेने प्रशिक्षणाला गेलेलो परंतु, जेव्हा प्रशिक्षण सुरु झाले तेव्हा मूल्यवर्धन विषयाची व्याप्ती व आवश्यकता जाणवू लागली. दिवसेंदिवस ढासळत चाललेली मूल्ये आणि समाजात वाढत चाललेला चंगळवाद यावर उत्तर असेल तर बालवयातच योग्य सुसंस्कार घडवावेत आणि उदयाचा भावी नागरिक तयार करावा. ही मूल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना मनाला भावून गेली आणि तन व मनाने या कार्यकमांशी जुळलो गेलो. चार दिवसांच्या तालुकास्तरीय प्रशिक्षणानंतर संपूर्ण बीटस्तरावर इतर सहकाऱ्यांची मानसिकता बदलण्याचा यशस्वी प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने शांतीलाल मुथ्था फाउंडेशन व विद्याप्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु झालेला होता, त्यामध्ये मी जोडलो गेलो.
माझे शाळेबाबतचे अनुभव – मूल्यवर्धन कार्यक्रमाचा मला सगळ्यात मोठा फायदा झाला असेल तर स्वयंशिस्तीच्या बाबतीत. माझी शाळा जवळजवळ २५0 पटाची आहे. मुलांना स्वयंशिस्त लावायची कशी हा माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. तो सोडवला मूल्यवर्धन या कार्यक्रमाने. केवळ वर्गातच नाही तर मैदानावरसुद्धा मला एका वेळी २५० मुलांना नियंत्रित करणे सोपे झाले. केवळ शांतता संकेत देताच ( हात वर करणे ) सर्व विद्यार्थी नियंत्रणात आणणे शक्य झाले. वर्गात मुलांनी स्वतःचे नियम बनवले असल्याने वर्गनियंत्रण झाल्याने सर्व शाळाच स्वयंशिस्तीत आली. मुलांच्या दररोजच्या वागण्यातही विविध मूल्ये दिसून येऊ लागली. जसे की वर्गाच्या बाहेर चपला ओळीत दिसू लागल्या, मुले शाळेत स्वच्छ टापटीपमध्ये दिसू लागली.
माझा गाव १००% आदिवासी समाजाचा आहे. दिवाळीनंतर बहुतेक पालक वीटभट्टीवर स्थलांतरीत होतात. त्यांचे थकलेले आजी, आजोबा घरीच पाडयावर थांबलेले असतात. ही मुलं या आजी,आजोबांना ज्याप्रकारे मदत करतात, ते पाहून मूल्यवर्धन कार्यक्रमाचे यश अधोरेखित होते. शाळेत मुले अपंग विद्यार्थ्यांचा सन्मान करतात, शिक्षकांचा आदर करतात. त्यांच्या वर्तनातील बदल या उपक्रमांचेच फलित आहे. या अगोदर असा बदल होत नव्हता का? तर त्याचेही उत्तर हो असेच आहे पण; जाणीवपूर्वक एखादया गोष्टीवर भर दिल्यावर रिझल्ट पहावयास मिळतो, तो अधिक विश्वासनिय असतो. ते सर्व साध्य झाले मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे. मूल्यवर्धन उपक्रम केवळ विदयार्थांच्याच बाबतीत उपयोगी आहे असे नाही, तर तो शाळेच्या सर्व घटकांशी संबंधित आहे. वर्गनियम बनविताना अगोदर शिक्षकांनी तो नियम पाळणे गरजेचे असते. त्याचा अनुभव आम्हा शिक्षकांनाही आला. शिक्षकसुद्धा मुलांसोबत स्वयंशिस्त बनले. जे गाभाघटक सुजाण नागरिक बनविण्यास उपयोगी आहेत, त्यांचाच मूल्यवर्धन खऱ्या अर्थाने विचार करते. शाळेतून सुजाण, कर्तव्यदक्ष नागरिक निर्माण करण्याचे मोठे कार्य हाती घेतलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमास सलाम.
-श्री. राजेंद्र वडगणे (जि. प. प्रा. शाळा पोळे, ता. पालघर)
माझे मूल्यवर्धन बाबतचे अनुभव
-श्री. राजेंद्र वडगणे (जि. प. प्रा. शाळा पोळे, ता. पालघर)
मना घडवी संस्कार!
‘मना घडवी संस्कार’ या उक्तीप्रमाणे बालवयातच मुलांच्या मनावर योग्य संस्कार झाले तर देशाचा सुजाण नागरिक तयार होऊन देश प्रगती पथावर वाटचाल करतो. आज पाश्चिमात्य देशांबद्दल आपण हेवा, मत्सर व्यक्त करतो. परंतु अगदी बालवयातच त्यांच्या देशात शालेय शिक्षणातून मुलांच्या मनावर ‘आपली कर्तव्ये’ इतकी खोलवर कोरली जातात की, त्यामुळे या देशांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक शिस्त जी पाहायला मिळते ती अफलातून आहे. आज आपल्या शिक्षण क्षेत्रात फक्त गुणवत्ता पहिली जाते. मुलांना किती चांगल्या प्रकारे लिहिता, वाचता येते, गणितीक्रिया करता येतात का यावरच शाळेचा दर्जा ठरवला जातो. आज कोणीही शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्ती एकवेळ मुलांना लिहिता- वाचता थोडं उशिरा आले तरी चालेल, परंतु त्यांना बंधुता, सहभावना, संवेदना, आत्मविश्वास, दया, प्रेम, धाडस, राग, मोह, संशय, अहंकार, चिंता यांची जाणीव करून द्या असे म्हणत नव्हते. आता याला एकाच पर्याय दिसून येतो तो म्हणजे मूल्यवर्धन कार्यक्रम. मागील वर्षापासून मूल्यवर्धन कार्यक्रम आमच्या पालघर तालुक्यामध्ये तथापि आमच्या शाळेत राबवला जात आहे. मूल्ये ही शिकविली जात नसून रूजवली जातात, हे या कार्यक्रमाने सिद्ध करून दाखवले आहे. प्रत्यक्ष कृतीयुक्त उपक्रम, सहयोगी खेळ, आपल्याला परिचित जीवनानुभव यातून एकेक विभागाची पायरी विद्यार्थी चढत जातात. या उपाक्रमांतील संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रुजविले जाऊन आपोआपच संविधानात्मक मूल्यांची रुजवणूक मुलांमध्ये होत आहे.
मागील वर्षी मूल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रशिक्षण मी केंद्रस्तरावर दिले. एकंदरीत सर्व शिक्षकांचा अभिप्राय यापूर्वी शालेय स्तरावरून कुठेतरी आपण मुलांमध्ये संस्कार रुजवण्यास कमी पडत होतो, परंतु त्याची भरपाई मूल्यवर्धन कार्यक्रमाने पूर्ण केली आहे असा दिसून आला. आज माझी मुले आदिवासी दुर्गम भागातील जरी असली तरी या कार्यक्रमामुळे त्यांच्यात स्वछता, आरोग्यविषयीची जाणीव, संवेदना, सहभावना, दया, प्रेम, आपुलकी आणि मुळात म्हणजे कमालीचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये दिसत आहे. हे सर्व फलित मूल्यवर्धन कार्यक्रमाचे आहे असे मला वाटते. असा संस्कारक्षम कार्यक्रम आमच्या पालघर तालुक्यालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला दिल्याबद्दल आम्ही सर्व शिक्षक शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे शतश: ऋणी आहोत.
-श्री. संजय नारायण पाटील (जि. प. शाळा सावरे)
मना घडवी संस्कार!
-श्री. संजय नारायण पाटील (जि. प. शाळा सावरे)
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन मुलांचे भावविश्व समृद्ध करत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी वय, अनुभव, क्षमता व त्यांचे अनुभवविश्व यांना अनुरूप असणारी मूल्यवर्धनची पुस्तिका व अभ्यासक्रम यावर लेखन केलेले आहे.
मी आणि मूल्यवर्धन २१ व्या शतकात माणुसकीला सचेतन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे मूल्यवर्धन. मूल्यवर्धित करण्याची क्षमता असणारा हा कार्यक्रम शालेय शिक्षणात सूर्योदय आहे. संस्कृती आणि आदर्श अशा मानवी मूल्यांची सांगड घालून बालविश्व या माध्यमातून मूल्यवर्धित होत आहे, याचा आनंद वाटतो. मुथ्था फाउंडेशन पुणे व महाराष्ट्र राज्य विद्या परिषद, पुणे यांनी विद्यार्थी वय, क्षमता, कौशल्य आणि अनुभवविश्व यांचा मेळ साधत अफलातून पाठ्यक्रम निर्मिती केलेली आहे. आमच्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येण्यापूर्वी ठरलेल्या वर्गनिहाय आकृतीबंधानुसार अध्ययन-अध्यापनाचे काम सुरू असायचे. जाणीवपूर्वक मुलांना प्रश्नोत्तर पाठांतर, पाठांचा आशय, गणितावरील क्रिया, ठरलेली क्रमिक पुस्तके या चाकोरीबाहेर जाऊन शिक्षणाशिवाय त्यांचे असणारे भावी संस्कारक्षम जीवन आम्ही कधीच अभ्यासले नव्हते. शिक्षण आणि संस्कार परस्पर समांतर गोष्टी आहेत. संस्काराशिवाय शिक्षण ही संकल्पनाच पूर्ण होऊ शकत नाही. शिक्षणाच्या माध्यमातून कमावलेली भाकरी कुणासोबत आणि कशी खायची हेच माहिती नसेल तर सारे व्यर्थच आहे. उच्चशिक्षित होऊन परदेशात खूप आकडी पगार मिळवून नातेवाईक, परिवार यांच्या नात्यांची कदर नसेल, किंबहुना आदर नसेल तर सारे व्यर्थ आहे. भारतीय संस्कृती ही भावनिक व नैतिक मूल्यांवर चालणारी नाव आहे. यात आर्थिक गरजांपेक्षा भावनिक व सांस्कृतिक वारसांना जपण्याच्या गरजा आधारभूत ठरतात. याचाच सारासार विचार करून शालेय जीवनात नकळत आदर्श मूल्यांचे महत्त्व विद्यार्थीदशेत कळण्यासाठी हा उपक्रम योग्य वाटतो.
पहिलीच्या वर्गात आलेली मुले व इतर मुले यांचा चुकून कधीकधी दप्तर, जेवणाचा डब्बा, पुस्तक, वही यांना पाय लागायचा. ती मुले त्याच्या निरागस वयानुसार ते सर्व विसरून खेळात दंग व्हायची. दोन-चार वेळा प्रेमाने सांगून व रागाने बोलून ही ती गोष्ट त्यांच्या लक्षात येत नव्हती. पुस्तकं, वह्या म्हणजे आपले देव. चुकूनही आपल्या देवांना पाय लागू देत जाऊ नका. कधी लागलाच आपला पाय, तर चुकलो म्हणून खाली वाकून पाया पडत जावा. असं मी वारंवार सांगायचो. गेल्या आठवड्यात मूल्यवर्धनचा उपक्रम घेताना मी आंधळी कोशिंबीर हा उपक्रम निवडला. मुलांनी आवाजाची दिशा कशी ठरवायची, आवाजापर्यंत जाऊन विद्यार्थ्यांना कसे पकडायचे, यासाठी सुरुवातीला माझ्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली. मी खेळायला सुरुवात केली. खेळताना वर्गात असलेल्या दप्तराला माझा चुकून पाय लागला. मी खाली वाकून एक-दोन ठिकाणी पाया पडलो. खेळादरम्यान व खेळानंतर विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल मी पाहिला आणि नवलच वाटले. आपण दहावेळा एखादी गोष्ट सांगणे आणि एखादी आदर्श कृती करणे यातील तरी फरक मला उमजला. आपसूक मला या आधीपासूनच विद्यार्थ्यांसोबत कचरा गोळा करणे, कधीकधी त्यांना न निघणारा कचरा स्वतः झाडून काढणे, त्याच्यासोबत खेळणे, चटई अंथरून त्यांच्यासोबत बसणे, प्रभातफेरीला ढोल वाजवणे व घोषणा देणे अशी कितीतरी कामे करण्याची मला अनुभूती आली. कारण विद्यार्थी हे अनुकरणप्रिय असतात. त्यांच्या बालपणात ते जे अनुभवतात, त्याचा ठसा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर पडतो. हे सर्व मूल्यवर्धनमुळे घडत आहे, याचा मनस्वी आनंद वाटतो.
-श्री. सूर्यवंशी जी. बी. (जि. प. मोरघेपाडा, ता. वाडा, जि. पालघर)
मी आणि मूल्यवर्धन
-श्री. सूर्यवंशी जी. बी. (जि. प. मोरघेपाडा, ता. वाडा, जि. पालघर)
मूल्यवर्धन : वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम
आपण पाहतो की, सुशिक्षित बालक सुसंस्कारित असतेच असे नाही. आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात मुलांमध्ये काही अंशी मूल्यांची घसरण होतांना दिसत आहे. या कारणमिमांसेचा समजपूर्वक विचार करून, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणे यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना आणली व शालेयस्तरावर मूल्यवर्धनची हसतखेळत, आनंददायी पद्धतीने, मुलांच्या मानसिकतेला धक्का न लावता शिक्षण देण्याची नवी कल्पना सत्यात उतरवली. हा कार्यक्रम आमच्याकडे सन २०१८-१९ पासून राबविण्यात आला.
मूल्यवर्धन कार्यक्रमाची मला उमगलेली वैशिष्ट्ये-
१. मूल्यवर्धन उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची गुरुकिल्ली.
२. समाजात वावरताना आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या यांची नकळत जाणीव करून देणारा उत्तम असा सामाजिक कार्यक्रम.
३. विद्यार्थ्यांच्या कौशल्ये विकासास खतपाणी घालणारा गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यक्रम.
४. इतरांविषयी आस्था, जिव्हाळा या भावना विविध कृतींतून हृदयापर्यंत पोहचविणारा नाविन्यपूर्ण, हृदयस्पर्शी कार्यक्रम.
५. सर्व शालेय विषयांशी उत्तम समन्वय साधून विद्यार्थ्याला न आवडणाऱ्या विषयांची गोडी लावणारा रुचीपूर्ण कार्यक्रम.
६. कृती, खेळ यातून विद्यार्थ्यांना मनमुराद आनंद देणारा आनंददायी कार्यक्रम.
७. आनंददायी कृतीमुळे शाळेची गोडी वाढविणारा कार्यक्रम.
८. शिक्षकांविषयी आदर, प्रेम वाढविणारा, मित्रांमध्ये प्रेमभावना, सहकार्यभाव वाढविणारा भावनाप्रधान कार्यक्रम.
९. पालकवर्गाला, SMC ला शाळेची ओढ लावणारा उल्लेखनीय कार्यक्रम.
१०. शाळेविषयी आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या यांची जाणीव देणारा स्तुत्य व उत्कृष्ट कार्यक्रम.
११. पालक, SMC सदस्य यांच्या सहकार्याने, शालेय विकासाचा पाया रचणारा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम.
मूल्यवर्धन उपक्रमाची यशस्वीता- आमची जिल्हा परिषद शाळा शिलटे ही पालघर तालुक्यातील स्वच्छ, सुंदर, उत्कृष्ट शाळा म्हणून लौकिकास प्राप्त झाली. अशा आमच्या प्रगतशील शाळेत गेल्यावर्षापासून मूल्यवर्धन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या उपक्रमामुळे शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्वांमध्येच सकारात्मक बदल होत गेले. शिक्षकांच्या विचारांची दृष्टी बदलली, विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त वाढली, सहकार्यभावना वृद्धिगत झाली, SMC, पालक यांची शाळेविषयीची ओढ वाढली, मदतीच्या हातांची संख्या वाढत गेली. त्यामुळे शाळेचा उत्तरोत्तर विकास करण्यात आम्ही यशस्वी झालो.
घटनात्मक मूल्यांच्या भक्कम पायावर उभा असलेला हा मूल्यवर्धन कार्यक्रम आम्हांला, आमच्या विद्यार्थ्यांना व पालकांना सुसंस्कारित जीवन जगण्यास आवश्यक गोष्टी नकळत शिकवून गेला. माझ्या शाळेतील या कार्यक्रमाची यशस्वीता पाहता ‘मूल्यवर्धन हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आहे’ हे विधान १००% सार्थ ठरते.
-सौ. स्वेजल संदेश म्हात्रे (जि .प. शाळा शिलटे, ता., जि. पालघर)
मूल्यवर्धन : वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम
-सौ. स्वेजल संदेश म्हात्रे (जि .प. शाळा शिलटे, ता., जि. पालघर)
संविधान संवर्धन म्हणजेच मूल्यवर्धन
भारतीय भावी पिढी सुजाण, सुसंस्कारित, सर्वांच्या हिताचा विचार करणारी, मूल्याधिष्ठित घडविण्यासाठीची शांतिलाल मुथ्था फाउंडेशनची ही सारी जी धडपड आहे; प्रथमत: त्यांच्या या महान कार्यास माझा सलाम. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था यांच्या नावातच शांतीचे जे लालनपालन करणारे ते शांतिलाल होय. नावाप्रमाणेच त्यांनी जग शांतीमय करण्याचे महान ध्येय उराशी बाळगून मूल्यवर्धनचे कार्य हाती घेतले आहे, त्यांच्या या महान कार्यात आम्हांलाही सहभागी होण्याचे भाग्य मिळाले म्हणून आम्ही आभारी आहोत.
संस्कारांचे घेवुन मोती, मूल्यवर्धन आले या जगती,
रुजविण्यास दिली तुम्ही गती, वंदन करते आपल्या चरणावरती.
शांतिलाल नावात शांतता, रुजवी माणसामाणसात मानवता
स्वभाव असावा मिळता जुळता, जपुया सारे एकता व समता
न्यायासाठी मानव झटता, प्रगतीचा आलेख चढता
एकच आहे जन्मदाता, पाळून आता बंधुता
भारतीय संविधानातील मूल्यांचे संवर्धन म्हणजेच मूल्यवर्धन. न्याय, स्वातंत्र, समता व बंधुता हे गहन विचार आहेत. विद्यार्थांना केवळ ज्ञानदान करणे एवढेच आपले कार्य नसून त्यांच्यावर सुसंस्कार घडवणे, त्यांच्यासमोर विविध आदर्श कृती ठेवून त्यांच्या मनाची जडणघडण करून त्यांच्यात सत् प्रवृत्ती निर्माण करणे हे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. यासाठी आपल्याला मूल्यवर्धन कार्यक्रमाची चांगलीच साथ लाभली आहे. विद्यार्थी आदर्श नागरिक घडणारच असा ध्यास धरुन आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. यादृष्टीने आपले वर्तन असावे. कारण “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.” दुसरा काय करतो त्यापेक्षा मी काय करतो, हे स्वत:चे अवलोकन स्वत:करुन कृती घडली तर आदर्श जीवन घडायला वेळ लागत नाही. यातून संपूर्ण मानवजातीचा विकास होईल. म्हणूनच मूल्यवर्धन कार्यक्रमातील पाच विभागात मी पासून सुरुवात करून शेवटी आपले जग इथपर्यंत नेले आहे. “हे विश्वची माझे घर” या संताच्या कल्पनेतील संस्कार रुजणार आहेत. मनुष्य हा पृथ्वीवरील चैतन्याचा प्रकाश आहे. सुसंस्कृत समाजात प्रत्येक व्यक्तिला इथे नैसर्गिक गुण दाखविण्याची संधी मिळाली पाहिजे. माणसाच्या स्वभावातील पशुता, दुराग्रह, हिंसकता नष्ट करण्याची शक्ती हवी. ही शक्ती आपल्याला मूल्यवर्धनच्या विविध उपक्रमांतून मिळते. माळ्याने फुलझाडांची नीट काळजी घेतली, त्यांना वेळेवर खतपाणी दिले तर त्यावर फुलणारी फुले ताजी, टवटवीत, आकर्षक, मनमोहक, सौंदर्यसुगंधादी गुणांनी युक्त होतील व सर्वांना आनंद देतील. आपल्या शाळेतील मुलांचेही तसेच आहे. ती देवाघरची फुलेच असतात. म्हणून ती कोमेजू न देणे हे आपले कर्तव्य आहे. त्याचे बालपण निर्मळ, निरागस व संस्कारक्षम असते. अशावेळीच त्याच्यावर योग्य संस्कार झाले तर त्याचे जीवन फुलते. ही मुले स्वतःचे जीवन समृद्ध करतातच शिवाय इतरांच्या जीवनातही आनंद निर्माण करतात. खऱ्या अर्थाने भविष्यातील आधारस्तंभ व मार्गदर्शक बनतात. म्हणूनच इयत्ता पाहिलीपासून भारतीय राज्यघटनेतील मूल्ये विद्यार्थांमध्ये रुजविण्याचे महान कार्य शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने हाती घेतले आहे. त्यासाठी वातावरण निर्मिती, बालस्नेही पद्धती, ज्ञानरचनावाद व आनंददायी शिक्षण या साऱ्याचा उपयोग करून विविध उपक्रमांची मालिका तयार केली आहे.
मूल्यवर्धनीय स्वानुभव : सन २०१८-१९ ची माझी शाळा गावठणपाडा (पाली) इथे मला फार गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले नाही; पण मी मंगळवार दि. १८/६/२०१९ रोजी सकाळी उज्जैनी शाळेत पोहचल्यावर आम्ही सर्व शिक्षक नवीन. तेथे आमची मुले नवीन. सफाईला पटांगणात आलो. दादा, बाळा, ताई असे प्रेमाने आवाज देऊनही मुले ऐकायला तयार नाहीत. 10 वेळा सांगूनही कुणी वाकायला, कागद, कचरा उचलायला तयार नाहीत. उलट लांब पळायचे, लपायचे. आम्ही डोक्याला हात लावला. आता काय करावे, कसं होईल? मग परिपाठासाठी एकत्र आलो. छानपैकी गोष्ट सांगितली. विद्यार्थ्यांचे मंत्रीमंडळ बनवले. दररोजचे परिपाठासाठी व सफाईचे गट बनविले. दिवसभर विद्यार्थांसोबत चर्चा, गप्पा, विविध सहयोगी खेळ खेळलो. कृतीयुक्त गाण्यांद्वारे मुलांसोबत नाचलो. याचा अनुकूल परिणाम म्हणजे बोलण्यासाठी लाजणारी मुलेही बोलू लागली. दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेत पोहचलो तर पटांगण स्वच्छ, लख्ख आरशासारखे होते. प्रत्येक वर्गासमोर फिल्टर पाणी भरलेले होते. वर्ग स्वच्छ होते. अशाप्रकारे आयुष्यातले प्रश्न सोडवण्यासाठीचे ज्ञान ज्यातून मिळते ते म्हणजेच मूल्यवर्धन उपक्रम होय. आयुष्य सुंदर व समाधानाने जगण्यासाठी प्रत्येक मुलाला उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी आपण धडपडत असतो. यासाठीच मूल्यवर्धन कार्यक्रमाने सिंहाचा वाटा उचलला आहे. उज्जैनीतल्या माझ्या या नव्या मुलांमध्येही 1. मानवी प्रतिष्ठेचा आदर 2. स्वायत्तता 3. जबाबदारी 4. चिकित्सक व सर्जनशील विचार 5. विविधतेचा आदर 6. सुसंवादी नातेसंबंध 7. इतरांबाबत आस्था 8. सक्रिय सहभाग या मूल्यांचा परिपोष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारच. हे आव्हान मी स्वीकारले आहे. कारण मला माहीत आहे की, बालक स्वेच्छेने घडू शकतो. तो चिरकाल टिकणारा जिवंत झरा बनतो. फक्त त्याच्यातील स्फुलिंगावर हळुवार फुंकर घालून फुलवला, तर त्यांचे जीवन घडल्याचा परमानंद आपल्याला मिळतो. त्याच्यात बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक मेळ साधायचा आहे. यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाची गोड जोड आहेच.
राष्ट्रीय मूल्ये ही माणसामाणसात रुजवू या
न्याय, समतेची तुतारी जनमनात वाजवू या
सुसंस्कृत, सुनागरिक देशात घडवू या
बंधुता ही मनामनात जतन करू या
राग, द्वेष मनीचा शांतीनेच विझवू या
स्वातंत्र्यता ही साऱ्या जगात गाजवू या
-सौ. हर्षला हरेश पाटील (जि. प. केंद्रशाळा उज्जैनी, ता. वाडा, जि. पालघर)
संविधान संवर्धन म्हणजेच मूल्यवर्धन
-सौ. हर्षला हरेश पाटील (जि. प. केंद्रशाळा उज्जैनी, ता. वाडा, जि. पालघर)
मूल्यशिक्षणाची कास धरुया, एक आदर्श पिढी घडवूया.
मूल्यशिक्षण ही काळाची गरज आहे. म्हणून घर, समाज, शासनयंत्रणा, शिक्षक यांच्यामध्ये समन्वय असणे खूप गरजेचे आहे. यासाठी प्रत्येकाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मूल्यशिक्षण ही प्रचलित शिक्षणातील एक अत्यंत महत्त्वाची उणीव आहे. शिक्षणातून ज्ञान प्राप्ती करणे व कौशल्य विकसित करणे या दोन उद्दिष्टांवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा निकष म्हणजे त्याची ज्ञान प्राप्ती करणे. ज्ञानप्राप्ती ठरविण्याचा आधार म्हणजे त्याला परीक्षेत प्राप्त झालेले गुण. साहजिकच यामध्ये संस्कार, सद्गुण, सद्वृत्ती, सदाचार यांच्या विकासाला काहीच महत्त्व राहिले नाही. त्यामुळे आज संस्कारांचा पूर्णपणे अभाव असणाऱ्या पिढ्या निर्माण होऊ लागल्या आहेत. हे आज आपण वर्तमानपत्र, दूरदर्शन यातील बातम्यांतून बघतो. अल्पवयीन मुलांनी केलेले गुन्हे, खून, बलात्कार अशा गोष्टी घडताना दिसतात. मुले विकृतीला बळी का पडतात? तर सामाजिक स्तरावर वाढत चाललेली अनैतिकता याला कारणीभूत असते. ही अनैतिकता म्हणजे एक प्रकारे सामाजिक भूकंप आहे. याचे दुष्परिणाम इतके भयंकर आहेत की त्यामुळे समाजामध्ये अशांतता, अराजकता पसरते. यासर्वांतून जर बाहेर पडायचे असेल तर आपले घर, समाज, शाळा यांमधून मूल्यशिक्षणाची सुरुवात करणे ही एक काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक इत्यादीच्या आहारी जाऊन समाजाची नैतिकता ढासळत चालली आहे. त्यासाठी मूल्यशिक्षणाची ख-या अर्थाने गरज आहे. आज माणसाने विज्ञानात अत्युच्च प्रगती केली आहे. हे करताना मूल्यांना मात्र पायदळी तुडवले आहे. आज आपण काही उच्चशिक्षित लोक असे पाहतो की त्यांच्यामध्ये नैतिक मूल्यांचा अभाव दिसून येतो. त्यामुळे बलात्कार, खून, भ्रष्टाचार यासारख्या घटना बघायला मिळतात. यासर्वांतून मुक्त असा सुसंस्कृत, सदाचारी समाज निर्माण करण्यासाठी मूल्यशिक्षणाची अत्यंत गरज आहे. सर्वांनीच यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. मी शिक्षिका म्हणून काम करीत असताना अशी अनेक मुले मी पाहत आहे की, त्यांच्यामध्ये आक्रमकता, द्वेष, चोरी, अस्वच्छता अशा अनेक गोष्टी दिसून येतात. ही मुले अशी बनण्याचे मुख्य कारण त्यांचे घरचे आणि आजूबाजूचे वातावरण असते. पण जेव्हा ही मुले शाळेत येतात, तेव्हा शाळेतील विविध उपक्रमांमुळे त्यांच्या वर्तनात खूप बदल झालेला बघायला मिळतो. म्हणजेच मूल्य रुजविण्याचे काम घर, समाज, शासनयंत्रणा, शिक्षक यांनी जाणीवपूर्वक केले तर येणारी पिढी एक आदर्श पिढी तयार होईल. प्रत्येक शिक्षकाने आपल्या समोर आलेला विद्यार्थी एक आदर्श व्यक्ती, एक आदर्श नागरिक बनेल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आजच्या दृक-श्राव्य साधनांच्या विपुलतेच्या काळात या साधनांचा वापर करून विविध धर्मातील कथा दाखवून सर्वधर्म सहिष्णूतेबरोबरच इतर मूल्यांची रुजवणूक करणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या परिस्थितीत इष्ट तो बदल घडवून आणण्याची शक्ती मूल्य संस्कारातून वाढू शकते. तसेच आलेल्या परिस्थितीवर मात करण्याची शक्तीदेखील मूल्यशिक्षणातूनच व्यक्तीला मिळू शकते. घर आणि समाज यांची भूमिका मूल्यशिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. घरावर मूल्यशिक्षणाची अधिक जबाबदारी आहे. शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती असल्याने शाळेतील चरित्र्यसंवर्धनाचे उपक्रम व्यापकदृष्टया परिणामकारक ठरणारे आहेत. मूल्यशिक्षण ही काळाची गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्याचे काम घर, समाज आणि शिक्षक यांनी केलेच पाहिजे. म्हणून एकच ध्यास, मूल्य रुजविणार, आम्ही मूल्य रुजविणार. सद्गुणी आणि सदाचारी पिढी घडविणार.
सन 2018-19 मध्ये माझ्या वर्गात मी अनेक उपक्रम घेऊन मूल्यांची रुजवणूक करण्याचा प्रयत्न केला. वर्ग आणि शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे, रोज कोणालाही मदत करणे, वर्गातील मुलांचे वाढदिवस साजरे करणे, रोज एक कथा ऐकवणे, मुला-मुलींना समान काम, समान संधी, विविध व्यावसायिकांच्या मुलाखती अशाप्रकारे स्त्री-पुरुष समानता, नीटनेटकेपणा, संवेदनशीलता, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती ही मूल्ये मुलांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला. खूप छान अनुभव आला. जसे एखाद्या शिल्पकाराला त्याचे शिल्प पूर्णत्वास आल्यावर जो आनंद होतो, तशा आनंदाची अनुभूती मला मिळाली.
-रूतिका राजेश भोईर (जि. प. शाळा वाडा)
मूल्यशिक्षणाची कास धरुया, एक आदर्श पिढी घडवूया.
-रूतिका राजेश भोईर (जि. प. शाळा वाडा)
मूल्यशिक्षणाचा नवा अध्याय : मूल्यवर्धन उपक्रम
‘बलसगर भारत होवो; विश्वात शोभूनी राहो’
माझा भारत खऱ्या अर्थाने बलसागर करावयाचा असेल आणि समग्र विश्वात माझ्या देशाचे स्थान सर्वोच्च व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी हवी आहे लोकशाहीभिमुख, नीतिमत्ता असलेले नागरिक. मूल्यशिक्षणाची. मूल्यांची रुजवणूक आणि त्यांचा विकास करण्याची गरज आहे.
महाराष्ट्रात शालेय पातळीवर मूल्यशिक्षण अनिवार्य होतेच. त्यासाठी परिपाठाचे आयोजन आम्ही करत होतो. एवढे प्रयत्न पुरेसे नव्हते. समाजाचे वर्तमान अस्वस्थ असताना घटनात्मक मूल्ये रुजविण्यासाठी ठोस उपक्रमांची आणि मार्गदर्शनाची गरज आम्हा शिक्षकांना नेहमीच वाटत होती. नेमके हेच मार्गदर्शन आणि विविध उपक्रमांची मांदियाळी घेऊन आला तो मूल्यवर्धन कार्यक्रम. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या प्रेरणेने अवघ्या महाराष्ट्रात मूल्यवर्धनचा अनोखा प्रेरणादायी नवा अध्याय सुरू झाला.
“मूल्यवर्धनच्या कार्यशाळेत भारतीय संविधानातील चार मुख्य मूल्ये आणि त्यावर आधारित आठ मूल्ये यांची नव्याने ओळख झाली. विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये कशाप्रकारे रुजवावीत याबाबतचे सखोल मार्गदर्शन प्रत्यक्षिकांसह या कार्यशाळेत मिळाले. मूल्यवर्धन उपक्रमांचे आयोजन, नियोजन उपक्रम पुस्तिकेतून कायम स्वरूपी आम्हांला मिळाले. या पुस्तिका दिपस्तंभाचे काम करतात.
मूल्यवर्धन उपक्रम अधिक प्रभावी होण्यासाठी ‘मूल्यवर्धनाची नवी दिशा’ हा अनोखा उपक्रम आमच्या शाळेत आम्ही राबविला.
उपक्रमाचे नाव : मूल्यवर्धनची नवी दिशा
उद्दिष्टे : मूल्यवर्धन उपक्रमातील शालेय मूल्यांची रुजवणूक करणे.
कालावधी : संपूर्ण शैक्षणिक वर्ष
कार्यवाही : सर्वप्रथम शाळेतील इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीमधील सर्व विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता असे कुल करण्यात आले. अशा कुलनिर्मितीनंतर शाळेतील सर्वच उपक्रम कुल पद्धतीने राबविण्यात येतात. यामुळे शाळेतील सर्वच मुले परस्पर आदर, स्वायत्तता, आस्था, जबाबदारी, सुसंवादी नातेसंबंध यांचे पालन करून स्वतःचे सक्रिय योगदान देत असतात.अशाप्रकारे मूल्यवर्धन उपक्रमाने संपूर्ण महाराष्ट्रात मूल्यशिक्षणाचा नवा अध्याय सुरू केला आहे. त्यात माझा सहभाग ही निश्चितच आनंदाची पर्वणी आहे.
-संध्या सुभाष सोंडे
मूल्यशिक्षणाचा नवा अध्याय : मूल्यवर्धन उपक्रम
-संध्या सुभाष सोंडे
.