मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच रुजायला हवीत, तसेच भविष्यात त्यांच्यामधून चांगले लोकशाहीभिमुख नागरिक घडायला हवेत, या उद्देशाने शांतिलाल मुथ्था फाउंडेशनतर्फे शाळांसाठी मूल्यवर्धन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. मराठी प्रमाणेच हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि कोकणी भाषांमध्येही हा कार्यक्रम उपलब्ध केला आहे.
संकल्पना
सामाजिक क्षेत्रात तीन दशकांहून अधिक वर्षे कार्यरत असलेल्या श्री. शांतिलाल मुथ्था यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मूल्यवर्धनचे बीज रोवले आहे. मूल्यवर्धनमुळे संपूर्ण देशात शैक्षणिक क्रांती होईल असा त्यांना विश्वास आहे.
महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम स्वीकारला असून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी चालू आहे. गोवा सरकारनेसुद्धा हा कार्यक्रम स्वीकारला आहे.
उद्देश
राज्यघटनेतील मूल्ये शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये रुजावित आणि हेच विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक म्हणून घडावेत हा मूल्यवर्धन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजावित यासाठी शाळा प्रयत्न करत असतातच. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळेल.
मूल्यवर्धनच्या माध्यमातून शाळा हे उद्दिष्ट नियोजित आणि पद्धतशीरपणे साध्य करू शकतील, मुलांमध्ये आमुलाग्र असे परिवर्तन होईल असा विश्वास आहे.