दिव्यांग मुलाला लागली शाळेची गोडी
महाराष्ट्र आणि गुजरात सीमेजवळील पालघर जिल्ह्यातील नानापाडा शाळेतील दिव्यांग मुलाला मूल्यवर्धनमुळे शाळेची गोडी लागली आहे.
(जिल्हा : पालघर, तालुका : तलासरी, केंद्र : वेवजी, शाळा : नानापाडा)
नानापाडा हा आदिवासीबहुल परिसर. त्यामुळे मराठी भाषेचा पालक व मुलांना फारसा परिचय नाही. पारंपरिक भाषेतच त्यांचे संभाषण सुरू असते. याच शाळेतील तिसरीतील एक मुलगा दिव्यांग होता. तो शाळेत येण्यास कधी उत्सुक नसायचा. कुणी नवी व्यक्ती दिसली की लपून बसायचा. सुरुवातीला मूल्यवर्धनला अनुसरून वर्गशिक्षिका जिवडे यांनी या मुलाला चित्र रंगविण्यासाठी दिली होती. पण त्याने चित्रे रंगविली तर नाहीच पण चित्रांची पुस्तिकाही फाडून टाकली. वर्गातील इतर मुलांमध्ये मिळून मिसळून राहणेही त्याला जमत नव्हते.
दिव्यांग मुलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. इतर मुले त्यांना आपल्यामध्ये सामावून घेत नाहीत आणि अशी मुलेसुद्धा इतर मुलांमध्ये मिसळत नाहीत. शाळेत जाण्यात त्यांना स्वारस्य नसते. पण मूल्यवर्धन कार्यक्रमाअंतर्गत वर्गामध्ये राबविल्या गेलेल्या उपक्रमांमुळे हा दिव्यांग मुलगा शाळेत रमला. तणावमुक्त व आनंदी वातावरणात उपक्रम राबविले जात असल्याने उत्साहाने खेळात सहभागी झाला. त्याला शाळेची गोडी लागून तो नियमित शाळेत येऊ लागला.
मूल्यवर्धनमुळे हळूहळू त्याच्यात झालेले असे अनेक बदल वर्गशिक्षिका सौ.जिवडे यांनी सांगितले. आता तो चार-चौघात मिसळू लागला आहे. घरकामातही हा मुलगा आईला मदत करू लागला आहे असे त्या म्हणाल्या.
सुरुवातीला शाळा नकोशी असलेला दिव्यांग मुलगा घरामध्ये आईला पाणी आणण्यास, साफसफाई करण्यास कदत करू लागला आहे. मूल्यवर्धनमुळे मुलात चांगले सकारात्मक बदल झाले आहेत.