खोडकर मुलात अमुलाग्र बदल

खोडकर मुलात अमुलाग्र बदल

मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे एक खोडकर मुलगा आता एक आदर्श विद्यार्थी झाला  आहे. 

(जिल्हा : अकोला, तालुका : अकोला , केंद्र : शिवर, शाळा : शिवणी)

दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी ह्या शाळेत, मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या आढावा बैठकित मुख्याध्यापक व शिक्षकांनी मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये झालेल्या बदलांबाबत आवर्जून माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जरी कार्यक्रम १ ली ते ४ थी साठी असला तरी संपूर्ण शाळेमध्येच मूल्यवर्धनचा प्रभाव दिसून येत आहे. याचे उत्तम उदाहरण त्यांनी दिले. प्रशांत (नाव बदलले आहे)  हा वरच्या वर्गातील विद्यार्थी सर्वांच्या अतिशय खोड्या काढायचा. त्यामुळे शाळेतील मुलेच काय पण महिला शिक्षकवर्ग त्याला बिचकून असायचे. पण शाळेत राबविल्या गेलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांमुळे त्याच्या वृत्ती आणि वर्तनामध्ये बदल होऊ लागले.

प्रशांतमधील झालेल्या बदलांबद्दल बोलतांना शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र गवई यांनी सांगितले की, एका रविवारी त्याने शाळेचे स्वच्छतागृह साफ केले. हे काम त्याला कुणी सांगितले नव्हते. ही गोष्ट जेव्हा शाळेतील शिक्षकांना समजली तेंव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सध्या हा विद्यार्थी शाळेच्या उद्यानाची नियमित देखभाल करतो. त्यामुळे त्याला शिक्षकांनी पर्यावरण मंत्रिपद बहाल केले आणि त्याने’आदर्श विद्यार्थी’ हा पुरस्कारही पटकावला.

या बैठकीला जिल्हाधिकारी (भाप्रसे) श्री. जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरुण पुंडलिकराव विधळे तसेच शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ह्या मुलाचा गौरव करण्यात आला. मूल्यवर्धनमुळे प्रशांतमधील झालेल्या बदलांचे कौतुक करणाऱ्या बातम्या स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांनी काही कालवधीनंतर शाळेतील सर्व मुलांना स्वत:च्या घरी बोलावून त्यांच्याशी २ तास मनमोकळा संवाद साधला.

मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झाले आहेत. मुले शाळेत वेळेवर येऊ लागली आहेत. खेळात सहभागी होऊ लागली आहेत. सुविचार लिहिणे, परिपाठाची तयारी करणे, झाडांना पाणी घालणे, मुलांमध्ये झालेली भांडणे आपापसात सोडविणे यासाठी मुलेच पुढाकार घेऊ लागली आहेत. त्याच्या वाईट सवयी मूल्यवर्धनमुळेच सुटू शकल्या.

2 Recent Comments
  • Kailas Babasaheb Panhalkar February 24, 2018

    मूल्यवर्धन हा अतिशय आवश्यक असणारा विषय आहे. या शिवाय विद्यार्थाच्या वर्तनात परीवर्तन करून एक जबाबदार नागरिक घडवण्याचे काम ‘मूल्यवर्धन’मधून होत आहे. सर्वगुणसंपन्न पिढी तयार करणे हा आदरणीय श्री. शांतिलाल मुथ्था यांचा उद्देश आहे. मूल्यवर्धन बीडमध्ये राबवत असताना त्याचे उत्तम नियोजन व उत्तम संवाद सुहिता शेंडे यांनी ठेवला होता. हा प्रकल्प भविष्यात जागतिक पातळीवर घेऊन जायचा असेल अनुभवी व्यक्तींची जोड व उत्तम नियोजन आवश्यक आहे.

    • mulyvardhan March 6, 2018

      आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.